३३ हजार शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:03 IST2021-02-05T06:03:11+5:302021-02-05T06:03:11+5:30

मानवत : तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसान भरपाईचे दुसऱ्या टप्पयातील ...

33,000 farmers waiting for subsidy | ३३ हजार शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा

३३ हजार शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा

मानवत : तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसान भरपाईचे दुसऱ्या टप्पयातील ३२ हजार ८९१ शेतकऱ्यांचे १० कोटी ८८ लाखांचे अनुदान तहसील कार्यालयाला प्राप्त झाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर ते जमा करण्यात येणार होते. मात्र, निवडणूक संपून ११ दिवसांचा कालावधी उलटला तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा झाले नसल्याची माहिती समोर आली आहे.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाचा पंचनामा केल्यानंतर तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष राज्य शासनाच्या मदतीकडे लागले होते. राज्य शासनाने मदत जाहीर केल्यानंतरही प्रत्यक्षात रक्कम उपलब्ध करून न दिल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. राज्य शासनाकडून अनुदानाची रक्कम प्राप्त होताच गावनिहाय शेतकऱ्यांच्या यादीनुसार अनुदानाचे वाटप करण्यासाठी पूर्ण तयारी महसूल विभागाने केली होती. पहिल्या टप्प्यात राज्य शासनाकडून १० कोटी ८८ लाखांची मदत तहसील कार्यालयाला प्राप्त झाली होती. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करून वाटप करणे सुरू आहे. हे नुकसान भरपाईचे अनुदान दोन टप्प्यात दिले जाणार असल्याने सर्व शेतकऱ्यांना ५० टक्के म्हणजेच जिरायती क्षेत्रासाठी हेक्टरी ५ हजार तर बागायती क्षेत्रासाठी हेक्‍टरी ९ हजार रुपये अनुदानरुपी मदत मिळणार आहे. तालुक्यातील एकूण २१ हजार ५९३ हेक्टरवरील शेतीला अतिवृष्टीचा फटका बसला आहे.

पावसाचा बसला फटका

तालुक्‍यातील एकूण ३२ हजार ८१९ शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसला आहे. या नुकसान भरपाईपोटी राज्य शासनाने दुसऱ्या टप्प्यात १० कोटी ८३ लाख ८१ हजार ४९१ रुपये अनुदान तहसील कार्यालयाकडे वर्ग केले होते. ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्याने या निवडणुकीनंतर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती तहसील कार्यालयाने दिली होती. मात्र, निवडणुकीनंतर ११ दिवसाचा कालावधी उलटून गेला तरी शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा झाले नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. ही रक्कम लवकरात लवकर जमा करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

गावनिहाय शेतकऱ्यांची संख्या

मानवत १,९७८, मानोली १,२८१, उक्कलगाव ९८७, ईटाळी ७३५, रत्नापूर ३६३, नागरजवळा ७७३, बोंदरवाडी ३६७, मांडेवडगाव ३०३, पाळोदी ७६१, पिंपळा ४८५, सोनुळा १,९६७, सावळी ६८१, हत्तरवी ५२८ आदी गावांमधील शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत.

दुसऱ्या टप्प्यातील नुकसान भरपाईची रक्कम तहसील कार्यालयाला प्राप्त झाली असून, शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरु आहे. येत्या दोन दिवसात ही रक्कम वर्ग करून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.

- डी. डी. फुफाटे, तहसीलदार. मानवत

Web Title: 33,000 farmers waiting for subsidy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.