६५ हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:42 IST2021-01-13T04:42:45+5:302021-01-13T04:42:45+5:30
सेलू तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतून ५१९ सदस्य निवडीची प्रक्रिया सुरू झाली. त्यामध्ये १२ ग्रामपंचायतींमधील ८८ सदस्य व १२ ...

६५ हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क
सेलू तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतून ५१९ सदस्य निवडीची प्रक्रिया सुरू झाली. त्यामध्ये १२ ग्रामपंचायतींमधील ८८ सदस्य व १२ ग्रामपंचायतींच्या विविध प्रभागातून २१ सदस्य असे एकूण १०९ सदस्य बिनविरोध निवडले आहेत. उर्वरित ५५ ग्रामपंचायतींमधून ४१० सदस्य निवडीसाठी १६८ वाॅर्डात १७४ मतदान केंद्रांवर आता निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत ३३ हजार ६८५ पुरूष तर ३१ हजार ४९८ महिला असे ६५ हजार १८३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तहसीलदार बालाजी शेवाळे यांच्या नियंत्रणाखाली ही निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.
आरक्षण रद्द झाल्याने चुरस
यापूर्वी सोडत पद्धतीने काढलेले सरपंच पदाचे आरक्षण शासनाने रद्द केले आहे. आता भावी सरपंच आपणच या अविर्भावात प्रत्येकजण प्रयत्न करीत आहे. त्यामुळे या निवडणुकीत चुरस वाढली आहे. तर दुसरीकडे तरूण वर्गाने या निवडणुकीत सहभाग घेतल्याने ज्येष्ठ मंडळींची मात्र दमछाक होत आहे. ५५ ग्रामपंचायतींमधील १६८ वाॅर्डातून ५६१ महिला व ३३९ पुरूष असे ९०० उमेदवार निवडून रिंगणात असून त्यापैकी ४१० जणांची निवड होणार आहे.
१७४ केंद्रांवर होणार मतदान
५५ ग्रामपंचायतींसाठी ५२ ग्रामपंचायतीत वाॅर्डनिहाय प्रत्येकी ३ मतदान केंद्रे आहेत. तर पार्डी- कौसडी येथे २ आणि देऊळगाव येथे ४ तसेच वालूर येथे १२ अशी एकूण १७४ मतदान केंद्रे आहेत. १२ ग्रामपंचायती व १२ ग्रामपंचायतींच्या विविध प्रभागातून १०९ सदस्यांची बिनविरोध निवड झाली असून त्यामध्ये ७० महिला आणि ३९ पुरूषांचा सामावेश आहे.