मुळी बंधारा कामाचे तांत्रिक अंदाजपत्रक मंजुरीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:03 IST2021-02-05T06:03:00+5:302021-02-05T06:03:00+5:30
गंगाखेड : तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात मुळी येथे उभारलेल्या निम्न पातळी बंधाऱ्याला प्रायोगिक तत्त्वावर बसवलेले स्वयंचलित दरवाजे निकामी झाले ...

मुळी बंधारा कामाचे तांत्रिक अंदाजपत्रक मंजुरीच्या प्रतीक्षेत
गंगाखेड : तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात मुळी येथे उभारलेल्या निम्न पातळी बंधाऱ्याला प्रायोगिक तत्त्वावर बसवलेले स्वयंचलित दरवाजे निकामी झाले आहेत. त्यानंतर या बंधाऱ्याला उभ्या उचल पद्धतीचे दरवाजे बसविण्याच्या कामाचे तांत्रिक अंदाजपत्रक मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये निर्माण होत असलेल्या भीषण पाणी टंचाईवर मात करण्यासाठी व नदीकाठच्या गावांमधील सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी २०११मध्ये मुळी येथे नदीपात्रात निम्न पातळीचा बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्याला प्रायोगिक तत्वावर बसविण्यात आलेले स्वयंचलित दरवाजे २०१२ व २०१६ असे दोनवेळा क्षतीग्रस्त झाल्याने या बंधाऱ्यात येणारे पाणी तसेच पुढे वाहून जात आहे. मुळी बंधाऱ्यात पाणी साठवण होत नसल्याने कोट्यवधी रूपये खर्च करून उभारण्यात आलेला मुळी बंधारा शोभेचे बाहुला ठरत आहे. या बंधाऱ्याला उभ्या उचल पद्धतीचे दरवाजे बसवावेत, अशी मागणी करत तालुक्यातील शेतकरी तसेच नागरिकांनी वेळोवेळी आंदोलने केली. यामुळे मुळी येथील गोदावरी नदीपात्रात असलेल्या मुळी बंधाऱ्याला उचल पध्द्तीचे दरवाजे बसविण्याच्या कामासाठी शासनाने १५ कोटी ४० लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली. सद्यस्थितीत या बंधाऱ्याच्या दरवाज्यांच्या कामाचे तांत्रिक अंदाजपत्रक नांदेड येथील पाटबंधारे विभागाकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत असून, त्याला मंजुरी मिळताच या कामाची निविदा काढून दरवाजे बसविण्याच्या कामाला सुरुवात केली जाईल, असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात येत आहे.
गोदावरी नदीपात्रातील मुळी बंधाऱ्यात पाणी साठवण सुरु झाल्यास गंगाखेड शहरासह सोनपेठ तालुक्यातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यासह सुमारे १,७०५ हेक्टरपेक्षा अधिक शेत जमिनीवरील सिंचनाचा प्रश्नही सुटणार आहे.
जनता दरबारात उपस्थित केला प्रश्न
गंगाखेड तालुक्यातील शेतीचे अर्थचक्र, पिण्यासाठी पाणी आणि दुष्काळ निवारणासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या मुळी बंधाऱ्याच्या दरवाजांच्या कामासाठी प्राधान्यक्रमाने निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच लवकरात लवकर कामाला सुरुवात करावी, अशी मागणी गंगाखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री नवाब मलिक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या जनता दरबारावेळी दिलेल्या निवेदनातून केली आहे. या निवेदनावर ओंकार पवार, दादासाहेब पवार, दीपक वैरागर, सखाराम पवार, गोविंद जाधव, नामदेव पसार, सुधीर खळीकर, दीपक पवार, चांगदेव सोन्नर, मंचक पवार, संतोष गौरशेटे, विजय बेद्रे आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.