अश्विनपासून सावध रहावे लागेल : ड्युमिनी
By Admin | Updated: November 23, 2015 00:33 IST2015-11-23T00:33:32+5:302015-11-23T00:33:32+5:30
दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जेपी ड्युमिनीने भारतीय आॅफ स्पिनर रवीचंद्रन अश्विनची प्रशंसा केली. अलीकडच्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अश्विनची कामगिरी बघता

अश्विनपासून सावध रहावे लागेल : ड्युमिनी
नागपूर : दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जेपी ड्युमिनीने भारतीय आॅफ स्पिनर रवीचंद्रन अश्विनची प्रशंसा केली. अलीकडच्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अश्विनची कामगिरी बघता त्याची दखल घेणे गरजेचे आहे. नागपूर कसोटीत आम्हाला त्याच्यापासून सावध रहावे लागेल, असे ड्युमिनी म्हणाला. विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियममध्ये रविवारी सराव सत्रानंतर ड्युमिनी पत्रकार परिषदेत बोलत होता. अश्विनने दोन कसोटी सामन्यांत १२ बळी घेतले. पहिल्या कसोटी सामन्यात ८ बळी घेत अश्विनने भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
ड्युमिनी म्हणाला, ‘गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फिरकीपटूंचा विचार करता अश्विनची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. येथील वातावरणात अश्विनची कामगिरी विशेष बहरते. कामगिरीच्या आधारावर त्याची दखल घ्यावीच लागेल.’
दरम्यान, दुखापतीमुळे पहिल्या कसोटी सामन्याला मुकलेल्या ड्युमिनीने भारतीय संघाचे आव्हान पेलण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. ‘आयपीएल’मध्ये सुरुवातीला डेक्कन चार्जर्स आणि त्यानंतर दिल्ली डेअरडेव्हिल्स संघातील संघ सहकारी असलेल्या अमित मिश्राबाबत बोलताना ड्युमिनी म्हणाला, ‘अमित नेहमी १०० टक्के योगदान देण्यासाठी सज्ज असतो. तो दर्जेदार आंतरराष्ट्रीय फिरकीपटू आहे, पण त्याला खेळण्याचे कौशल्य आम्ही आत्मसात केले आहे.’
पहिल्या कसोटी सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना कर्णधार अमलाने कबूल केले होते की, ‘आम्हाला कामगिरीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. फलंदाजीमध्ये आमच्याकडून काही चुका झाल्या.’
ड्युमिनीने अमलाच्या सुरात सूर मिसळला. ड्युमिनी म्हणाला, ‘पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान आमच्याकडून काही चुका झाल्या. त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे. गेम प्लॅननुसार खेळ करणे आवश्यक आहे. ड्रेसिंग रूममधील वातावरण चांगले असून कुठल्याही आव्हानाला सामोरे जाण्यास आम्ही सक्षम आहोत. क्रिकेटच्या सर्वच प्रकारांत यापूर्वी आम्ही ते साध्य केले आहे. या मालिकेत अद्याप बरेच क्रिकेट शिल्लक आहे.’ अष्टपैलू म्हणून माझ्यावर नेहमीच अतिरिक्त दडपण असते, असेही ड्युमिनी म्हणाला.
बंगलोरमध्ये पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत संपलेल्या कसोटीनंतर दक्षिण आफ्रिका संघ नागपुरात दाखल झाला. ड्युमिनी म्हणाला, ‘येथे स्वच्छ सूर्यप्रकाश बघितल्यानंतर आनंद झाला. आम्हाला आणखी दोन कसोटी सामने खेळायचे असून, या लढतीत शानदार कामगिरी करण्यास उत्सुक आहे. रविवारी आम्ही कसून सराव केला.’
ड्युमिनी म्हणाला, ‘बंगलोरमध्ये पाऊस पडत असला तरी आम्ही चेंजिंग रूममध्ये खेळण्याचा आनंद घेतला. निसर्गावर कुणाचेच नियंत्रण नसते. आता तिसऱ्या कसोटीवर लक्ष केंद्रित केले आहे.’ (क्रीडा प्रतिनिधी)
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी नागपुरात
रविवारी सकाळी भारतीय संघाचे आगमन झाले. यावेळी भारताचा मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज अजिंक्य रहाणेचे हॉटेल लॉबीमध्ये टिपलेले छायाचित्र.
नागपुरातही टर्निंग ट्रॅक ?
व्हीसीएच्या जामठा स्टेडियमवर २५ नोव्हेंबरपासून उभय संघांदरम्यान तिसरा आणि महत्त्वाचा कसोटी सामना खेळला जाणार आहे.
या मैदानावर आतापर्यंत चार कसोटी सामने खेळले गेले असून, त्यापैकी तीन सामने निकाली ठरले आहेत.
इंग्लंडविरुद्ध येथे खेळला गेलेला अखेरचा कसोटी सामना अनिर्णीत संपला होता. व्हीसीएचे क्युरेटर अमर कार्लेकर यांच्यावर विश्वास व्यक्त केला तर या खेळपट्टीवर सामना निकाली ठरणार आहे.
कार्लेकर यांच्या मते, सामन्याच्या दुसऱ्या दिवसांपासून खेळपट्टीकडून फिरकीपटूंना मदत मिळेल. सुरुवातीला वेगवान गोलंदाजांनाही छाप सोडण्याची संधी राहील.
कार्लेकर म्हणाले, ‘खेळपट्टीकडून फिरकीपटूंना मदत मिळेल. सकाळच्या सत्रात वेगवान गोलंदाजांना छाप सोडण्याची संधी राहील. त्यानंतर खेळपट्टी फिरकीपटूंसाठी अनुकूल ठरेल.’
सामना पाच दिवस रंगणार का? याबाबत बोलताना कार्लेकर म्हणाले, ‘दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज या खेळपट्टीवर कसे खेळतात यावर सर्वकाही अवलंबून राहील.
भारतीय संघाला मायदेशात खेळण्याचा नक्कीच लाभ मिळेल; पण सामना पाच दिवस चालेल, असे मला वाटते.’
दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू जेपी ड्युमिनी याने खेळपट्टीची पाहणी केली. त्यानंतर त्यानेही ही खेळपट्टी फिरकीपटूंना अनुकूल ठरण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.