सहा महिन्यांपासून संवाद नव्हता

By Admin | Updated: June 22, 2017 01:17 IST2017-06-22T01:17:59+5:302017-06-22T01:17:59+5:30

सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या मुख्य सल्लागार समितीने (सीएसी) कुंबळे यांचा कार्यकाळ वाढविण्यास थेट हिरवा कंदील दाखविला नव्हता.

There was no communication for six months | सहा महिन्यांपासून संवाद नव्हता

सहा महिन्यांपासून संवाद नव्हता

नवी दिल्ली : संघात सर्व काही ‘आॅल-वेल’ नाही, अशी शंका बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना होती, पण कर्णधार विराट कोहली व मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे गेल्या सहा महिन्यांपासून एकमेकांसोबत बोलत नसल्याचे कळल्यावर त्यांना आश्चर्य वाटले.
एक महत्त्वाची बाबही समोर आली आहे, की सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या मुख्य सल्लागार समितीने (सीएसी) कुंबळे यांचा कार्यकाळ वाढविण्यास थेट हिरवा कंदील दाखविला नव्हता.
या प्रकरणादरम्यान लंडनमध्ये उपस्थित असलेले बीसीसीआयचे एक वरिष्ठ पदाधिकारी म्हणाले, ‘‘अहवालामध्ये म्हटले, की सीएसीने कुंबळे यांचा कार्यकाळ वाढविण्यास सांगितले आहे. त्यांनी असे म्हटले होते, पण एक अटही होती. सर्व प्रकरणे मिटविल्यानंतर कुंबळे यांना पदावर कायम ठेवण्यात येईल.’’
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीनंतर भारतीय संघाच्या हॉटेलमध्ये तीन वेगवेगळ्या बैठका झाल्या. पहिल्या बैठकीमध्ये कुंबळे बीसीसीआयचे आघाडीचे पदाधिकारी व सीएसीच्या सदस्यांसोबत भेटले. त्यानंतर त्यांची कोहलीसोबत बैठक झाली. तिसरी व अखेरची बैठक अधिक घटनाप्रदान ठरली. त्यात कोहली व कुंबळे सोबत होते. चर्चा पूर्णपणे निष्फळ ठरली.
अधिकाऱ्याने सांगितले, ‘‘या दोघांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेनंतर एकमेकांसोबत बोलणे सोडले होते. अडचणी होत्या, पण या दोघांमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून संवाद नव्हता, ही आश्चर्यचकित करणारी बाब आहे. रविवारी अंतिम सामन्यानंतर ते एकत्र बसले आणि एकत्र वाटचाल कठीण असल्याच्या मुद्यावर त्यांचे एकमत होते.’’
अडचण काय होती? याबाबत बोलताना सूत्राने सांगितले, ‘ज्या वेळी आम्ही कुंबळेसोबत वेगळी चर्चा केली आणि विचारले, की काही अडचण आहे का, त्यावर त्यांनी सांगितले, की विराटबाबत कुठली अडचण नाही. त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्राबाबत चर्चा केली. त्यावर कोहलीला आक्षेप होता. कुंबळेने सांगितले, की ही काही समस्या नाही.’’ अधिकारी म्हणाला, ‘‘दोघांपैकी जर एक व्यक्ती मानत असेल की काही अडचण नाही तर दोघेही चर्चा करून त्यावर तोडगा काढू शकतात. ज्या वेळी दोघांनी एकत्र चर्चा केली त्या वेळी दोघांनाही असे वाटले, की यावर तोडगा निघणे शक्य नाही.’’
सीओएने मागविला अहवाल
प्रशासकीय समितीचे प्रमुख (सीओए) विनोद रॉय यांनी बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोरी यांना भारतीय संघाचे प्रशासकीय व्यवस्थापक कपिल मल्होत्रा यांच्याकडे कुंबळे-कोहली वादाबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याबाबत आदेश दिले आहेत. कुंबळेने राजीनामा दिल्यानंतर हा आदेश देण्यात आला. २४ जून रोजी मुंबईत बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांबरोबर कुंबळे यांच्या राजीनाम्याबाबत विनोद रॉय चर्चा करणार आहेत.(वृत्तसंस्था)

गेल्या वर्षभरात मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळणे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे, याचा मी पुनरुच्चार करतो. मी नेहमी भारताच्या महान क्रिकेट परंपरेचा शुभचिंतक राहील.
कुंबळे यांनी आयसीसीच्या वार्षिक बैठकीसाठी लंडनमध्येच थांबण्याचा निर्णय घेतला. कारण कुंबळे क्रिकेट समितीचे अध्यक्ष आहे. भारतीय संघ बार्बाडोसला रवाना झाला.

Web Title: There was no communication for six months