प्रेमविवाहात नैराश्य : सासरच्यांना कंटाळून तरुणाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 12:23 AM2020-02-18T00:23:26+5:302020-02-18T00:24:00+5:30
प्रेमविवाहात नैराश्य : रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा
नवी मुंबई : सासरच्यांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोठ्या मुलीसोबतचा साखरपुडा मोडून लहान बहिणीसोबत प्रेमविवाह केल्याने वाद उद्भवून हा प्रकार घडला आहे.
धनंजय त्रिभुवन असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो मूळचा जळगावचा असून दिघा परिसरात राहायला होता. त्याच परिसरातील एका मुलीसोबत त्याचे लग्न ठरले होते. त्यांचा साखरपुडाही झालेला असताना धनंजय याची होणाºया लहान मेहुणीसोबत फेसबुकवरून ओळख झाली. त्यांच्यातील या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्याने त्याने मोठ्या बहिणीसोबत ठरलेले लग्न मोडून लहान बहिणीसोबत प्रेमविवाह केला होता. यानंतर तो मागील पाच महिन्यांपासून मूळ गावी जळगाव येथे मुक्कामी होता; परंतु काही काळाने तो नोकरीनिमित्ताने पुन्हा दिघा येथे आला होता. या वेळी सुरुवातीला काही दिवस सासू-सासऱ्यांकडेच राहत होता; परंतु त्यांच्याकडून योग्य वागणूक मिळत नसल्याने त्याच परिसरात त्याने भाड्याने घर घेतले होते; परंतु कोणत्या ना कोणत्या कारणावरून सासू-सासºयांसोबत व पत्नीसोबत त्याचे भांडण होऊ लागले. याची माहिती त्याने अनेकदा आईला फोनवरून दिली होती. अखेर सासरच्यांचा जाच वाढल्याने तसेच पत्नीसोबतही पटत नसल्याने त्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेनंतर त्याच्या आईने रबाळे एमआयडीसी पोलिसांकडे सासरच्यांविरोधात तक्रार केली आहे. त्यानुसार शनिवारी रात्री सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.