पालमसाठी १५ कोटींची पाणीपुरवठा योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:03 IST2021-02-05T06:03:30+5:302021-02-05T06:03:30+5:30
पालम : शहराला गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ...

पालमसाठी १५ कोटींची पाणीपुरवठा योजना
पालम : शहराला गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी पाणीपुरवठा योजना मंजूर केली असून, आगामी २० वर्ष पुरेल एवढ्या क्षमतेची ही योजना आहे, अशी माहिती भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य गणेशराव रोकडे यांनी २७ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पालम शहराच्या विकासासाठी भाजप सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला असून, येथील नगर पंचायतीच्या माध्यमातून शहराच्या विकासाची विविध कामे मार्गी लागली आहेत. पालम शहरासाठी १५ कोटी रुपयांच्या नळ योजनेच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. गेल्या वीस वर्षांपासून पालमच्या नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. ही भटकंती आता संपणार आहे. शहरातील नागरिकांना सुविधा मिळाव्यात, यासाठी संपूर्ण शहरात सिमेंट रस्त्यांची कामे झाली असून, गल्लोगल्लीतील रस्त्यांचा प्रश्न आता पूर्णपणे मिटला आहे. विशेष करुन पालमवासीयांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या पाणीपुरवठा योजनेसाठी गणेशराव रोकडे यांनी सातत्याने पाठपुरावा करुन तत्कालिन मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडून ही योजना मंजूर करुन घेतली. आता या योजनेच्या कामाला सुरुवात होत असून, आगामी २० वर्षे या पाणीपुरवठा योजनेद्वारे पालमकरांना मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा होणार आहे. तीन नवीन पाण्याच्या टाक्यांद्वारे शहराला पाणीपुरवठा केला जाणार आहे.
पालम शहराचा विकास हाच आपला ध्यास असून, शहराच्या विकासासाठी आपण नेहमीच आग्रही राहिलो असून, आपण केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे पालमकरांना ही पाणीपुरवठा योजना मिळाली असल्याचेही रोकडे यांनी सांगितले. या सर्व कामामध्ये नगराध्यक्ष बाळासाहेब रोकडे, अनिताताई हतिअंबीरे, नगरसेवक यांचाही मोलाचा वाटा आहे. या पत्रकार परिषदेला नगराध्यक्ष बाळासाहेब रोकडे, लक्ष्मण रोकडे, नगसेवक असदखाँ पठाण, आजीम पठाण, विजय घोरपडे, ऊबेदखाँ पठाण आदी उपस्थित होते.