70 वर्षांवरील व्यक्तींना बीसीसीआयचे दरवाजे बंद
By Admin | Updated: January 24, 2017 17:28 IST2017-01-24T17:28:13+5:302017-01-24T17:28:13+5:30
70 वर्षांवरील एकाही व्यक्तीची बीसीसीआयच्या प्रशासनात नेमणूक केली जाणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं यावेळी स्पष्ट केले

70 वर्षांवरील व्यक्तींना बीसीसीआयचे दरवाजे बंद
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - भारतीय क्रिकेट बोर्डाच्या प्रशासकीय कामकाजाची सर्व सुत्रे कोणाच्या हातात द्यायची याचा निर्णय अद्याप झालेला नाही. न्यायमित्र अनिल दिवान व गोपाल सुब्रमणियम यांच्या द्विसदस्यीय समीतीने शुक्रवारी झालेल्या सुनावणीत बीसीसीआय प्रकरणात निर्णय घेण्यासाठी सुचवलेली नऊ नावे सुप्रिम कोर्टाने आज अपात्र ठरवली आहेत. त्याचप्रमाणे 70 वर्षांवरील एकाही व्यक्तीची बीसीसीआयच्या प्रशासनात नेमणूक केली जाणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने आपल्या यापूर्वीच्या आदेशामध्ये सुधारणा केली आहे. पूर्वीच्या आदेशानुसार राज्य संघटना व बीसीसीआयमध्ये एकूण नऊ वर्षे कार्य करणारी व्यक्ती देशातील क्रिकेटच्या या सर्वोच्च संस्थेमध्ये पद भूषविण्यास अपात्र ठरणार होती. सर्वोच्च न्यायालयाने या आदेशामध्ये सुधारणा करताना स्पष्ट केले की, राज्य संघटना किंवा बीसीसीआय यामध्ये एकत्र नऊ वर्षांच्या कार्यकाळाचा विचार करण्यात येणार नाही.