पावसामुळे सामना रद्द, भारताचा मालिका विजय
By Admin | Updated: June 19, 2014 20:40 IST2014-06-19T20:40:53+5:302014-06-19T20:40:53+5:30
यजमान बांग्लादेशविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द झाला असून भारताने या मालिकेत २-० असा विजय मिळवत सहारा कपवर नाव कोरले आहे.

पावसामुळे सामना रद्द, भारताचा मालिका विजय
ऑनलाइन टीम
ढाका, दि. १९ - यजमान बांग्लादेशविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द झाला असून भारताने या मालिकेत २-० असा विजय मिळवत सहारा कपवर नाव कोरले आहे. बांग्लादेश दौ-यात चमकदार कामगिरी करणा-या स्टुअर्ट बिन्नीला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले.
तीन सामन्यांच्या सहारा कप मालिकेत भारताने सलग दोन विजय मिळवत मालिकेत खिशात घातली. तिस-या सामन्यात बांग्लादेशवर मात करत भारताला निर्भेळ यश मिळवून देण्याचा कर्णधार सुरेश रैनाचा प्रयत्न होता. तर तिस-या सामन्यात विजय मिळवून संघाची अब्रू वाचवण्याच्या इराद्याने बांग्लादेश संघ मैदानात उतरला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र लागोपाठ दुस-या सामन्यात भारताची फलंदाजी ढेपाळली. भारताचे सलामीचे फलंदाज उथप्पा (५), रहाणे (३) आणि रायडु (१) स्वस्तात तंबूत परतले. यानंतर कर्णधार रैनाने पुजाराच्या साथीने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र २५ धावांवर असताना रैनाही बाद झाला. रैनापाठोपाठ पुजारा २७ धावांवर पायचीत झाला. रैना, पुजारा व बिन्नीवगळता एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. पावसापूर्वी खेळ थांबला तेव्हा भारताने ३४ षटकांत नऊ विकेटच्या मोबदल्यात ११९ धावा केल्या होत्या. बांग्लादेशतर्फे शाकिब हसनने तीन, अल अमीन हुसैन व तास्किन अहमद यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. मुसळधार पावसामुळे तीन वेळा थांबवण्यात आला होता. अखेरीस पंचांनी मैदानाची पाहणी केल्यावर दोन्ही कर्णधारांशी चर्चा केली. यानंतर पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. दुस-या एकदिवसीय सामन्यात सहा धावात चार विकेट घेणा-या स्टुअर्ट बिन्नीला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला.