मुंबईचे आव्हान संपुष्टात
By Admin | Updated: March 1, 2015 00:27 IST2015-03-01T00:27:32+5:302015-03-01T00:27:32+5:30
गतविजेत्या कर्नाटकने अचूक माऱ्याच्या जोरावर मुंबईचा दुसरा डाव ३३२ धावांत गुंडाळून ११२ धावांनी बाजी मारली आणि सलग दुसऱ्या वर्षी रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.

मुंबईचे आव्हान संपुष्टात
बंगळुरू : गतविजेत्या कर्नाटकने अचूक माऱ्याच्या जोरावर मुंबईचा दुसरा डाव ३३२ धावांत गुंडाळून ११२ धावांनी बाजी मारली आणि सलग दुसऱ्या वर्षी रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. लाडने एकाकी लढत देताना १४३ चेंडूंत ७४ धावांची खेळी केली. कर्नाटकसाठी निर्णायक अष्टपैलू खेळी करणाऱ्या अभिमन्यू मिथूनने दुसऱ्या डावात सर्वाधिक ४ बळी घेताना मुंबईचे आव्हान संपुष्टात आणले.
एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात मुंबईला विजयासाठी ४४५ धावांचे आव्हान होते. मात्र पहिल्याच दिवशी २२ खेळाडू बाद झालेल्या खेळपट्टीवर हे आव्हान कठीण होते. त्यात तिसऱ्या दिवसअखेर मुख्य फलंदाज माघारी परतल्याने मुंबईसमोर अडचणी वाढल्या होत्या. अशा परिस्थितीत मुंबईची मदार सिद्धेश लाड व अभिषेक नायर या शेवटच्या नियमित फलंदाज जोडीवर होती.
क्षेत्ररक्षण करताना डोक्याला दुखापत झालेली असतानादेखील तिसऱ्या दिवशी संघाची गरज ओळखून नायर मैदानात उतरला. या दोघांनी तिसऱ्या दिवसअखेर मुंबईला ६ बाद २७७ अशी मजल मारून दिली. मात्र चौथ्या दिवशी डोक्याच्या दुखापतीतून नायर सावरलेला दिसत नसल्याने त्याला न खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला व चौथ्या दिवशीच्या सुरुवातीलाच लाडच्या सोबतीला बलविंदर संधू फलंदाजीला आला.
लाडने अतिशय जबाबदारीपूर्वक खेळ करताना ११२ चेंडूंत शानदार अर्धशतक झळकावले. यानंतर मिथूनने संधूला (५) पायचीत पकडले. या वेळी फलंदाजीला आलेल्या शार्दुल ठाकूरला पुढच्याच चेंडूवर जीवदान मिळाले. याचा फायदा उचलून ठाकूरने दोन चौकारांसह लाडला चांगली साथ देत मुंबईला तीनशेचा पल्ला गाठून दिला. मात्र यानंतर कर्नाटकने पुढील ३२ धावांत मुंबईचा डाव संपुष्टात आणला. पहिल्या डावात २० धावांत ६ बळी घेऊन मुंबईचा कर्दनकाळ ठरलेल्या विनयकुमारची सामनावीर म्हणून निवड केली गेली. (वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक :
च्कर्नाटक (पहिला डाव) : सर्व बाद २०२ धावा
च्मुंबई (पहिला डाव) : सर्व बाद ४४ धावा
च्कर्नाटक (दुसरा डाव) : सर्व बाद २८६ धावा
च्मुंबई (दुसरा डाव) : तरे झे. उथप्पा गो. अरविंद ९८, हेरवाडकर पायचीत गो. मिथून ३१, अय्यर झे. जे. सुचिथ गो. मिथून ५०, यादव झे. उथप्पा गो. मिथून ३६, लाड झे. उथप्पा गो. अरविंद ७४, पाटील झे. कपूर गो. विनय ०, मोटा त्रि. गो. गोपाळ ९. नायर रिटायर्ड हर्ट २, संधू पायचीत गो. मिथून ५, ठाकूर झे. विनय गो. गोपाळ १३, हरमीत नाबाद २. अवांतर: १२. एकूण : १२१.१ षटकांत सर्व बाद ३२२ धावा.
गोलंदाजी :
विनय ३२-६-१०१-१; मिथून ३४-१४-६९-४; अरविंद २१.१-६-६४-२; गोपाळ २७-५-६८-२; नायर ३-०-१०-०; समर्थ ४-१-९-०.