मैदानाबाहेर बसून खेळ पाहणे निराशाजनक होते : रोहित शर्मा
By admin | Published: April 3, 2017 12:51 AM2017-04-03T00:51:57+5:302017-04-03T00:51:57+5:30
मैदानाबाहेर बसून संघाचा खेळ पाहणे खूप निराशाजनक होते.
![Playing out of the field was disappointing: Rohit Sharma | मैदानाबाहेर बसून खेळ पाहणे निराशाजनक होते : रोहित शर्मा Playing out of the field was disappointing: Rohit Sharma | मैदानाबाहेर बसून खेळ पाहणे निराशाजनक होते : रोहित शर्मा](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/oldfiles/2017-04-03~Clipboard10_ns.jpg)
मैदानाबाहेर बसून खेळ पाहणे निराशाजनक होते : रोहित शर्मा
मुंबई : मैदानाबाहेर बसून संघाचा खेळ पाहणे खूप निराशाजनक होते. परंतु, आता मी दुखापतीतून सावरलेलो असून पुन्हा एकदा मैदानावर पुनरागमन करण्यास उत्सुक आहे, असे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने सांगितले.
मुंबईत रविवारी आयपीएलच्या १०व्या सत्रासाठी सज्ज झालेल्या मुंबई इंडियन्सच्या एका कार्यक्रमात रोहित बोलत होता. त्याने म्हटले की, ‘खरं म्हणजे मी पाच महिन्यांहून अधिक काळ मैदानाबाहेर राहिलो. त्यामुळे पुनरागमन करण्यास मी खूप उत्साहित आहे. मी अनेक सामन्यांना मुकलो. परंतु, जेव्हा दुखापती होतात, तेव्हा त्या दुखापती खेळाडूच्या कारकिर्दीतील एक भाग बनतात. मी मागे वळून पाहण्यास इच्छुक नसून नव्या इनिंगची यशस्वी सुरुवात करण्याचा प्रयत्न करायची आहे.’
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवीसीय सामन्यात दुखापतग्रस्त झाल्यानंतर रोहित इंग्लंडविरुध्दच्या कसोटी आणि मर्यादित षटकांच्या मालिकेसह, बांगलादेशविरुद्धचा एकमेव कसोटी सामना आणि आॅस्टे्रलियाविरुध्दच्या कसोटी मालिकेला मुकला होता. रोहितने पुढे सांगितले की, ‘प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास मी घाबरलो होतो, कारण माझ्यासह असे कधीच झाले नव्हते. धाव घेताना मी माझ्या मांडीच्या हाडातून खूप मोठा ऐकला. एमआरआय स्कॅन केले आणि वेळेनुसार अनेक डॉक्टरांच्या संपर्कात राहिलो. भारतीय संघाचे फिजिओ पॅट्रीक फरहार्ट यांच्याशीही संपर्कात होतो. या सर्वांनी ही छोटी दुखापत असून गंभीर नसल्याचे सांगत खूप मोठा दिलासा दिला. मी सहजपणे या सर्व उपचार प्रक्रियेला सामोरा गेलो.’
(क्रीडा प्रतिनिधी)
आॅस्टे्रलियाविरुद्धच्या कसोटी मालिका यंदाच्या सत्रात घरच्या मैदानावर झालेली सर्वोत्कृष्ट मालिका असल्याचे म्हणताना रोहितने सांगितले की, ‘या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताला आव्हान मिळाले. पहिला सामना गमावून पुनरागमन करुन २ सामने जिंकत मालिकेवर कब्जा
करणे शानदार होते. विशेष म्हणजे ही मालिका कोणा एका खेळाडूवर अवलंबून राहिली नाही, तर संघातील प्रत्येक खेळाडूंनी मोलाचे योगदान
देत उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन केले.’
>माझे वय सध्या केवळ २९ असून ५ महिने क्रिकेटपासून दूर राहणे गंभीर बाब नाही. या गोष्टी भविष्यातही होतील. कारकिर्दीमध्ये अनेकदा सामन्यांना मुकावे लागते. असे याआधीही झाले आहे व या गोष्टींचे आता विशेष काही वाटत नाही.
- रोहित शर्मा