रणजीत जम्मू काश्मीरची मुंबईवर मात
By Admin | Updated: December 10, 2014 17:04 IST2014-12-10T15:43:04+5:302014-12-10T17:04:06+5:30
रणजी क्रिकेटमध्ये लिंबू टिंबू समजल्या जाणा-या जम्मू काश्मीरच्या संघाने मुंबईसारख्या दादा संघाचा पराभव करत आपणही क्रिकेटमधील पक्के खेळाडू असल्याचे सिद्ध केले आहे.
रणजीत जम्मू काश्मीरची मुंबईवर मात
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - रणजी क्रिकेटमध्ये लिंबू टिंबू समजल्या जाणा-या जम्मू काश्मीरच्या संघाने मुंबईसारख्या 'दादा' संघाचा पराभव करत आपणही क्रिकेटमधील 'पक्के' खेळाडू असल्याचे दाखवून दिले. बुधवारी वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात जम्मू काश्मीरने मुंबईचा चार विकेटने पराभव करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे.
रणजी ट्रॉफीत मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई विरुद्ध जम्मू काश्मीर हे संघ आमनेसामने होते. दुस-या डावात मुंबईने दिलेल्या २३७ धावांचे माफक आव्हान जम्मू काश्मीरने सहा विकेटच्या मोबदल्यात पार केले. पहिल्या डावात शतक ठोकणा-या शुभम खजूरियाने दुस-या डावातही ७८ धावांची अर्धशतकी खेळी करुन जम्मू काश्मीरला विजयाच्या दिशेने नेले. जम्मू काश्मीरचा कर्णधार परवेझ रसूल (३२ धावा) आणि हरदीप सिंह (नाबाद ४४ धावा) यांनी तळाच्या फलंदाजांच्या साथीने जम्मू काश्मीरला विजय मिळवून दिला. जम्मू काश्मीरसारख्या संघाकडून घरच्या मैदानावरच पराभूत होण्याची नामुष्की मुंबई संघावर ओढावली आहे. ' मुंबईवर मात करणे आमच्यासाठी मोठी बाब असून गेल्या २ - ३ वर्षांमध्ये आमच्या कामगिरीचा आलेख उंचावला आहे. राष्ट्रीय स्तरावरील दिग्गज संघाशी खेळणे वेगळे असते असे काही जण आम्हाला नेहमी सांगायचे. आता आमच्याकडे याचेही उत्तर आहे' अशी प्रतिक्रिया विजयी संघाचा कर्णधार परवेझ रसूलने सांगितले.
धावफलक
मुंबई - पहिला डाव सर्वबाद २३६धावा, दुसरा डाव सर्वबाद २५३
जम्मू काश्मीर - पहिला डाव सर्वबाद २५४, दुसरा डाव ६ बाद २३७