३५ हजार शेतकरी कर्जमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:16 IST2021-02-12T04:16:54+5:302021-02-12T04:16:54+5:30
जिंतूर : महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिंतूर तालुक्यातील ३५ हजार ३९१ शेतकऱ्यांच्या खात्यावर २०२ कोटी ६९ लाख रुपये ...

३५ हजार शेतकरी कर्जमुक्त
जिंतूर : महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिंतूर तालुक्यातील ३५ हजार ३९१ शेतकऱ्यांच्या खात्यावर २०२ कोटी ६९ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे हे शेतकरी कर्जमुक्त झाले असल्याची माहिती सहायक निबंधक आसाराम गुशिंगे यांनी दिली.
महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. या योजनेंतर्गत जिंतूर तालुक्यातील पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या. यामध्ये ४० हजार ४६३ शेतकऱ्यांपैकी ३८ हजार १९१ शेतकऱ्यांचा समावेश होता. यातील ३६ हजार ६४४ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरणाचे काम पूर्ण केले आहे. त्यातील ३५ हजार ३९१ शेतकऱ्यांच्या खात्यावर २०२ कोटी ६९ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे हे ३५ हजार ३९१ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. विशेष म्हणजे तालुक्यातील एक हजार ५४८ शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पात्र असतानाही त्यांनी आधार प्रमाणिकरण करून घेतलेले नाही. त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे ते या योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे योजनेसाठी पात्र प्रत्येक लाभार्थींनी आधार प्रमाणिकरण करून घेणे बंधनकारक आहे. या संदर्भात अनेकवेळा सुचित करण्यात आले असल्याचे सहायक निबंधक गुशिंगे यांनी सांगितले. कर्जमुक्त ठरलेल्या लाभार्थींना खरीप हंगामात बँकांकडून नव्याने कर्जही देण्यात आले असल्याचे ते म्हणाले. ज्यांचे प्रमाणिकरण झाले नाही, त्यांना मात्र नवीन कर्ज मिळण्यास अडचण येऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.
४७२ शेतकऱ्यांच्या तक्रारी
महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत तालुक्यातील ४७२ शेतकऱ्यांनी विविध प्रकरणांतर्गत प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. त्यानुसार संबंधित समितीकडे २२ तक्रारी प्रलंबित आहेत, तर १४५ शेतकऱ्यांच्या तक्रारीचे तहसीलदारांकडून निवारण करण्यात आले असल्याची माहिती सहायक निबंधक गुशिंगे यांनी दिली.