एकेरीत विजयी सुरुवात करावी लागेल : सायना
By Admin | Updated: May 15, 2014 04:17 IST2014-05-15T04:12:00+5:302014-05-15T04:17:14+5:30
भारताची नंबर वन बॅडमिंटनपटू सायना नेहवालने उबेर चषक स्पर्धेत आपल्यालाच विजयी सुरुवात करावी लागेल,असे म्हटले आहे.

एकेरीत विजयी सुरुवात करावी लागेल : सायना
नवी दिल्ली : भारताची नंबर वन बॅडमिंटनपटू सायना नेहवालने उबेर चषक स्पर्धेत आपल्यालाच विजयी सुरुवात करावी लागेल, असे म्हटले आहे. येथील सिरीफ फोर्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये १८ ते २५ मे दरम्यान उबेर कपची अंतिम फेरी होणार आहे. यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सायना म्हणाली, ‘दुसर्या एकेरीत खेळणार्या सिंधूवरील दबाव कमी करण्यासाठी या स्पर्धेत प्रत्येक सामन्यात विजय मिळविणे माझ्यासाठी अत्यंत जरुरी आहे. सांघिक सामन्यात विजय मिळविणे नेहमीच गरजेचे असते’. जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेली सायना म्हणाली, ‘पहिल्या एकेरीतील सामना महत्त्वाचा असतो. माझे काम चांगली कामगिरी करणे हेच आहे. मी माझ्याकडून शंभर टक्के प्रयत्न करणार आहे. आमच्या संघात अनेक चांगले खेळाडू आहेत. त्यामुळे नॉकआउट फेरीत पोहोचण्याची मला पूर्ण खात्री आहे’. पत्रकार परिषदेत उबेर चषक स्पर्धेसाठीच्या भारतीय संघाच्या कर्णधारपदी सायना नेहवाल, तर थॉमस कप स्पर्धेसाठी कर्णधारपदी परुपल्ली कश्यप यांच्या नावाची घोषणा भारतीय बॅडमिंटन संघटना (बाई) चे अध्यक्ष अखिलेश दास गुप्ता यांनी केली. थॉमस आणि उबेर कप स्पर्धेत जगातील पहिले १६ संघ सहभागी होणार आहेत. सायना म्हणाली, ‘उबेर कपमध्ये भारताला तुलनेत सोपे आव्हान असणार आहे. मात्र, आम्हाला चांगली तयारी करावी लागणार आहे. चांगल्या सुरुवातीचा फायदा दुसर्या खेळाडूंनी उठवला, तर संघ नक्कीच जिंकेल. (वृत्तसंस्था)