गुजरात संघाचे दिमाखदार विजेतेपद
By Admin | Updated: December 29, 2015 01:23 IST2015-12-29T01:23:31+5:302015-12-29T01:23:31+5:30
कर्णधार पार्थिव पटेलचे कारकिर्दीतील पहिले शतक आणि त्यानंतर आर. पी. सिंग आणि जसप्रीत बुमराह यांनी केलेला भेदक मारा या जोरावर गुजरातने बलाढ्य दिल्लीचा १३९ धावांनी धुव्वा

गुजरात संघाचे दिमाखदार विजेतेपद
बंगळुरु : कर्णधार पार्थिव पटेलचे कारकिर्दीतील पहिले शतक आणि त्यानंतर आर. पी. सिंग आणि जसप्रीत बुमराह यांनी केलेला भेदक मारा या जोरावर गुजरातने बलाढ्य दिल्लीचा १३९ धावांनी धुव्वा उडवून विजय हजारे ट्रॉफी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
विशेष म्हणजे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये जवळपास १४ वर्षांपुर्वी पदार्पण केलेल्या पार्थिवने कारकिर्दीतील पहिले शतक झळकावताना गुजरातच्या विजयात निर्णायक खेळी केली. संघाला सुरुवातीला धक्के बसल्यानंतर त्याने रुजुल भट्टसह (६०) तिसऱ्या विकेटसाठी १४९ धावांची महत्त्वपुर्ण भागीदारी केली. या दोघांच्या जोरावर गुजरातने ५० षटकांत २७३ धावांची अव्हानात्मक मजल मारली. चिराग गांधीनेही अखेरपर्यंत नाबाद राहताना ४४ धावांची आक्रमक खेळी करीत संघाच्या धावसंख्येत योगदान दिले. नवदीप सैनी, सुबोथ भाथी आणि पवन नेगी यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीकरांनी जसप्रीत आणि आरपी यांच्या भेदकतेपुढे नांगी टाकली. दिल्लीचा डाव ३२.२ षटकांत केवळ १३४ धावांत गुंडाळून गुजरातने दिमाखात विजेतेपदावर नाव कोरले. आठव्या क्रमांकावरील पवन नेगी याने दिल्लीकडून सर्वाधिक ५७ धावांची खेळी केली. तर उन्मुक्त चंदने ३३ धावा काढल्या. या व्यतिरीक्त इतर फलंदाज झटपट परतले.
सलामीवीर रिषभ पंत, शिखर धवन, कर्णधार गौतम गंभीर, मिलिंद कुमार हे प्रमुख फलंदाज ढेपाळल्याने दिल्लीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. जसप्रीतने केवळ २८ धावांत अर्धा संघ बाद करताना दिल्लीचे कंबरडे मोडले. तर आरपीने आपला सर्व अनुभव पणास लावताना शिखर धवन, गौतम गंभीर यांच्यासह एकूण ४ खंदे फलंदाज बाद केले.
संक्षिप्त धावफलक
गुजरात : ५० षटकांत सर्वबाद २७३ धावा (पार्थिव पटेल १०५, रुजुल भट्ट ६०, चिराग गांधी नाबाद ४४; पवन नेगी २/३६, सुबोथ भाटी २/४३, नवदीप सैनी २/४६)
दिल्ली : ३२.३ षटकांत सर्वबाद १३४ धावा (पवन नेगी ५७, उन्मुक्त चंद ३३; जसप्रीत बुमराह ५/२८, आरपी सिंग ४/४२)