शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
2
Short Term Investment: केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
3
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
4
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
5
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
6
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
7
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
8
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
9
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
10
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
11
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
12
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
13
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
14
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
15
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
16
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
17
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
18
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
19
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
20
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
Daily Top 2Weekly Top 5

बस हो गयी दोस्ती !

By admin | Updated: October 14, 2016 12:58 IST

खरंतर मला पाकिस्तानला जायचं होतं. पण यावर्षीच्या ‘दीपोत्सव’साठी एनएच 44 चा प्लॅन ठरला आणि सगळ्यांनाच ‘किक’ बसली !

- मेघना ढोके

खरंतर मला पाकिस्तानला जायचं होतं. पण यावर्षीच्या ‘दीपोत्सव’साठी एनएच 44 चा प्लॅन ठरला आणि सगळ्यांनाच ‘किक’ बसली !अख्खा देश पालथा घालणारी रोडट्रिप! असलं भन्नाट काम कोणाला करायला मिळणार?तसंही प्रवास ही एक नशा असते. त्याची चटक लागते. एका प्रवासानं दिलेली नशा थोडे दिवस टिकते. पुन्हा वाटतं की जावं आता फिरायला बाहेर खुल्या वातावरणात, वेगळ्या जगात, वेगळ्या माणसांत! रुटीन जगण्याचा मेणचट हात सुटतो इतकी ती नशा जालीम असते..आपल्याच देशाची दोन टोकं, कन्याकुमारी ते काश्मीर; त्यांना जोडणाऱ्या सगळ्यात मोठ्या हायवेनं प्रवास करायचा, तोही पूर्णत: अनप्लॅन्ड! कंप्लिट भटकं आयुष्य जगायचं. ते करतानाच आपला देश पाहायचा, समजून घ्यायचा. लाइफ आॅन अ हायवे या कल्पनेतच थरार होता. वाटलं, आता पाकिस्तान नंतर; आधी आपलाच देश नीट पाहून घेऊ, माणसांनाच नाही तर देशालाही अवचित गाठू..माझं मन तत्काळ ‘आनंद’ मोडवरच शिफ्ट झालं. बाबू मोशायचा आनंद. तो मस्त कलंदर सांगून गेलाय ना की, ‘हर एक बॉडी एक ट्रान्समीटर होती है, उससे निकली व्हायब्रेशन को पकडा, रिअ‍ॅक्ट किया, बस हो गयी दोस्ती..!’- ओळखीची ना पाळखीची अशी ‘व्हायब्रण्ट’ माणसं आपल्यालाही भेटतील अशी आशा मनाशी ठेवून निघाले टीमबरोबर!सर्व प्रकारचे चष्मे, समज, गैरसमज आणि आपलं ‘शहरी’ शहाणपण यांचं एक गाठोडं करून घरीच ठेवलं आणि जे जसं दिसेल ते तसं पाहायचं हे एवढंच स्वत:ला चारचारदा बजावलं.जायचं कुठून कुठं हे निश्चित होतं, पण बाकी काहीही ठरवलेलं नव्हतं. कुणाला भेटायचं, कुठं राहायचं, रिझर्व्हेशन.. असलं काहीही प्लॅनिंग केलं नाही. भाषाही न समजणाऱ्या भागातून जाताना आपलं कसं होणार, भर पावसाळ्यात रात्रीबेरात्री आपण कुठं निवारा शोधणार असा काहीही विचार केला नाही. एक नक्की होतं : नॅशनल हायवे ४४ सोडायचा नाही, हा देश आणि हा हायवे हेच आपलं रस्त्यावरचं घर!प्रवास सुरू केला आणि जी माणसं भेटली, त्यांनी या देशाकडे पाहण्याची माझी समजच बदलून टाकली..इथं रस्त्यावर माणसं भेटतात तेव्हा ती दिलखुलासपणे बोलतात, तुम्हाला ‘आपलं’ मानतात. कसलेही भेदाभेद करत नाहीत, तुमचं ओळखपत्र मागत नाहीत की तुम्ही कोण कुठले अशा संशयी चौकशा करत नाहीत. उलट जुजबी ओळखीवर तुम्हाला जेवायला घरी या असा आग्रह करतात आणि ते करताना तुमच्या जातीपाती, हुद्दा, रुबाब, पगारपाणी विचारत बसत नाहीत..माणसं फक्त तुमच्या शब्दावर विश्वास ठेवतात आणि प्रचंड विश्वासानं सहज मन आणि घराची दारंही तुमच्यासाठी उघडतात. एकमेकांची भाषाही समजत नसताना अशी कितीतरी गरीब, सामान्य माणसांची दारं माझ्यासाठी उघडली. तेव्हा मलाच अनेकदा प्रश्न पडला की, आपण काय म्हणून माणसांना गरीब आणि सामान्य असं म्हणतो आहोत?टपरीवर चहाचे पैसेही न घेणारे, रात्री बेरात्री कुठं जाता आता म्हणत स्वत:च्या ढाब्यावर राहण्याची सोय करतो म्हणणारे आणि एवढं करूनही आपण काहीच केलं नाही असं वाटून डोळ्यात पाणी आणून निरोप देणारे..मनाची भाषा बोलणारी आणि मायेची नाती जोडणारी अशी माणसं या प्रवासात सर्वत्र भेटली..इथं प्रत्येकाची एक कहाणी आहे, आणि जो तो आपापल्या कहाणीचा हिरो. जरा त्यांच्या मनातल्या मातीला थोडं उकरलं की माणसं बोलतात, आपल्या स्वप्नांविषयी, झगडण्याविषयी, कष्टांविषयी आणि आयुष्यात काहीतरी घडवण्याविषयी..मला अजून आठवताहेत गच्च पावसाळी रात्री हैदराबादच्या चकाचक झळाळत्या हायटेक सिटीत भेटलेले, एका बड्या औषध कंपनीच्या खाली कंदिलाच्या उजेडात चहाची टपरी चालवणारे व्यंकट रेड्डीकाका. पावसात भिजत चहा पीत गप्पा मारल्या त्यांच्याशी तर ते सांगत होते की, त्यांना चार मुली! मुलगा नाहीच. मुलींनी हट्ट केला म्हणून त्यांच्या शिक्षणासाठी गाव सोडून हे काका हैदराबादेत आले. ते सांगत होते, ‘मेरी बेटी कहती है, एक दिन ये हायटेक सिटीमें सबसे बडे कांच के आॅफिस की बॉस बनूंगी; मैं कौन होता उसे रोकनेवाला?मुलींना गर्भात मारणारे आईबाप माध्यमांमध्ये सतत भेटतात; पण मुलींसाठी जिवाचं रान करणारे आईबाप आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षी, धडाडीच्या मुली या प्रवासात किती भेटल्या असतील, त्याची गणतीच नाही.असे किती किस्से, किती कहाण्या. हिमतीच्या, कष्टाच्या, उमेदीच्या आणि संघर्षाच्याही..जुनी ओझी मानगुटावर न बाळगता, नव्यानं काहीतरी घडवू पाहणारे, ठेचा खात झगडणारे तरुण आणि तरुणीही भेटल्या. आपण प्रयत्न केले तर आपली स्वप्नं पूर्ण होतील अशी आशा त्यांच्या नजरेत दिसली.मी परत आले ती या उमेदीची ताकद घेऊनच.रस्त्यावर काही हजार किलोमीटर प्रवास केला असं कुणाला सांगितलं तर लोक अजूनही विचारतात, एकटी मुलगी होतीस तू टीममध्ये? आणि हा रात्री-बेरात्रीचा प्रवास? भीती नाही वाटली?- खरं तर हा प्रश्नच कुठं उद्भवला नाही इतका ‘सभ्य’ देश मला तरी या प्रवासात भेटला. रात्रीबेरात्री हॉटेल्स, टोलनाक्यांवर महिला काम करताना सर्वत्र दिसल्या. कुणी आपल्या बाईपणाचा बाऊ करत नव्हतं. आणि माझ्या टीममधल्या पुरुष सहकाऱ्यांसह देशाच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाताना वाट्टेल त्या वेळी रस्त्यावर भटकताना, जो भेटेल त्याच्याशी गप्पांची मैफल जमवताना मी ‘स्त्री’ आहे, याचे साधे सिग्नल्ससुद्धा कुणी दिले नाहीत.माझा अनुभव तरी हेच सांगतो की, हा देश आपण माध्यमांत रोज उठून वाचतो-पाहतो तितका भयानक नाहीये बायकांसाठी! अशा किती कहाण्या सांगता येतील. पण त्या कहाण्यांपेक्षाही मोलाची आहे मी कमावलेली नजर आणि त्याहून मोठी आहे मी बॅगेत गच्च भरून आणलेली उमेद आणि चांगुलपणावरची श्रद्धा..ती उमेद मला आता आयुष्यभर पुरेल, हे नक्की!(लेखिका लोकमत वृत्तसमूहात मुख्य उपसंपादक आहेत.)meghana.dhoke@lokmat.com