कोरोनाने १४ रुग्णांचा जिल्ह्यात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:17 IST2021-04-11T04:17:33+5:302021-04-11T04:17:33+5:30
परभणी : कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्हावासीयांची धास्ती दररोज वाढू लागली आहे. १० एप्रिल रोजी जिल्ह्यातील १४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू ...

कोरोनाने १४ रुग्णांचा जिल्ह्यात मृत्यू
परभणी : कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्हावासीयांची धास्ती दररोज वाढू लागली आहे. १० एप्रिल रोजी जिल्ह्यातील १४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर ६८४ नव्या रुग्णांची नोंद झाली.
मागील एक महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य यंत्रणा रुग्णांना बरे करण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करीत आहे. मात्र, रुग्णांची संख्या त्याच पटीने वाढत आहे. विशेष म्हणजे, नवीन रुग्णांच्या नोंदीबरोबरच कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या १२ आणि खाजगी रुग्णालयातील २ अशा १४ रुग्णांचा शनिवारी मृत्यू झाला. मृत्यू पावलेल्या रुग्णांमध्ये ९ पुरुष आणि ५ महिलांचा समावेश आहे.
आरोग्य विभागाला शनिवारी २ हजार ७१ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात आरटीपीसीआरच्या १ हजार २०७ अहवालांमध्ये ४१६ आणि रॅपिड अँटिजन टेस्टच्या ८६४ अहवालांमध्ये २६८ अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत.
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता २० हजार १८५ झाली असून, त्यापैकी १५ हजार १६५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ५०९ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, सध्या ४ हजार १४ रुग्ण उपचार घेत आहेत.
येथील जिल्हा रुग्णालयात ६७, आयटीआय हॉस्पिटलमध्ये १६५, जिल्हा परिषदेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये २२६, अक्षदा मंगल कार्यालय १४० रुग्ण उपचार घेत आहेत, तर होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ३ हजार ४४४ एवढी आहे. शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये ४८२ रुग्ण उपचार घेत आहेत.
कोरोनामुक्त रुग्णांची वाढली संख्या
जिल्ह्यात मागच्या चार दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. आठवडाभरापूर्वी शंभर ते दीडशे रुग्ण दररोज कोरोनामुक्त होत होते. ही संख्या आता ३०० पार झाली आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. शनिवारी ३७९ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, या रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. कोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हळूहळू वाढत असल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळत आहे.