४000 किलो चकल्यांचा उद्योग
By Admin | Updated: May 22, 2014 15:23 IST2014-05-22T15:23:50+5:302014-05-22T15:23:50+5:30
चकल्या करणं हा मुख्यत: महिलांचाच गृहउद्योग. एखाद्या तरुणानं चकली बनवण्याचा उद्योग स्वत:च सुरू केला आणि वर्षाला ४ टन चकल्या विकण्याइतपत उलाढाल करण्याइतपत भरारी घेतली

४000 किलो चकल्यांचा उद्योग
>अमोल लंके
वय वर्षे फक्त २५ आणि वर्षाला ४ टन चकल्या विकण्याची हिंमत?
------------
‘चकली’ म्हणताच आपल्या तोंडाला पाणी सुटतं. पूर्वी दिवाळीत मिळणारी चकली आता बारमाही मिळते. मात्र चकल्या करणं हा मुख्यत: महिलांचाच गृहउद्योग. एखाद्या तरुणानं चकली बनवण्याचा उद्योग स्वत:च सुरू केला आणि वर्षाला ४ टन चकल्या विकण्याइतपत उलाढाल करण्याइतपत भरारी घेतली असं सांगितलं तर खरं वाटेल?
औरंगाबादच्या अमोल लंके, आपल्या आईकडून चकली बनवायला शिकला. आणि फक्त दिवाळीत म्हणजे हंगामी नव्हे तर वर्षभर आता तो विविध दुकानांना चकली पुरवण्याचं काम करतो.
कशी सुचली आयडिया?
परिस्थिती माणसाला शहाणपण शिकवते, हा वाक्यप्रचार अमोलला तंतोतंत लागू होतो. औरंगाबादेतील सातारा परिसरात राहणार्या अमोलची घरची परिस्थिती जेमतेम होती. त्याचे वडील दिगंबर लंके हे महेश भवनमध्ये कर्मचारी. आई हिराबाई व लहान बहीण अमृता असा परिवार. घरखर्चाला हातभार म्हणून हिराबाई दिवाळीच्या काळात एका लघुउद्योगात काम करत. तिथं चकली बनवली जायची. तेव्हा अमोल आठवीत होता. अमोल सांगतो, शाळेची फी भरायला पैसे नसत. वडिलांकडे मागितले तर ते म्हणायचे पगार होईपर्यंत थांब. आईला चकल्या करताना पाहताना मला नेहमी वाटायचं की आज बनवलेली चकली लगेच विकली तर पटकन पैसे मिळतील. मी मग आईकडूनच चकल्या बनवायला शिकलो. नववीत असताना चकली बनवून घरोघरी विक्री सुरू केली. त्या दिवाळीत आम्ही ४ ते ५ किलो चकल्या विकल्या. दहावीत असताना वडिलांनी सायकल घेऊन दिली. सायकल आल्यानं लांब लांब जाऊन चकली विकणं सोपं झालं.’
एकीकडे दहावीचा अभ्यास आणि दुसरीकडे फिरफिर करत चकली विक्री, असा त्यानं धडाका लावला. लहान पोरगं आहे असं म्हणून दुकानदार बोलत नसत, काही जण तर हिडीसफिडीस करत हाकलून देत. मात्र दुकानदारांशी कसं बोलायचं हे अमोलला हळूहळू समजायला लागलं, त्यांच्या चकल्यांचा दर्जाही उत्तम होता. त्यातून ऑर्डर मिळू लागल्या. तो बारावीत होता त्या दिवाळीत त्यानं आठ दिवसांत २५0 किलो चकली विकली. पुढच्या वर्षीच्या दिवाळीत ५00 किलो , त्यानंतर ८५0 किलो तर कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना सव्वा टन चकल्या त्यानं विकल्या. अमोलच्या चकल्या औरंगाबादेतच नव्हे तर पैठण तालुक्यातही खवय्याप्रिय बनल्या. बीकॉमची पदवी संपादन केल्यानंतर अमोलनं चकलीच्या व्यवसायाचा विस्तार करण्याचं ठरवलं. त्याच्याकडील चकलीला दिवाळीतच नव्हे तर वर्षभर मागणी होऊ लागली. यानंतर पीठ मळणी, डिझेल भट्टी, चकली बनविण्याची सेमी अँटोमॉटिक मशीन खरेदी केली. चकलीला तेल अधिक असते अशा ग्राहकांच्या तक्रारी येत असत. तेव्हा अमोलनं चकलीतून संपूर्ण तेल काढून टाकण्यासाठी ड्राय मशीन खरेदी केलं. यामुळे चकलीची गुणवत्ता आणखी वाढली व खपही वाढला. सध्या अमोल औरंगाबाद व जालना जिल्हय़ातील ६0 ते ७0 मिठाईच्या दुकानांना चकली पुरवतो. यातून वर्षाकाठी १८ लाखापर्यंत उलाढाल पोहोचली आहे. अमोल म्हणतो, भविष्यात चकलीचं उत्पादन वाढवण्यासाठी चकली तयार करण्याचं ऑटोमॅटिक मशीन खरेदी करणार आहे. ज्यात दररोज ५00 किलो चकल्या तयार होतात. त्यासाठी कर्जप्रस्ताव बँकेकडे सादर केला आहे. मशीन खरेदी केले तर वर्षाकाठी १८0 टन चकलीचे उत्पादन क्षमता वाढेल. आज अमोल फक्त २५ वर्षाचा आहे, आणि मनात आणलं तर तरुण मुलं उत्तम व्यवसाय करू शकतात हे त्याचं बोलकं उदाहरण आहे.
अडचणी काय आल्या?
१) पैसे नव्हते, पाठबळ नव्हतं, या अडचणी तर नेहमीच्याच. पण आपल्याला धड बोलता येत नाही, आपलं म्हणणं उत्तम मांडून समोरच्याला नीट पटवून देता येत नाही ही अडचण मोठी. मात्र दुकानदारांशी कसं बोलावं हे व्यवहार करता करताच शिकलो. आपलं उत्पादन उत्तम असेल तर उत्तम संवाद कौशल्य हवंच.
लक्षात काय ठेवायचं?
आपलं वय कमी असेल, हातात फार पैसे नसतील पण हिंमत असेल, बोलता येत असेल आणि कष्ट करायची जर तयारी असेल तर व्यवसाय करता येतोच.
- प्रशांत तेलवाडकर , औरंगाबाद