गावाकडल्या पोरी पडल्याच प्रेमात तर काय होतं?
By Admin | Updated: February 5, 2015 19:12 IST2015-02-05T19:12:53+5:302015-02-05T19:12:53+5:30
तो हिंदी विषयात पी. एचडी करणारा. हुशार, समंजस आणि वाचनवेडा. दोघांचा विविध विषयांवर सातत्याने संवाद व्हायचा, प्रसंगी वादही व्हायचे, अर्थात वैचारिक! मैत्रिणीचा मोठा भाऊ या मैत्रीकडे कौतुकाने पहायचा

गावाकडल्या पोरी पडल्याच प्रेमात तर काय होतं?
स्नेहा पाटोळे , (‘राईट टू लव्ह’ रॅलीत सहभागी झालेली तरुणी) -
अकरावीत माझी एक मैत्रीण होती. विचारी, कवीमनाची, उत्तम वाचन-जाण असणारी. एका छोट्या खेड्यात शाळा शिकून महाविद्यालयीन शिक्षणासाठी आमच्या गावी, तालुक्याच्या ठिकाणी आलेली. एका खोलीत काही वर्गमैत्रिणींसोबत राहायची. तिच्याच गल्लीत राहणार्या एका मुलासोबत तिची मैत्री झाली. तो हिंदी विषयात पी. एचडी करणारा. हुशार, समंजस आणि वाचनवेडा. दोघांचा विविध विषयांवर सातत्याने संवाद व्हायचा, प्रसंगी वादही व्हायचे, अर्थात वैचारिक! मैत्रिणीचा मोठा भाऊ या मैत्रीकडे कौतुकाने पहायचा. कालांतराने मात्र या दोघांच्या नात्यात फुललेलं प्रेम तिच्या भावाला कमालीचं खटकलं. भावानं तिला समजावून पाहिले. ती ऐकेना तेव्हा त्यानं ‘त्या’ मुलाला तिला जबरदस्तीनं चारचौघात राखी बांधायला लावली.
झाला तेवढा तमाशा पुरे म्हणत पुढं दोघंही वेगळ्या वाटांनी निघून गेले. विशेष गोष्ट अशी की, या मैत्रिणीच्या भावाने नंतर काही दिवसांनी गावातल्याच एका मुलीशी घरच्यांचा विरोध पत्करुन प्रेमविवाह केला. तो अर्धशिक्षित, वाहनचालक म्हणून काम करणारा, तिने डी.एड केलेलं. तिची शिक्षिका होण्याची महत्त्वकांक्षा मारुन त्यानं तिला निमुट संसार करायला भाग पाडलं. माझी मैत्रिणही आता शिक्षिका होऊन घरच्यांनी निवडलेल्या मुलाशी मुकाटपणे संसार करते आहे.
या चित्राकडे आज मी त्रयस्थपणे पाहते तेव्हा त्यावेळी न जाणवलेल्या काही गोष्टी ठळकपणे जाणवतात. मैत्रीण स्वतंत्र विचारांची होती तरीही तिनं आई-वडिलांशी बोलून भावाला समजावण्यासाठी काही पाऊल का उचललं नाही? अर्धशिक्षित, अविचारी भावाला स्वत:च्या आयुष्यात इतका हतक्षेप करण्याचा अधिकार का दिला? करिअर निवडण्याचं स्वातंत्र्य तिनं मिळवलं, तसं जोडीदार निवडीचं स्वातंत्र्य का नाही? स्वत: प्रेमविवाह करणारा भाऊ बहिणीची प्रेमभावना का समजावून घेऊ शकला नाही?
गावाकडे आजही अनेकींच्या मनात उमलणारी तारुण्यसुलभ कोवळीक काही काळात करपून जाते हे कितीही नाकारलं तरी वास्तव आहे. या मुली जाणून असतात त्यांचं, त्यांच्या प्रेमाचं प्राक्तन. समोर येणार्या जगण्याचा समंजस स्वीकार म्हणजेच आयुष्य हे गृहीतक खूप आधीच त्या गोंदून घेतात उरीपोटी. मात्र मनातले कढ कळत नकळत त्या खोलून दाखवतात जिव्हाळ्याच्या जागी.
एकदा ‘त्या’ मैत्रिणीसोबत तिच्या गावी गेले होते. गावाला लागून वाहणार्या नदीवर धुणं घेऊन गेलो तेव्हा तिचा बांध फुटला. रडणं ओसरल्यावर बोलती झाली, ‘आबा (वडिल) गावच्या शाळेत शिक्षक होते. त्यांना थोरामोठ्यांमध्ये मान आहे. आमचं खानदान मोठं. नातेवाईकांचा विरोध सोसून मला तालुक्याला शिकायला पाठवलं. मी शिकून कितीही कमावती झाले, नोकरी मिळवली तरी जातीबाहेर, स्वत:च्या मर्जीनं लग्न करणं घरच्यांना सहन होणार नाही. वडिलांना गावात बोल लागणार. पोरीला शिकवून चूक केली असंच सगळे म्हणणार. म्हणून मी पाऊल मागे घेतले.’
जवळच्याच एका गावातून शहरात शिकायला येणार्या आणखी एका मैत्रिणीचंही शिक्षण एकदिवस अचानक थांबवण्यात आले. कारण एका मुलाशी तिचं नाव जोडून कुणीतरी ते गावापासून शहरात येणार्या रस्त्यावर,आजूबाजूच्या दगडांवर लिहून ठेवलं होतं. वर्गातल्याच एका मुलासोबत तिचं नाव लिहिलं गेल्याची चर्चा गावभर झाली. तिच्या चुलत्यांनी वडिलांना भरीस घालत हा तिचं शिक्षण बंद करून तिला घरीच बसवण्याचा निर्णय घ्यायला भाग पाडलं.
हे सारं चालू असताना दुसरीकडं असंही दिसतं की, एरव्ही गावातली तरुण मुलं एकमेकांना प्रेमप्रकरणांमध्ये जीवापाड मदत करतात, प्रसंगी जीव धोक्यात घालून आपण कसा एका मित्राचा प्रेमविवाह लावून दिला हे इतरांना फुशारक्या मारत रंगवून सांगतात. पण गोष्ट जेव्हा त्यांच्या सख्ख्या वा अगदी चुलत बहिणीची किंवा अगदी जवळच्या नात्यातल्या मुलीची येते तेव्हा लगेच ही तरुण मुलं, त्यांचाही नकळत ‘पुरुषी’ पवित्रा घेत पझेसिव्ह बनतात. आमच्या जातीतल्या, नात्यातल्या स्त्रियांनी कसं वागावं ते आम्ही ठरवू असा तो पवित्रा असतो.
आणि जिथं धाकदमदाटी चालत नाही तिथं आई वा वडिल शेतातलंच कीटकनाशक घेऊन जीव देण्याची धमकी देतात. कायम कुटुंबकेंद्री आणि सर्मपित वृत्तीसाठी गौरवलेल्या मुली मग सहज शरणागती पत्करतात. मुलीने सहजीवनाबाबत थोडा जरी स्वतंत्र विचार केला तरी तिच्या शिक्षणाला दोष दिला जातो. तुला आम्ही एवढं शिकवलं ते याचसाठी का? हे तिला ऐकवलं जातं. तू आम्हाला अनुकूल वागलीस तरच आमची असा सगळा अविर्भाव असतो.
कुटुंबाचा सामाजिक चेहरा आणि जातीची खोटी प्रतिष्ठा जपण्याचे सगळे जोखड देहमनावर वागवत या मुली वावरत असतात. आणि अनेकींच्या आठवणीत अकाली मेलेली स्वप्नं पक्की कोरलेली असतात. एखाद्या समवयीन मुलाविषयी आपल्याला प्रेम वाटतं हे सत्य त्यांना (प्रेमाच्याही आधी) अपराधभाव देतं.
मग त्या संभ्रमात पडतात, स्वत:लाच प्रश्न विचारतात, स्वत:चीच उत्तरं शोधतात. कधी चूक तर कधी बरोबर. तशातही काही बंडखोर मुली हे जोखड झुगारुन मागू पाहतात स्वत:ची जमीन आणि स्वत:चं आभाळ. त्याची किंमत त्या मोजतात, धडपडतात, सावरतात, बिकटवाटेला वहिवाट बनवतात!
पण अशा थोड्याच.
बाकीच्यांच्या मनात मात्र कधीकाळी कुणाविषयी तरी वाटलेल्या प्रेमाच्या, कुणीतरी आवडल्याच्या फक्त आठवणी असतात.
------------------------------
शर्मिष्ठा भोसले -
‘‘नुसतं हळहळ व्यक्त करु न काय होणार, प्रेमाला विरोध करुन दडपशाही करणार्यांचा जाहीर विरोध आणि निषेध केला पाहिजे असं आम्हाला वाटलं. ही निषेध रॅली पुण्याच्या गुडलक चौकातूनच झाली पाहिजे असे आम्ही ठरवल. कारण पुण्यातील गुडलक चौक म्हणजे चळवळी आणि आदोलनाचं ‘तहरीर स्क्वेअर’. या रॅलीनं निदान महाराष्ट्रात या प्रश्नाची चर्चा तरी सुरू झाली. गेल्या शुक्रवारी पुण्यात याच विषयावर ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांनी तरु णांची चर्चा घडवून आणली. विषयाला निदान तोंड फुटलं.’’
------------------
अभिजित कांबळे , संयोजक, राईट टू लव्ह रॅली -
ग्रामीण भागात जगणं,
गुन्हा आहे का?
‘‘पुण्याजवळच्या एका लहानशा गावात मी वाढले. पुण्यात उच्चशिक्षणासाठी आल्यावर जाणवत्लं की की ग्रामीण भागात प्रेमविवाहांना, प्रेमात पडायलाच जेवढा विरोध होतो, तेवढा शहरात होत नाही. गावात मात्र सगळ्यात आधी मुलीलाच आरोपीच्या पिंर्जयात उभं केलं जातं. माझ्या गावात एका जोडप्यानं समाजाच्या विरोधाला न जुमानता पळून जाऊन लग्न केलं. संसार सुरू केला पण मुलाच्या नातेवाईकांनी त्याचं इतकं मानसिक खच्चीकरण केलं की, एकदिवस त्यानं त्या मुलीला तिच्या घरच्यांकडे परत नेऊन सोडलं. यासार्यात त्या मुलीचं मानसिक संतूलनच बिघडलं. जातीपातीपुढं आजही गावात व्यक्तिगत भावना शून्य ठरतात. एका मुलीच्या आयुष्यापेक्षा जात आणि समाज हे जास्त वरचढ ठरतात.
हे सारं आपल्याच देशात घडतंय, आपल्याच शहराजवळच्या गावात घडतंय, हे शहरी तारुण्यानं समजून घ्यावं. हा प्रश्न ग्रामीण तारुण्याचा, त्यांचं त्यांनी पाहून घ्यावं म्हणून कुणी हात झटकू नयेत.’’