पुण्याची खेळपट्टी खराब नव्हती
By Admin | Updated: March 2, 2017 04:50 IST2017-03-02T00:19:14+5:302017-03-02T04:50:08+5:30
पुण्याची खेळपट्टी खराब नव्हती, तर ही खेळपट्टी पहिल्या चेंडूपासूनच आव्हानात्मक होती

पुण्याची खेळपट्टी खराब नव्हती
बंगळुरु : पुण्याची खेळपट्टी खराब नव्हती, तर ही खेळपट्टी पहिल्या चेंडूपासूनच आव्हानात्मक होती,’ असे वक्तव्य भारताचा सलामीवीर मुरली विजयने केले. पुण्याची खेळपट्टी खराब असल्याचा निर्णय आयसीसीचे सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी दिला होता. परंतु, ब्रॉड यांच्या निर्णयाशी असहमती दर्शविताना विजयने या खेळपट्टीला आव्हानात्मक म्हटले आहे.
शनिवारपासून सुरू होणाऱ्या आॅस्टे्रलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना विजयने म्हटले की, ‘पुण्याची खेळपट्टी आव्हानात्मक होती. एक क्रिकेटपटू म्हणून आम्हाला सपाट खेळपट्टीवर खेळण्याऐवजी कधीतरी अशा खेळपट्टीवरही खेळले गेले पाहिजे. खरं म्हणजे, अशा खेळपट्टीवर खेळणे कधीही चांगले असते. अशा ठिकाणी आपला खेळ आणि तंत्र यांची परीक्षा होते.’
त्याचवेळी विजयला चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या दुसऱ्या सामन्यातील खेळपट्टी चांगली असेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, वैयक्तिकरीत्या तो खेळपट्टीविषयी चिंतीत नाही. विजय म्हणाला, ‘मी मोकळेपणाने मैदानावर उतरतो आणि खेळपट्टीनुसार स्वत:च्या खेळामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतो. माझं वैयक्तिक मत आहे, की भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. पहिल्या डावात मोठ्या धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर पुनरागमन करणे कठीण होते. एकूणच आम्ही चांगला खेळ केला नाही.’
डीआरएसच्या वापाराविषयी विजयने सांगितले, ‘नक्कीच डीआरएसचा पर्याय आमच्यासाठी अनुकूल राहिला नाही. माझ्या मते आम्हाला त्या १५ सेकंदाचा
चांगला उपयोग केला पाहिजे. पुण्यातील पराभवानंतर आम्ही चर्चा केली आणि आम्ही काही कमजोर ठरलेल्या बाजूंवर काम सुरू केले आहे. आम्ही नव्याने सुरुवात करून सर्व संधींचा फायदा उचलण्यास सज्ज आहोत.’
(वृत्तसंस्था)
>या मालिकेची सुरुवात २०१५ च्या श्रीलंका दौऱ्यासारखी आहे. आम्ही सध्या आमच्या खेळाविषयी विचार करीत आहोत आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात सकारात्मक विचाराने खेळण्याचा आमचा निर्धार आहे. एक संघ म्हणून पुण्यात आम्ही अपयशी ठरलो. आम्हाला या गोष्टीचा स्वीकार करून पुढे जाण्याची आवश्यकता आहे. - मुरली विजय