सायन-पनवेल बनला समस्यांचा महामार्ग, वाहतूककोंडीमुळे प्रवासी त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 02:21 AM2020-01-19T02:21:22+5:302020-01-19T02:22:32+5:30

या महामार्गावर शनिवारी सायंकाळी ५ वाजता उरण फाटा ते तुर्भे वाहतूक चौकीपर्यंत जवळपास पाच किलोमीटरपर्यंत चक्काजाम झाले होते.

Sion-Panvel became Highway of Problems, Trafficking afflicted passenger | सायन-पनवेल बनला समस्यांचा महामार्ग, वाहतूककोंडीमुळे प्रवासी त्रस्त

सायन-पनवेल बनला समस्यांचा महामार्ग, वाहतूककोंडीमुळे प्रवासी त्रस्त

Next

- नामदेव मोरे
नवी मुंबई : वाहतूककोंडी सोडविण्यासाठी शासनाने दहा वर्षांपूर्वी सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण सुरू केले. खारघर टोलनाका सुरू करूनही पाच वर्षे पूर्ण झाली असून, रुंदीकरणाची सर्व कामे मात्र अद्याप पूर्ण झालेली नाहीत. रखडलेल्या कामांमुळे वारंवार वाहतूककोंडी व अपघात होत असून, प्रवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

महामार्गावर शनिवारी सायंकाळी ५ वाजता उरण फाटा ते तुर्भे वाहतूक चौकीपर्यंत जवळपास पाच किलोमीटरपर्यंत चक्काजाम झाले होते. उरण फाटा येथे उड्डाणपुलाच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्यामुळे वारंवार वाहतूककोंडी होत आहे. जवळपास एक महिना हे काम सुरू राहणार असल्यामुळे वाहतुकीची समस्या कायम राहणार असल्याचेही प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. शनिवार व रविवार दोन दिवस सुट्ट्या असल्यामुळे पुणे व कोकणाकडे जाणाऱ्या नागरिकांमुळे वाहनांची संख्या वाढली आहे. सायंकाळी महामार्गावरील वाहनांची संख्या वाढल्यामुळे पुण्याकडे जाणाºया मार्गावर वाहतूककोंडी झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या मार्गावरून प्रवास करणाºया नागरिकांना २००८ पासूनच या समस्येला सामोरे जावे लागत आहे. वाहतूककोंडी व अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाने जवळपास १२०० कोटी रुपये खर्च करून महामार्गाचे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला. सानपाडा, उरण फाटा येथे उड्डाणपूल बांधला आहे. वाशी, शिरवणे येथेही छोटे पूल बांधले आहेत. आवश्यक त्या ठिकाणी स्कायवॉक व भुयारी पादचारी मार्गांचे नियोजन करण्यात आले होते. महामार्गाचे ८० टक्के काम सुरू झाल्याचा दावा करून ६ जानेवारी २०१५ मध्ये खारघरमध्ये टोलनाका सुरू करण्यात आला.

महामार्गावर टोलनाका सुरू होऊन पाच वर्षे पूर्ण झाली आहेत; परंतु या काळात शिल्लक राहिलेली २० टक्के कामे पूर्ण झालेली नाहीत. महामार्गावरील विद्युत दिवे बहुतांश वेळा बंदच असतात. अंधार असल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. नेरुळ, उरणफाटा, खारघर, कळंबोलीमध्ये महामार्गावर पादचारी भुयारी मार्ग तयार केले आहेत; परंतु अद्याप या भुयारी मार्गांचा वापर सुरू केलेला नाही. भुयारी मार्गाची रचना चुकली असल्याचा दावा प्रवासी करू लागले आहेत. पावसाळ्यामध्ये महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडत असल्यामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीव गमवावा लागत होता. यामुळे खड्डे पडणाºया ठिकाणी काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला.

काँक्रीटीकरणाचे कामही अद्याप पूर्ण झालेले नाही. सद्यस्थितीमध्ये उरण फाटा पुलावरील कॉँक्रीटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामामुळे प्रतिदिन या बेलापूर ते नेरुळ दरम्यान वाहतूककोंडी होत असून, ही समस्या अजून किती दिवस सुरू राहणार, असा प्रश्न प्रवासी विचारू लागले आहेत.

उरण फाटा येथे दुरुस्तीचे काम सुरू आहे. महामार्गावर वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. दोन दिवस सुट्ट्यांमुळे शनिवारी पुणे व कोकणाकडे जाणाºया वाहनांची संख्या वाढल्यामुळे नेरुळ ते जुईनगर दरम्यान वाहतूककोंडी झाली होती.
- किसन गायकवाड, वाहतूक पोलीस निरीक्षक

सायन-पनवेल महामार्गावरील समस्या
1उरण फाटा उड्डाणपुलाची दुरुस्ती सुरू असल्यामुळे सकाळी व सायंकाळी वाहतूककोंडी होत आहे.
2महामार्गावर अनेक ठिकाणी पथदिवे बंद असल्यामुळे अपघात होत आहेत.
3नेरुळ, उरणफाटा, खारघर, कळंबोली परिसरातील पादचारी भुयारी मार्गांचे काम अर्धवट.
4तुर्भे पोलीस स्टेशनजवळील स्कायवॉकचे काम अपूर्णच.
5महामार्गाच्या दोन्ही बाजूने पावसाळी पाणी जाण्यासाठी गटार नाही.
6रोडच्या दोन्ही बाजूला साचणारे मातीचे ढीग साफ करणारी यंत्रणा नसल्यामुळे धूलिकणांचे प्रमाण वाढले आहे.
7अवजड वाहतूकदार नियमांचे उल्लंघन करत असल्याने वाहतूककोंडीमध्ये भर पडत आहे.
8वाशी, सानपाडा, नेरुळ, सीबीडीसह कळंबोलीमध्ये रात्री खासगी बसचालकांमुळे चक्काजाम होत आहे.
9महामार्गावर एसटी बसची प्रतीक्षा करणाºया प्रवाशांसाठी निवारा शेडची कमतरता.

 

Web Title: Sion-Panvel became Highway of Problems, Trafficking afflicted passenger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.