ऑलिम्पिकला ‘पात्र’ ठरलेल्या सरडे गावच्या प्रवीण जाधवची गोष्ट.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 06:30 IST2019-06-27T06:30:00+5:302019-06-27T06:30:05+5:30
शेतमजूर आईवडिलांचा मुलगा. घरी अत्यंत गरिबी मात्र त्याची जिद्द अशी की, त्यानं ‘लक्ष्यभेद’ करायचं ठरवलं.

ऑलिम्पिकला ‘पात्र’ ठरलेल्या सरडे गावच्या प्रवीण जाधवची गोष्ट.
- प्रगती जाधव-पाटील
गरिबी, दुष्काळ... वाचून-सांगून त्याविषयी कळतंही. मात्र जो गरिबीचे चटके भोगतो, त्याला कळतो त्यातला दाह आणि पोटात पेटलेली भूक. मात्र ती भूक हीच आपली ताकद हे ज्याला कळतं, तो हिमतीनं जगणंही पालटवू शकतो. त्याचंच एक उदाहरण म्हणजे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातल्या सरडे गावचा प्रवीण जाधव.
तिरंदाजीत त्याचं नाव आज आंतरराष्ट्रीय पातळीवर उजळून निघालं आहे. गेल्या आठवडय़ात नेदरलॅण्डमध्ये झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत रजत पदक त्यानं जिंकलंच मात्र त्यासह तरुणदीप राय, अतानु दास आणि प्रवीण या भारतीय संघानं ऑलिम्पिकमध्ये सहभागाचं आपलं एण्ट्री तिकीटही मिळवलं. त्यामुळे आता तो ऑलिम्पिकसाठीही पात्र ठरला आहे.
मात्र इथवरचा प्रवीणचा प्रवास सोपा नव्हता.
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात सरडे हे प्रवीणच मूळ गाव. वडील रमेश आणि आई संगीता यांच्याबरोबर प्रवीण सरडेत राहत होता. सरडे जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असताना त्याला विकास भुजबळ हे शिक्षक भेटले. घरची आर्थिक परिस्थिती वाईट, आईवडील शेतमजूर. त्यामुळं आपलं मोठं होणारं पोरगंही काहीतरी कमावून आपल्याला हातभार लावेल अशी त्यांना आशा होती. शाळेची सोंग करण्यापेक्षा गुपगुमानं शेतात काम करायचं आणि कमवायला लागायचं हा त्यांचा हेका होता. पण भुजबळ सर त्यांना क्रीडाक्षेत्रातल्या संधीविषयी सांगत होते. त्यात प्रवीणची जिद्द दांडगी. त्यामुळे त्याच्यापुढे वडिलांचं काही चाललं नाही. सातवीत असताना प्रवीण क्रीडा प्रबोधिनीत जाण्यासाठी प्रयत्न करू लागला. तिथं दाखलही झाला.
घरी जाऊन खर्च वाढवण्यापेक्षा बाहेर राहून आपली गुजराण करू, असा विचार वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी प्रवीणच्या डोक्यात आला. शिक्षक सांगतील त्या वाटेने निमुटपणे तो चालत राहिला. कुटुंबीयांच्या आठवणीने कित्येक रात्नी रडण्यात गेल्या.
मात्र ‘क्रीडा प्रबोधिनी’मध्ये प्रवेश मिळवण्याआधी झालेल्या परीक्षेमध्ये प्रवीण तिरंदाजीसाठी योग्य असल्याचं, प्रशिक्षकांचं मत पडलं. त्याच्या दंडांची ठेवण, शारीरिक ताकद ही या खेळासाठी योग्य असल्याचं तज्ञाचं मत झालं. तो या खेळात रमू लागला. शिक्षण पूर्ण करता करताच तो खेळातही प्रावीण्य मिळवत राहिला. वर्षभरापूर्वी प्रवीण हा स्पोर्ट्स कोटय़ाअंतर्गत भारतीय लष्कर सेवेत रुजू झाला. लहानपणी इतर मुलांच्या गळ्यात गोफात गुंतलेला बदाम त्याला आकर्षित करायचा. फौजेत गेल्यानंतर पहिल्या पगारात त्यानं वडिलांसाठी तसा बदाम आणि आईसाठी मंगळसूत्न केले. आपल्या कर्तृत्वात बहिणीसाठीही तिच्या आवडीचं काही तो आठवणीनं घेऊन आला.
मजबुरी सगळं काही करवून घेते, हे तत्त्व मानणारा प्रवीण म्हणतो, ‘मला स्पर्धाचं कधीच टेन्शन येत नाही. लहानपणापासून परिस्थितीनं इतके खतरनाक चटके दिलेत की त्यापुढं नेम धरणं आता ताण देणारं वाटत नाही. माझे मानसिक ट्रेनरही याबाबत माझे कौतुक करत असतात.’ मात्र त्याला आपल्या आईवडिलांच्या कष्टाचीही जाण आहे, तो म्हणतो, ‘वडिलांची कष्ट करण्याची तयारी आणि आईचं परिस्थितीशी दोन हात करण्याचं कसब माझ्यात आलंय. हेच माझं भांडवल. यश मिळवणं आणि त्यात सातत्य टिकवणं हे माझं उद्दिष्ट आहे !’
2013 पासून प्रवीणने तिरंदाजी खेळण्यास सुरुवात केली. 2015 साली त्याने बँकॉक येथे आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवली. त्यानंतर वल्र्डकप, एशिया कप, अशा सहा मोठय़ा आंतराष्ट्रीय स्पर्धात तो सहभागी झाला. त्यात दोन पदकंही जिंकली.
आता या प्रवासाकडे पाहून काय वाटतं असं विचारलं तर प्रवीण म्हणाला, ‘परिस्थितीच्या नावाने खडे फोडण्यापेक्षा विपरीत परिस्थितीलाच घाम फोडण्याची धमक आपल्यात पाहिजे. ही धमक जेव्हा आपल्यात येते ना तेव्हा आपण आपल्या वाटेनं चालायला लागतो!’
(प्रगती लोकमतच्या सातारा आवृत्तीत उपसंपादक आहे.)