सायना, श्रीकांतच्या कामगिरीवर नजरा
By Admin | Updated: August 9, 2015 22:39 IST2015-08-09T22:39:10+5:302015-08-09T22:39:10+5:30
भारतीय स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय खेळाडू उद्यापासून सुरू होणाऱ्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेच्या मैदानात उतरणार आहेत

सायना, श्रीकांतच्या कामगिरीवर नजरा
जकार्ता : भारतीय स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय खेळाडू उद्यापासून सुरू होणाऱ्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेच्या मैदानात उतरणार आहेत. या स्पर्धेत या दोन खेळाडूंवर अनेकांच्या नजरा असतील. सायना आणि श्रीकांत यांना प्रबळ दावेदार मानले जात आहे. उल्लेखनीय म्हणजे, स्पर्धेत भारताचे दोन खेळाडू अव्वल पाच खेळाडूंमध्ये समाविष्ट असणे, ही पहिलीच वेळ आहे.
सायना सध्या भारतीय एकेरीत दुसऱ्या, तर श्रीकांत पुरुष एकेरीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. युवा पी. व्ही. सिंधू हिच्यावरही नजरा असतील. तिने २०१३ आणि २०१४ मध्ये महिला एकेरीत कांस्यपदक पटकाविले होते. याआधी, २०११ मध्ये ज्वाला गुट्टा आणि आश्विनी पोनप्पा हिने महिला दुहेरीत पदक मिळवत भारताला विश्व चॅम्पियनशिपमध्ये २८ वर्षांनंतर पहिले पदक मिळवून दिले होते. आॅलिम्पिक कांस्यपदक विजेती सायनाने आतापर्यंत एकही विश्व चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकले नाही. ती पाच वेळा उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे मजल मारू शकली नाही. दुसरीकडे, श्रीकांत दुसऱ्यांदा विश्व चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झाला आहे. सायना हिला पहिल्या फेरीत
पुढे चाल मिळाली आहे. दुसऱ्या
फेरीत तिचा सामना हॉँगकॉँगच्या
चेंग नगान आणि एस्तोनियाच्या कॅटी तोलमोफ याच्यातील विजेत्याशी होईल. (वृत्तसंस्था)