भारत-श्रीलंका बोर्ड एकादश सामना अनिर्णीत
By Admin | Updated: August 9, 2015 00:59 IST2015-08-09T00:59:59+5:302015-08-09T00:59:59+5:30
श्रीलंका बोर्ड एकादशविरुद्ध शनिवारी अनिर्णीत राहिलेल्या सराव सामन्यात भारतीय संघाने वर्चस्व गाजविले. दुसऱ्या दिवशी भारताचा दुसरा डाव १८० धावांत आटोपला; पण गोलंदाजांनी

भारत-श्रीलंका बोर्ड एकादश सामना अनिर्णीत
कोलंबो : श्रीलंका बोर्ड एकादशविरुद्ध शनिवारी अनिर्णीत राहिलेल्या सराव सामन्यात भारतीय संघाने वर्चस्व गाजविले. दुसऱ्या दिवशी भारताचा दुसरा डाव १८० धावांत आटोपला; पण गोलंदाजांनी यजमान संघाचे सहा गडी २०० धावांत बाद केले. लंकेला विजयासाठी ४११ धावांचे लक्ष्य देण्यात आले होते.
अश्विनने ३८ धावांत तीन, तर हरभजन व अमित मिश्रा यांनी एकेक गडी बाद केला. त्याआधी भारताने कालच्या तीन बाद ११२ धावांवरून पुढे खेळ सुरू केला. काल नाबाद असलेले के. एल. राहुल ४७ आणि चेतेश्वर पुजारा ३१ इतरांना फलंदाजीचा सराव मिळावा, यासाठी निवृत्त झाले. हरभजन चार आणि मिश्रा सात धावा काढून बाद झाले. भुवनेश्वरने नाबाद ३७ धावा केल्या. अखेरच्या गड्यासाठी उमेश यादवसोबत त्याने ३७ धावांची भागीदारी केली. (वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक : भारत पहिला डाव : ३५१ धावा, श्रीलंका बोर्ड एकादश पहिला डाव १२१ धावा, भारत दुसरा डाव : ५८.४ षटकांत सर्व बाद १८० (राहुल ४७, पुजारा ३१, भुवनेश्वर ३७, फर्नांडो व रजिता प्रत्येकी दोन बळी.) श्रीलंका बोर्ड एकादश दुसरा डाव : ५४ षटकांत ६ बाद २०० धावा. (कौशल सिल्व्हा नाबाद ८३, उपुल थरंगा ५२, पतिराना नाबाद २५,अश्विन ३/३८, यादव, हरभजन, मिश्रा प्रत्येकी एक बळी.)