लग्न नावाचा वन वे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 14:45 IST2018-05-10T14:45:16+5:302018-05-10T14:45:16+5:30
हे स्थलांतर मुलीचं आयुष्यच बदलून टाकतं, कायमचं !

लग्न नावाचा वन वे
- वैष्णवी श्रीकांत तर्कसे, परभणी
स्थलांतर ही एक अशी घटना आहे, जी आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणते. प्रत्येकाचे स्थलांतराचं कारण आणि अनुभव अतिशय वेगवेगळे असतात, कधी परिस्थितीमुळे, कधी शैक्षणिक कारणांमुळे तर कधी अगदीच आवड म्हणून लोक स्थलांतर करत असतात.
स्थलांतर नेहमीच ऐच्छिक असेल असंही नाही; पण ते अनिवार्य मात्र नक्कीच असतं. अशाच एका अनिवार्य स्थलांतरणाचा अनुभव प्रत्येक मुलीच्या कपाळी लिहिलेला असतो.
ते स्थलांतर म्हणजे लग्न.
लग्न करून सासरी जाणं. आपलं घर सोडणं आणि कायमचं निघून जाणं. हे खरंच वन वे तिकीट आहे. क्षणभर विचार केला तर जाणवतं की हे स्थलांतर करायला किती मोठं धाडस लागत असेल.
स्थलांतर एरव्ही काही अंशी सुसह्य असतं, कारण त्या प्रकारच्या स्थलांतरणात एक मनस्वी स्वातंत्र्य असतं. आपण ठरवून गाव-शहर बदलतो. स्वतंत्र होतो, अनेकदा एकटेच होतो. पण लग्न करून एखादी मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा तिचं आयुष्य अनेक नात्यांमध्ये बांधलं जातं. सासरी गेल्यावर कुठलाही निर्णय घेताना त्या निर्णयाच्या परिणामांचा सर्वांगाने विचार तिला करावा लागतो. एवढंच नव्हे तर हे स्थलांतर करताना तिला पुष्कळ पूर्वतयारीसुद्धा करावी लागते, जसं की स्वत:च्या स्वभावात थोडाफार बदल करावा लागतो, स्वभाव जर हट्टी असेल तर त्याला मुरड घालावी लागते. सासरच्या लोकांचे स्वभाव लक्षात घेत तिला स्वत:च्या सवयींमध्ये बदल करावे लागतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जुळवून घेण्याची वृत्ती अंगीकारावी लागते. लग्न करून ती एका गावातून दुसऱ्या गावात, शहरात जात असली किंवा अगदी एका गावातच दुसºया घरी जात असली तरी हा स्थलांतरानंतरचा बदल मोठाच असतो. संपूर्ण आयुष्यच बदलून टाकणारा असतो.
या प्रकारच्या स्थलांतरणात यू टर्न घेण्याची मुभाच नसते. सासरी जाणं हा वन वे आहे. या वन वेवरून मुलगी पुन्हा मागे फिरूच शकत नसता. जगण्याच्या वन वेवर जोडीदाराच्या साथीने स्वत:च्या आयुष्याची गाडी व्यवस्थितपणे चालवण्याचं सामर्थ्य कमवावं लागतं. ती ते कमावतेही, नवीन जग निर्माण करते.
सासरी गेलेल्या मुलीला अनेक प्रकारची माणसं तर भेटतात आणि इतकंच नव्हे तर त्या माणसांच्या रूपानं तिच्या आयुष्यात अनेक नवीन नातीही डोकावतात. ती नाती निभावत असताना तिला अनेक जबाबदाºया निभवाव्या लागतात. त्यासाठी जोडीदाराचा भक्कम आधार मात्र आवश्यक असतो.
तिचं हे स्थलांतर अनेक सुखदु:खाचे क्षण देतं. आपलं आयुष्य किती बदललं लग्नानंतर असंही तिला वाटतंच. तेव्हा तिचाही विश्वास बसत नाही की या एका स्थलांतरानं आपल्याला इतक्या गोष्टी शिकवल्या..
आयुष्याचा नूरच बदलून टाकला..