आॅलिम्पिक पात्रतेची मला खात्री आहे
By Admin | Updated: November 23, 2015 00:29 IST2015-11-23T00:29:55+5:302015-11-23T00:29:55+5:30
दुखापतीनंतर मी स्वत:ला सावरले असून, पूर्वीप्रमाणे जोमाने सराव सुरू झाला आहे. आॅलिम्पिक पात्रता निश्चित करण्यासाठी ६० मीटरची फेक आवश्यक असून

आॅलिम्पिक पात्रतेची मला खात्री आहे
रोहित नाईक, विरार
दुखापतीनंतर मी स्वत:ला सावरले असून, पूर्वीप्रमाणे जोमाने सराव सुरू झाला आहे. आॅलिम्पिक पात्रता निश्चित करण्यासाठी ६० मीटरची फेक आवश्यक असून, मी अनेकदा याहून अधिक मीटरची फेक केली असल्याने आॅलिम्पिक पात्रतेची मला खात्री आहे. त्यानुसार आगामी काही स्पर्धांकडे लक्ष केंद्रित करून स्वत:ला सज्ज केले आहे, असे भारताची अव्वल थाळीफेकपटू कृष्णा पुनिया हिने सांगितले.
रविवारी झालेल्या वसई - विरार महापौर मॅरेथॉन स्पर्धेची ब्रँड अॅम्बॅसडर असलेल्या पुनियाने यावेळी ‘लोकमत’शी संवाद साधला. आॅलिम्पिकच्या तयारीसाठी सरकारने सुरू केलेल्या ‘टार्गेट आॅलिम्पिक पोडियम’ (टॉप) योजनेमुळे ज्या खेळाडूंकडून पदकाची अपेक्षा आहे, त्यांना फायदा आहेच; शिवाय मिळणाऱ्या मदतीमुळे त्यांचा आत्मविश्वासही वाढत आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे मला शस्त्रक्रिया करावी लागली होती. त्यामुळे मी ‘टॉप’साठी अर्ज केला नव्हता. जोपर्यंत मला स्वत:ला माझ्या तयारीबाबत आत्मविश्वास मिळत नाही, तोपर्यंत मी यासाठी पुढे जाणार नाही. कारण हा सरकारचा पैसा असून, तो उगाच वाया घालवण्याची माझी इच्छा नाही, असेही पुनियाने सांगितले.
आॅलिम्पिक तयारीविषयी पुनियाने सांगितले की, शस्त्रक्रियेनंतर माझ्या तंदुरुस्तीत वाढ झाली असून, गेल्या दहा दिवसांपासून माझी फेकही उत्तम होत आहे. अजूनपर्यंत तरी सरावामध्ये कोणतीच अडचण आली नसल्याने आत्मविश्वास वाढला आहे आणि या जोरावर मी निश्चितच आॅलिम्पिकसाठी पात्र ठरेन. त्याचप्रमाणे परदेशी वातावरण व भारतीय वातावरण यामध्ये खूप फरक असतो. भारतीय खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी त्यांना जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय स्पर्धांत खेळण्याची संधी द्यावी. कॉमनवेल्थ, आशियाई यांसारख्या जागतिक स्पर्धांतून भारतीय खेळाडूंना आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याची संधी मिळेल, असेही पुनिया म्हणाली.
नुकतीच विश्व डोपिंगविरोधी संस्थेने (वाडा) रशियन डोपिंगविरोधी संस्थेला निलंबित केले. याबाबतीत पुनिया म्हणाली की, या निर्णयाने इतर देशांना धडा मिळेल. तसेच जर रशियाने नमुने नष्ट केले असतील तर ‘वाडा’चा हा निर्णय नक्कीच चांगला आहे. यामुळे जे खेळाडू प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत, त्यांना एकप्रकारे न्याय मिळाला आहे.