अर्थसंकल्पाच्या पोतडीतून काय निघणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:27 IST2020-02-18T00:27:11+5:302020-02-18T00:27:32+5:30

स्थायी समितीमध्ये आज होणार सादर : गतवर्षीच्या महत्त्वाकांक्षी घोषणा कागदावरच; निवडणुकीमुळे अर्थसंकल्पाला आले महत्त्व

What will come out of the budget table? | अर्थसंकल्पाच्या पोतडीतून काय निघणार

अर्थसंकल्पाच्या पोतडीतून काय निघणार

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेचा २०२० - २१ साठीचा अर्थसंकल्प मंगळवारी स्थायी समितीमध्ये सादर होणार आहे. गतवर्षी ४०२० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली होती. हे उद्दिष्ट पूर्ण झाले का? हा उत्सुकतेचा विषय आहे. पालिकेच्या आगामी निवडणुकीमुळे या वर्षी अर्थसंकल्पामध्ये नक्की काय घोषणा होणार व गतवर्षीपेक्षा वाढीव उद्दिष्ट दिले जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना जानेवारी १९९२ मध्ये झाली. तीन दशकांच्या वाटचालीमध्ये महापालिकेने आर्थिकदृष्ट्या सक्षम महापालिका म्हणून नावलौकिक मिळविला आहे. १९९५ मध्ये ७९ कोटी ३४ लाख रुपयांचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. प्रत्यक्षात वर्षभरामध्ये १८ कोटी ५८ लाख रुपयेच महसूल जमा झाला होता. यानंतर प्रशासनाने परिश्रम करून उत्पन्नाचा आलेख वाढवत नेला. गतवर्षी आयुक्त डॉ. रामास्वामी एन यांनी ३४५५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. स्थायी समितीने त्यामध्ये ११५ कोटी रुपयांची व महासभेने १३९ कोटी रुपयांची वाढ करून तब्बल ४०२० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली होती.
विक्रमी अर्थसंकल्प असल्यामुळे वर्षभरामध्ये अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु प्रत्यक्षात एकही महत्त्वाकांक्षी योजना पूर्ण होऊ शकली नाही. रस्ते, गटार, पदपथ व इतर कामांवरही मोठी रक्कम खर्च करण्यात आली. महापालिकेची सर्व रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकली नाहीत.पातळगंगा नदीचे पाणी विकत घेण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पही मार्गी लागू शकलेला नाही. भुयारी मार्ग, उड्डाणपूल व इतर योजनाही कागदावरच राहिल्या आहेत.

महापालिकेचा २०२० - २१ साठीचा अर्थसंकल्प मंगळवारी आयुक्त अण्णासाहेब मिसाळ स्थायी समितीमध्ये सादर करणार आहेत. मिसाळ यांचा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे. या पंचवार्षिक कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. गतवर्षीचे विक्रमी उद्दिष्ट साध्य झाले का? व पुढील वर्षासाठी नक्की काय योजना अर्थसंकल्पात असणार आहेत? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून शहरवासीयांना आकर्षित करणाऱ्या योजनांचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे.
महापालिकेने गतवर्षी मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी ‘अभय योजना’ जाहीर केली होती. या अभय योजनेमुळे महसूलामध्ये नक्की किती वाढ झाली? पुढील वर्षासाठी अजून किती वाढ होणार? याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.


वर्षभरात पूर्ण न
झालेल्या योजना
च्२८२ कोटी रुपये खर्च करून पातळगंगा नदीचे पाणी नवी मुंबईपर्यंत घेऊन येणे
च्जुईनगर रेल्वे क्रॉसिंगजवळ
उड्डाणपूल बांधणे
च्ठाणे-बेलापूर रोडवर, पामबीच व घणसोली ते ऐरोलीदरम्यान उड्डाणपूल बांधणे
च्वंडर्स पार्कमधील साडेआठ एकर
जमिनीवर सायन्स पार्कची उभारणी
च्वाशीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा
तरण तलाव बांधणे
च्महापालिकेचे नेरूळ, सीबीडी व ऐरोली रुग्णालय पूर्ण क्षमतेने पूर्ण करणे

प्रशासनाची कसरत
च्आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये स्थायी समिती व सर्वसाधारण सभेमध्ये वाढ होत असते. गतवर्षी या वाढीचा विक्रम झाला होता.
च्स्थायी समितीने ११५ व महासभेने १३९ अशी तब्बल ५६३ कोटी रुपयांची वाढ करण्यात आली होती. यामुळे वाढीव उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रशासनाला वर्षभर कसरत करावी लागली असून किती उद्दिष्ट साध्य होणार हे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

या वर्षीही करवाढ नाही
च्नवी मुंबई महानगरपालिकेने २००५ पासून कोणतीही करवाढ केलेली नाही.
च्शहरवासीयांवर कराचा बोजा न टाकण्याचा निर्णय लोकप्रतिनिधींनी घेतला आहे.
च्२०२० - २१ या वर्षासाठीही कोणतीही करवाढ केली जाणार नाही. करवाढ करायची असल्यास अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी कराच्या रचनेला स्थायी समितीची मंजुरी घेणे आवश्यक असते.
च्अद्याप ती परवानगी घेतलेली नसल्यामुळे करवाढ होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
 

 

Web Title: What will come out of the budget table?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.