गंगाखेडमध्ये विहीर अधिग्रहण नाही
By Admin | Updated: May 31, 2014 00:26 IST2014-05-30T23:50:07+5:302014-05-31T00:26:47+5:30
उद्धव चाटे, गंगाखेड तालुक्यात ८४ ग्रामपंचायती असून, त्याअंतर्गत १०६ गावांचा समावेश आहे़

गंगाखेडमध्ये विहीर अधिग्रहण नाही
उद्धव चाटे, गंगाखेड तालुक्यात ८४ ग्रामपंचायती असून, त्याअंतर्गत १०६ गावांचा समावेश आहे़ दरवर्षी तालुक्यामध्ये पाणीटंचाई भासते़ यावर्षी मात्र पंचायत समितीच्या अहवालानुसार कोणत्याच गावात पाणीटंचाई आढळून आली नाही़ त्यामुळे तालुक्यात एकही अधिग्रहण करण्यात आले नाही़ तालुक्यातील डोंगराळ भागात पाणीटंचाई जाणवू लागते़ परंतु, यावर्षी फेब्रुवारी व मार्च या महिन्यात वादळी वार्यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने पाणीपातळीत वाढ झाली तसेच छोटे मोठे पाझर तलाव भरले़ त्यामुळे यंदा उन्हाळ्यात तालुक्यामध्ये पाणीटंचाई भासली नाही़ गतवर्षी गंगाखेड तालुक्यातील जवळपास ५० गावांत पाणीटंचाई निर्माण झाली होती़ त्यामुळे ८० हातपंप व विहिरींचे अधिग्रहण करावे लागले होते़ गणेशपुरी मठ, कासारवाडी, भेंडेवाडी, उमलानाईक तांडा या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता़ यासाठी अंदाजे २१ लाख रुपये पाणीटंचाईवर खर्च करण्यात आले होते़ यावर्षी मात्र तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतीपैकी एकाही ग्रामपंचायतीमध्ये पाणीटंचाई जाणवत असल्याचा अधिग्रहणाचा एकही अर्ज आला नाही़ त्यामुळे शासनाचे पाणीटंचाईवर करण्यात येणारा लाखो रुपयांचा खर्च वाचला आहे़ पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे़ त्यामुळे आता तालुक्यामध्ये पाणीटंचाई राहणार नाही़ यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे़ गेल्यावर्षी उन्हाळ्यात तालुक्यातील ५० गावांमध्ये पाणीटंचाई जाणवली होती़ पाणीटंचाईवर मात करण्यासाठी टँकरची व्यवस्था करण्यात आली होती़ यंदा मात्र एकाही गावात टँकरची गरज भासली नाही़ शासनाकडून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो़ मात्र शासनाकडून कायमस्वरुपी पाणीटंचाईवर उपाय योजना करण्यासाठी म्हणावे तसे निर्णय घेतले जात नसल्याने तालुका टंचाईमुक्त होत नाही़ यंदा मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे तालुका टंचाईमुक्त झाला आहे़ गंगाखेड तालुक्यात १०६ गावांचा समावेश आहे़ या तालुक्यातील डोंगराळ भागामध्येच पाणीटंचाई जाणवते़ परंतु, गेल्या वर्षी या तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला़ तसेच अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने गावातील विहिरींच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे़ गंगाखेड तालुक्यात पाणीटंचाईसाठी दरवर्षी ८० हातपंप व विहीर अधिग्रहणावर होणारा खर्च व राबविण्यात येणारी यंत्रणा तसेच होणारी धावपळ यावर्षी मात्र फेब्रवारी, मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झाली नाही़ ़ गेल्यावर्षी जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातच तालुक्यात पाणीटंचाई जाणवू लागली होती़ हातपंप व शेतातील विहिरींवरून पाणी आणण्यासाठी ग्रामस्थ रात्रीबेरात्री भटकंती करीत होते़ यंदा मात्र ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली नाही़ कारण भूजल पातळीत वाढ झाली आहे़ तसेच छोटे मोठे पाझर तलाव व बंधारे भरले होते़