भारताचा सांघिक विजय
By Admin | Updated: July 18, 2015 00:34 IST2015-07-18T00:34:57+5:302015-07-18T00:34:57+5:30
वनडे मालिकेत ३-० असा सफाया करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाने पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यातही विजयी घोडदौड कायम ठेवत झिम्बाब्वेवर ५४ धावांनी सहज

भारताचा सांघिक विजय
हरारे : वनडे मालिकेत ३-० असा सफाया करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाने पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यातही विजयी घोडदौड कायम ठेवत झिम्बाब्वेवर ५४ धावांनी सहज विजय मिळवित दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. कर्णधार अजिंक्य रहाणे, मुरली विजय, रॉबिन उथप्पा यांच्या सुरेख फलंदाजीनंतर अक्षर पटेल व हरभजनसिंग यांच्या फिरकीने संघाचा विजय साकार झाला.
भारताने विजयासाठी दिलेल्या १७९ धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ २0 षटकांत ७ बाद १२४ पर्यंतच मजल मारू शकला. त्यांच्यातर्फे हॅमिल्टन मसकदजाने २८ व चामू चिभाभा याने २३ धावा केल्या. भारतातर्फे अक्षर पटेलने १७ धावांत ३ गडी बाद केले. त्याला हरभजनसिंगने २, तर मोहित शर्माने १ गडी बाद करीत साथ दिली. प्रत्युत्तरात उतरणाऱ्या झिम्बाब्वेला चिभाभा आणि मसकदजा यांनी सलामीसाठी ८.१ षटकांत ५५ धावांची भागीदारी करीत झिम्बाब्वेला चांगली सुरुवात करून दिली. ही जोडी नवव्या षटकात हरभजनसिंगने चिभाभाला सीमारेषेवर मनीष पांडेच्या हाती झेल देण्यास भाग पाडत फोडली. पुढच्या षटकात अक्षर पटेलने झिम्बाब्वेच्या दोन फलंदाजांना पाचच चेंडूंच्या अंतरात बाद करीत त्यांना बॅकफूटवर ढकलले. पटेलने हॅमिल्टन मसकदजाला शॉर्ट फाईनलेगला केदार जाधवकरवी झेलबाद केले तर कर्णधार एल्टन चिगुंबुरा याचा त्रिफळाबाद केला. त्यानंतर हरभजनने झिम्बाब्वेला आणखी एक धक्का देताना ११ व्या षटकात चार्लस कोव्हेंट्री याला बाद केले. त्यामुळे झिम्बाब्वेची स्थिती ४ बाद ६८ अशी झाली आणि सरासरी प्रति षटक १४ धावांची झाली. त्यानंतर मात्र, भारताने झिम्बाब्वेला वरचढ होण्याची संधीच मिळू दिली नाही. त्याआधी रॉबिन उथप्पाच्या नाबाद ३९ धावांच्या बळावर भारताने ५ बाद १७८ धावा केल्या. वनडे मालिकेत विशेष ठसा उमटवू न शकणाऱ्या उथप्पाने धीरोदात्त खेळी करताना भारतीय संघाच्या धावसंख्येला आकार दिला.
उथप्पाने मनीष पांडे (१९) याच्या साथीने तिसऱ्या गड्यासाठी ४५ धावांची भागीदारी केली. तत्पूर्वी, सलामीवीर अजिंक्य रहाणे (३३) आणि मुरली विजय (३४) यांनी भारताला चांगली सुरुवात करुन दिली. उथप्पाने ३५ चेंडूंच्या खेळीत २ चौकार मारले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतल्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि मुरली विजय यांनी ७ षटकात ६४ धावांची भागीदारी करताना भारताला चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनी लिलया धावफलक हलता ठेवला; परंतु मुरली विजय धावबाद झाल्यामुळे ही भागीदारी मोडली.
मोठी खेळी करण्याकडे वाटचाल करणारा विजय मिडविकेटवर सिकंदर रजा याच्या अचूक थ्रोमुळे धावबाद झाला. त्याने १९ चेंडूंच्या खेळीत ५ चौकार, एक षटकार मारला. रहाणेने एकेरी-दुहेरी धावा काढत धावफलक हलता ठेवला. तो १० व्या षटकात लेगस्पिनर ग्रॅमी क्रेमरच्या चेंडूवर बाद झाला. रहाणे पाँइंटवर उभा असलेला क्षेत्ररक्षक मसाकदजाकडे झेल देऊन बाद झाला. रहाणे बाद झाला तेव्हा भारताची स्थिती २ बाद ८२ अशी होती. (वृत्तसंस्था)
धावफलक
भारत : रहाणे झे. मसाकदजा गो. क्रेमर ३३, मुरली धावबाद ३४, उथप्पा नाबाद ३९, मनीष झे. रजा गो. पोफू १९, केदार झे. मसाकदजा गो. पोफू ९, बिन्नी झे. क्रेमर गो. पोफू ११, हरभजन नाबाद ८, एकूण : २० षटकात ५/१७८. गोलंदाजी : उत्सेया ४-०-३०-०, पोफू ४-०-३३-३, मुजाराबानी ३-०-३६-०, मेडविजा ४-०-४६-, क्रेमर ४-१-२०-१, रजा १-०-२-०.
झिम्बाब्वे : मसकदजा झे. जाधव गो. पटेल २८, चिभाभा झे. पांडे गो. हरभजन २३, कोव्हेंट्री झे. रहाणे गो. हरभजन १०, चिगुम्भुरा त्रि. गो. पटेल १, रजा त्रि. गो. पटेल १०, इर्व्हिन धावबाद २, क्रेमर त्रि. गो. शर्मा ९, उत्सेया नाबाद १३,
मेडविजा नाबाद १४, एकूण : २० षटकांत ७/१२४.
गोलंदाजी : भुवनेश्वर ४-०-२२-०, संदीप ३-०-३४-०, मोहित ३-०-८-१, अक्षर ४-०-१७-३, हरभजन ४-०-२९-२, बिन्नी २-०-८-०.