नवी दिल्ली : भारतीय संघाचे माजी कर्णधार रवी शास्त्री यांची आगामी बांगलादेश दौऱ्यासाठी संघाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र ही नियुक्ती तात्पुरती असून, भारतीय संघासाठी प्रशिक्षकाचा शोध अद्यापही सुरु असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पष्ट केले आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांचा कार्यकाल विश्वचषक स्पर्धेनंतर संपुष्टात आला आहे. त्यानंतर त्यांना मुदतवाढ देण्यात आली नव्हती. मात्र दौऱ्यासाठी संजय बांगर यांची सहायक प्रशिक्षक (फलंदाजी) बी. अरुण सहायक प्रशिक्षक (गोलंदाजी), आर. श्रीधर सहायक प्रशिक्षक (क्षेत्ररक्षण) या तिघांची सेवा मात्र पुढे सुरु ठेवण्यात आली आहे. याशिवाय विश्वरुप डे (प्रशासकीय व्यवस्थापक), ऋषिकेश उपाध्याय (लॉजिस्टीक व्यवस्थापक) यांची नियुक्ती केल्याची घोषणाही बीसीसीआयने केली आहे. फातुल्लाह येथे १० जून रोजी कसोटी सामन्याने भारताच्या बांग्लादेश दौऱ्यास सुरुवात होईल. त्यानंतर मिरपूर येथे (१८, २१, २४ जून) तीन एकदिवसीय सामने होतील. या दौऱ्यासाठी भारतीय संघ कोलकाता येथून ७ जून रोजी रवाना होईल. या विषयी माहिती देताना बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर म्हणाले, पदाधिकाऱ्यांची ही नियुक्ती तात्पुरत्या स्वरुपाची असून, कायमस्वरुपी प्रशिक्षकाचा अजूनही शोध सुरु आहे. बीसीसीआयने सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली व व्हीव्हीएस लक्ष्मण यांचे सल्लागार मंडळ स्थापन केले आहे. त्यांच्याशी चर्चा करुनच नवीन प्रशिक्षकाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. शास्त्री यांनी ८० कसोटी व १५० एकदीवसीय सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. तसेच १९८३ च्या विश्वविजेत्या संघातही त्यांसा समावेश होता. ग्रेग चॅपेल यांनी राजीनामा दिल्यानंतर २००७ साली शास्त्री यांनी बांग्लादेश दौऱ्यात भारतीय संघाचे व्यवस्थापक म्हणून काम पाहीले होते. शास्त्री यांच्या नेतृत्त्वाखाली या वर्षी भारतीय संघ आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. तेथे कसोटी सामन्यात भारताने दोन्ही सामने गमावले होते. (वृत्तसंस्था)
संचालन शास्त्रींच्या हाती
By admin | Updated: June 3, 2015 00:45 IST