राष्ट्रप्रेम, तरुणाई आणि बरचं काही...
By Admin | Updated: August 11, 2016 16:08 IST2016-08-11T16:08:00+5:302016-08-11T16:08:00+5:30
‘न्यू इयर पार्टी’ आणि ‘व्हॅलेंटाईन डे’ या दिवसांची जय्यत तयारी करणारी तरुणाई पाहिली की अनेकजण देश, संस्कृती, परंपरा, पूर्वजांनी काय केले आणि ही मुले काय करतात, यावरून नाक मुरडतात अथवा बोट मोडू लागतात. ‘

राष्ट्रप्रेम, तरुणाई आणि बरचं काही...
पूजा दामले
‘न्यू इयर पार्टी’ आणि ‘व्हॅलेंटाईन डे’ या दिवसांची जय्यत तयारी करणारी तरुणाई पाहिली की अनेकजण देश, संस्कृती, परंपरा, पूर्वजांनी काय केले आणि ही मुले काय करतात, यावरून नाक मुरडतात अथवा बोट मोडू लागतात. ‘आजकालच्या मुलांना’ हा शब्दप्रयोग अनंतकाळापासून वापरुनही अजूनही चिरतरुण आहे. कारण, जुन्या पिढीला ते ‘आजकालच्या मुलांना’मध्ये गणले जात होते, याचा विसर पडतो. त्यामुळे ‘ही तरुण पिढी’ हा शब्दप्रयोग सरसकटपणे अनेकदा नकारात्मक अर्थानेच वापरण्यात येतो. या नकारात्मकतेची तीव्रता इंटरनेटने भारतात प्रवेश केल्यानंतर अधिक वाढली आहे. ‘जग एक खेड बनले आहे’ या विचारानंतर ‘तरुण पिढी आणि देशप्रेमं’ याविषयी टीका टिप्पणी वाढलेली आहे. परदेशात शिकायला जातात त्यामुळे ‘देशप्रेमं संपले’ अशी टीकाही केली जाते. पण, हीच तरुणाई १५ आॅगस्ट स्वातंत्र्य दिनाचीही तयारी करत असते. पूर्वीप्रमाणे देशप्रेम दिसत नसले तरीही ‘राष्ट्रप्रेम, तरूणाई आणि बरचं काही...’ स्वातंत्र्यदिनी शहर, गावं, खेड्यांमध्येही दिसून येतेच...
शाळेत प्रवेश घेतल्यापासून दहावी पास होईपर्यंत प्रत्येक विद्यार्थी रोजच्या रोज प्रतिज्ञा आणि राष्ट्रगीत म्हणत असतो. त्यामुळे नकळतपणे ‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.’ याचे संस्कार मनावर बिंबतात. कोणीही पाठ करुन न घेता, समजवून न सांगता या शब्दांचे अर्थ उलगडतात. शाळा सोडल्यावर काही सवयी मागे पडतात. त्यातली एक सवय म्हणजे रोजच्या रोज प्रतिज्ञा आणि राष्ट्रगीत म्हणण्याची. अनेकांना कॉलेजमध्ये गेल्यावर आता प्रार्थना नसल्याचा आनंद होतो. पण, सकाळी सातच्या लेक्चरला हजेरी न लावणारी ही तरुणाई १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारीच्या ‘ध्वजारोहणा’च्या कार्यक्रमाला हजेरी लावते. त्यावेळी अभिमानाने ‘राष्ट्रगीत’ म्हणते.
जून महिन्यांत कॉलेज सुरु झाल्यावर लेक्चर शिवाय दुसऱ्या कोणत्या खास अॅक्टिव्हिटीज नसतात. पण, आॅगस्ट महिन्यात तरुणाई स्वातंत्र्य दिनासाठी विशेष प्लॅनिंग सुरु करते. स्वातंत्र्यदिनी कॉलेजमध्ये हजर राहण्यासाठी ‘स्पेशल ड्रेस’चा विचार सुरु असतो. मनात दडलेली ‘देशभक्ती’ या दिवशी नक्कीच दिसून येते. इतकच कशाला मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा पाहिला गेल्यावरही राष्ट्रगीतावेळी आवाज घुमत असतो, त्यातही तरुणाई आघाडीवर असते.
स्वातंत्र्यानंतर देशात अनेक बदल झाले आहेत. काळानुरुप गरजा बदलल्या आणि माणसेही बदलत गेली. या सगळ््या बदलांचा परिणाम अभिव्यक्तीवर आणि अभिव्यक्तीच्या साधनांवरही झाला. तंत्रज्ञानाच्या युगात याचा परिणाम प्रकर्षाने जाणवू लागला. कॉलेजमध्ये प्रवेश घेणारी पिढीच्या विचारसरणीत बदल होत गेले. पण, अजूनही स्वातंत्र्यदिना विषयीची आत्मीयता, प्रेम तसूभरही कमी झालेली नाही. कॉलेजच नाही, तर तरुणाई पुढाकार घेऊन सोसायटी, चाळीत, चौकांत, संस्थांमध्ये ध्वजारोहणाचे आयोजन करते. आत्ताच्या तरुणाईच्या विचारांत झालेल्या बदलांमुळे स्वातंत्र्यदिन साजरा करणे म्हणजे ध्वजारोहण कार्यक्रम इतके मर्यादित स्वरुप राहिलेले नाही. यादिवशी श्रमदान, गरजू विद्यार्थ्यांसाठी काम असे वैविध्यपूर्ण उपक्रम राबविले जातात.
कॉलेजमध्ये ‘एनसीसी’, ‘एनएसएस’चे विद्यार्थी एकत्र येऊन ‘स्वातंत्र्य दिनी’ ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करतात. त्यावेळी तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तींना मार्गदर्शनासाठी बोलावले जाते. त्यांच्या भाषणातून तरुणाईला प्रेरणा मिळावी हा यामागचा उद्देश असतो. देशात कोणत्या घडामोडी सुरु आहेत, देश कोणत्या क्षेत्रात पुढे आहे, कोणत्या क्षेत्रांमधून देश पुढे नेण्यास आपण मदत करु शकतो, अशा अनेक विषयांचा यात समावेश असतो. अनेक ग्रुप्स स्वातंत्र्यदिनी ‘गड -किल्ल्यां’वर जातात. ऐतिहासिक वारसा असणारे या गड किल्ल्यांची आता दुरवस्था झाली आहे. याचे संवर्धन व्हावे, त्याची जपणूक करण्यासाठी हे ग्रुप्स तिथे जाऊन ध्वजारोहण करतात. गड-किल्ल्यांवर फडकणारा ‘तिरंगा’ पाहून होणारा आनंद, मनात उमलणाऱ्या भावना शब्दांत व्यक्त करता येणार नाही, असेच या ‘राष्ट्रप्रेमीं’चे म्हणणे असते.
आॅनलाईनवरही स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. पूर्वीप्रमाणे आता कागदी झेंडे विकत घेण्याचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले असेल. पण, फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉट्स अॅप अशा सोशल नेटवर्किंग साईट्सवर फोटोंच्या माध्यमातून तिरंगा फडकत असतो. नवीन तंत्रज्ञानामुळे फोटोवर ‘तिरंग्या’चे इफेक्ट दिले जातात. तर, काहीजण स्वातंत्र्यसैनिकांचे फोटो ठेवतात. स्टेटस म्हणून वीर गाणी ठेवली जातात. पण, यावरही टीका होते. कारण, हे काय ‘राष्ट्रपे्रम’ का? असा सवाल असतो. तरुणाई दिसते वाटते तितकी उथळ नक्कीच नाही. त्यांच्या राष्ट्रपे्रम व्यक्त करण्याची पद्धत, माध्यम बदलेले पण भावना तितकीच शुद्ध, खरी आणि निर्मळ आहे. दिखाऊपणा करण्यासाठी नाही तर मनापासून ही तरुणाई सर्व गोष्टी करत असते... जय हिंद!
‘तिरंगी’ फॅशन
स्वातंत्र्यदिनी ‘तिरंग्या’प्रमाणे वेशभूषा केली जाते. यंदाच्या स्वातंत्र्यदिनी या फॅशनसाठी फॅशन डिझायन अदिती भालेराव (संस्थापक Soleil Atelier) यांनी काही टिप्स दिल्या आहेत...
स्वातंत्र्यदिनी पोषाख करताना पांढरा रंग प्रमुख रंग ठेवण्याचे लक्षात ठेवा. आणि कोणताही ड्रेस निवडताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे रंगांचा समतोल साधणे आणि त्याचे वर्गीकरण सर्वात महत्त्वाचे आहे.
पांढऱ्या रंगाच्या कुडत्यावर नारंगी रंगाचा पलाझो आणि हिरव्या रंगाचा स्टोल घेऊ शकता.
पांढऱ्या रंगाच्या ‘सेल्फ प्रिंटेड’ कुडत्यावर नारंगी आणि हिरव्या रंगाचे दागिने घालू शकता. लाईट कलरची डेनिम यावर चांगली दिसेल.
पांढऱ्या रंगावर नारंगी आणि हिरव्या रंगांचे ‘अॅबस्ट्रक प्रिंट’ असलेली साडी हा सर्वात उत्तम आणि सुंदर पर्याय आहे.
पांढरी साडी नेसायची नसल्यास नारंगी रंगाची साडीची निवड करु शकता. त्यावर पांढऱ्या आणि गोल्डन रंगाचे ब्लाऊज आणि ट्रेडिशनल हिरव्या रंगाची आॅक्सीडाईजची ज्वेलरी वापरु शकता.
नारंगी रंगाचा टॉप, पांढऱ्या रंगाची पॅण्ट आणि हिरव्या रंगाचा ‘हेडबॅण्ड’
पांढरा शर्ट, हिरवी पॅण्ट आणि नारंगी रंगाचे नेलपॉलिश.
हिरव्या, नारंगी आणि पांढऱ्या रंगाच्या वेगळ््या शेड्स ट्राय करु शकता.
मुलांसाठी हिरव्या, नारंगी रंगाची मोदी जॅकेट्स हा एक चांगला पर्याय आहे. पांढऱ्या कुडता, सलवारीवर उठून दिलतील.