राणा ‘दा’ने जिंकवलं...
By Admin | Updated: April 10, 2017 01:30 IST2017-04-10T01:29:57+5:302017-04-10T01:30:52+5:30
अत्यंत थरारक झालेल्या सामन्यात हार्दिक पांड्याने अखेरच्या षटकात केलेल्या दमदार फलंदाजीच्या

राणा ‘दा’ने जिंकवलं...
रोहित नाईक / मुंबई
अत्यंत थरारक झालेल्या सामन्यात हार्दिक पांड्याने अखेरच्या षटकात केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने कोलकाता नाइट रायडर्सचा ४ विकेट्सने पराभव केला. यासह मुंबईकरांनी यंदाच्या आयपीएलमध्ये पहिला विजय मिळवला. दरम्यान, नितिश राणाने प्रतिकूल परिस्थितीमध्ये झळकावलेले अर्धशतक निर्णायक ठरले. कोलकाताने दिलेले १७९ धावांचे लक्ष्य मुंबईकरांनी एक चेंडू आणि ४ फलंदाज राखून पार केले. मुंबईला विजयी करणारा ‘राणा दा’ सामनावीर ठरला.
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नितिश राणा चांगलाच गाजला. जोस बटलर, पार्थिव पटेल, रोहित शर्मा, केरॉन पोलार्ड असे स्टार स्वस्तात बाद झाल्यानंतर एकटा राणा खंबीरपणे फटकेबाजी करीत होता. त्यामुळे मुंबईला ‘राणा दा’ जिंकवणार असा पक्का विश्वास मुंबईच्या पाठिराख्यांना होता आणि झालेही तसेच. मुंबईला पार्थिवच्या (२७ चेंडूत ३०) बसलेल्या पहिल्या धक्क्यानंतर मैदानात आलेल्या राणाने २९ चेंडूत ५ चौकार व ३ षटकारांची आतषबाजी करत ५० धावांची निर्णायक खेळी केली.
त्याचबरोबर, अष्टपैलू हार्दिक पांड्याने पुन्हा एकदा स्वत:ला सिध्द केले. हार्दिक - राणा यांनी ४१ धावांची महत्त्वपुर्ण भागीदारी केली. हार्दिकने जास्तीत जास्त स्ट्राइक स्थिरावलेल्या राणाला देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. राणाने मोक्याच्यावेळी आक्रमक पवित्रा घेत कोलकातावर आक्रमण केले. दरम्यान, कोलकाताच्या अंकित राजपूतने ३ बळी घेत मुंबईकरांवर जबरदस्त दडपण आणले होते. परंतु राणा - हार्दिक यांनी इतर गोलंदाजांना चोपताना मुंबईवरचा भार कमी केला.
मुंबईला १९ धावांची आवश्यकता असताना राणा बाद झाला. परंतु, हार्दिकने निर्णायक फटकेबाजी केली. त्याचवेळी अखेरच्या षटकात ११ धावांची गरज असताना कोलकाताकडून खेळत असलेला ‘मुंबईकर’ सुर्यकुमार यादवने केलेल्या चुकीचा फायदा मुंबईला झाला आणि एका धावेच्या जागी चौकार मिळाला.
तत्पूर्वी, कर्णधार गौतम गंभीर आणि धडाकेबाज ख्रिस लीन यांनी आपली पहिल्या सामन्याप्रमाणेच फटकेबाजी करुन कोलकाताला जबरदस्त सुरुवात करुन दिली. परंतु कृणाल पंड्याने आपल्या पहिल्याच षटकात गंभीर आणि उथप्पा यांना माघारी धाडत कोलकाताला बॅकफूटवर आणले. गंभीरने १३ चेंडुत १९ धावा केल्या. तसेच, यानंतर बुमराहने लीनला माघारी धाडले. लीनने २४ चेंडूत ३२ धावांची खेळी केली. ३ फलंदाज झटपट परतल्याने कोलकाताने सावध पवित्रा घेतला.
पांड्याने दडपणाखाली आलेल्या कोलकाताला आणखी अडचणीत आणताना धोकादायक युसुफ पठाणलाही बाद केले. परंतु एका बाजूने टिकून राहिलेल्या मनिष पांड्येने दमदार खेळी करताना ४७ चेंडूत ५ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ८१ धावांची खेळी केली. मनिषच्या जोरावर कोलकाताला आव्हानात्मक मजल मारण्यात यश आले. मुंबईकडून कृणाल पांड्या आणि लसिथ मलिंगा यांनी अनुक्रमे ३ व २ बळी घेत चांगला मारा केला. (वृत्तसंस्था)
पंचांनी घेतला रोहितचा बळी....
दहाव्या षटकातील पाचव्या चेंडूवर सुनील नरेनने मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला पायचीत पकडून बहुमुल्य बळी मिळवला. परंतु, पंचांच्या निर्णयावर रोहितने व्यक्त केलेली स्पष्ट नाराजी सर्वांचे लक्ष वेधून गेली. रिप्लेमध्ये चेंडू प्रथम बॅटच्या कडेला लागून नंतर पॅडवर आदळल्याचे स्पष्ट दिसत होते. परंतु, तोपर्यंत उशीर झाला होता. मैदानावरुन जाता जाता रोहितने पंचांच्या निर्णयाचा स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली.
संक्षिप्त धावफलक :
कोलकाता नाइट रायडर्स : २० षटकात ७ बाद १७८ धावा (मनिष पांड्ये नाबाद ८१, ख्रिस लीन ३२; कृणाल पांड्या ३/२, लसिथ मलिंगा २/३६) पराभूत वि. मुंबई इंडियन्स : १९.५ षटकात ६ बाद १८० धावा (नितिश राणा ५0, पार्थिव पटेल ३०, हार्दिक पांड्या नाबाद २९; अंकित राजपूत ३/३७)