द. आफ्रिका मुसंडी मारणार?
By Admin | Updated: November 22, 2015 04:09 IST2015-11-22T04:09:23+5:302015-11-22T04:09:23+5:30
मोहालीतील पहिली कसोटी जिंकल्यानंतर बंगलोरचा दुसरा सामना पावसात वाहून गेल्याने चार सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडीवर असलेल्या टीम इंडियाने प्रतिस्पर्धी द.आफ्रिकेकडून

द. आफ्रिका मुसंडी मारणार?
तिसरी कसोटी : नागपुरात टीम इंडियाला सावध राहण्याची गरज
नागपूर : मोहालीतील पहिली कसोटी जिंकल्यानंतर बंगलोरचा दुसरा सामना पावसात वाहून गेल्याने चार सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडीवर असलेल्या टीम इंडियाने प्रतिस्पर्धी द.आफ्रिकेकडून सावध राहण्याची गरज आहे. प्रतिस्पर्धी संघ विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियमवर कधीही मुसंडी मारू शकतो.
भारताने जामठा स्टेडियमच्या खेळपट्टीवर २००८ ते २०१२ ला चार वर्षांत चार कसोटी सामने खेळले. त्यातील दोन जिंकले; एक सामना अनिर्णीत राहिला, तर एक सामना गमवावा लागला होता. भारताला या मैदानावर द. आफ्रिकेकडून फेब्रुवारी २०१० मध्ये पराभूत व्हावे लागले. त्यावेळी भारतीय संघ एक डाव सहा धावांनी हरला होता. या मैदानावर भारताने नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या सामन्यात आॅस्ट्रेलियाला १७२ धावांनी आणि नोव्हेंबर २०१० मध्ये न्यूझीलंडला एक डाव १९८ धावांनी नमविले. डिसेंबर २०१२ मध्ये इंग्लंडविरुद्धची कसोटी अनिर्णीत राहिली. द. आफ्रिका संघ यंदा भारत दौऱ्यात टी-२० आणि वन डे मालिकेत विजयी ठरल्यानंतर कसोटीत मात्र फलंदाजी आणि गोलंदाजीत संघर्ष करीत आहे, पण २०१० मध्ये जामठा स्टेडियमवर मिळालेल्या विजयातून कर्णधार हशीम आमलासह संपूर्ण संघ विजयाची प्रेरणा घेऊ शकतो.
२०१० च्या मालिकेत ग्रॅमी स्मिथ आफ्रिकेचा कर्णधार होता. आफ्रिकेने अमलाच्या २५३ आणि जॅक कालिसच्या १७३ धावांच्या बळावर ६ बाद ५५८ धावा उभारून डाव घोषित केला. भारताचा पहिला डावा वीरेंद्र सेहवागच्या १०९ धावानंतरही २३३ धावांत आटोपला. दुसऱ्या डावात सचिनच्या १०० धावानंतरही भारत ३१९ पर्यंतच मर्यादित राहिल्याने सामना हातून निसटला. वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने दोन्ही डावांत एकूण १० गडी बाद केले होते.
सध्याच्या संघातील सलामीवीर मुरली विजय, यष्टिरक्षक रिद्धिमान साहा, लेग स्पिनर अमित मिश्रा, वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा हे २०१० च्या भारतीय संघात होते. विजयने दोन्ही डावांत ४ आणि ३२, साहाने ० आणि ३६ धावा केल्या. मिश्राने ५३ आणि १४० धावा मोजल्या; पण एकही गडी बाद करता आला नव्हता. ईशांतने २८ षटकांत ८५ धावा मोजल्या खऱ्या, पण त्यालाही गडी बाद करता आला नाही. (प्रतिनिधी)
दक्षिण आफ्रिका संघ नागपुरात
महात्मा गांधी-नेल्सन मंडेला कसोटी मालिकेत १-० ने पिछाडीवर असलेल्या हाशिम आमलाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिका संघ तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी शनिवारी नागपुरात दाखल झाला. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांदरम्यान २५ नोव्हेंबरपासून व्हीसीएच्या जामठा स्टेडियममध्ये तिसरा कसोटी सामना खेळल्या जाणार आहे.
दक्षिण आफ्रिका संघाचे कडक सुरक्षा व्यवस्थेत शनिवारी दुपारी ४.४०च्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर दक्षिण आफ्रिका संघातील खेळाडू हॉटेल प्राईडमध्ये पोहोचले. हॉटेलच्या परिसरात युवा चाहत्यांनी खेळाडूंच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. एबी डिव्हिलियर्स आणि हाशिम अमला यांची झलक बघितल्यानंतर चाहत्यांनी त्यांच्या नावाच्या घोषणा करीत त्यांचे स्वागत केले.
दक्षिण आफ्रिका संघाला मोहालीमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात १०८ धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर बंगलोरमध्ये खेळल्या गेलेली दुसरी कसोटी पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत संपली.
दक्षिण आफ्रिका संघाच्या व्हीसीए जामठा स्टेडियमबाबत संस्मरणीय आठवणी आहेत. २००९-२०१० मध्ये हाशिम अलमाने (२५३) येथे द्विशतकी खेळी केली होती, तर वेगवान गोलंदाज डेल स्टेनने पहिल्या डावात ५१ धावांच्या मोबदल्यात ७ बळी घेतले होते. त्या लढतीत स्टेनने १० बळी घेतले होते.