रायगडच्या नकाशातूनही गाढी नदी गायब !
By Admin | Updated: February 14, 2016 03:10 IST2016-02-14T03:10:57+5:302016-02-14T03:10:57+5:30
वर्षानुवर्ष पनवेलकरांची तहान भागविणाऱ्या गाढी नदीचे अस्तित्व अतिक्रमण व प्रदूषणामुळे धोक्यात आले आहे. विमानतळासाठी नदीचे पात्र बदलण्याच्या हालचाली

रायगडच्या नकाशातूनही गाढी नदी गायब !
- नामदेव मोरे, नवी मुंबई
वर्षानुवर्ष पनवेलकरांची तहान भागविणाऱ्या गाढी नदीचे अस्तित्व अतिक्रमण व प्रदूषणामुळे धोक्यात आले आहे. विमानतळासाठी नदीचे पात्र बदलण्याच्या हालचाली सुरू असताना जिल्ह्याच्या नकाशामध्येही गाढी नदीचा समावेश नाही. नदीचे अस्तित्वच नाकारले असल्याने पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली.
मुंबई, नवी मुंबई व रायगड परिसरातील विकासकामांसाठी येथील पर्यावरणाचा प्रचंड ऱ्हास सुरू आहे. सिडकोची स्थापना झाल्यानंतर ठाणे-बेलापूर एमआयडीसीमधील व उरण तालुक्यातील डोेंगर पोखरण्यास सुरुवात केली. येथील डोंगराचे अस्तित्वच नष्ट होत आले आहे. यानंतर मँग्रोज व मोठ्या नाल्यांवर अतिक्रमण करण्यास सुरुवात झाली. ‘लोकमत’ने गाढी नदीच्या काठावर झालेली अतिक्रमणे व नदीपात्रातील प्रदूषणाविषयी वृत्त प्रसिद्ध करताच पर्यावरणप्रेमींनी नदीचे अस्तित्व टिकले पाहिजे, अशी भूमिका व्यक्त केली आहे. अनेकांनी फोन करून गाढी नदीमधील अतिक्रमण व प्रदूषणापेक्षा शासनाने तिचे अस्तित्वच नाकारल्याची माहिती देण्यात आली. रायगड जिल्हा परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ, रायगड जिल्ह्याचे संकेतस्थळ व राज्य शासनाच्या जिल्हानिहाय नद्यांच्या नकाशावर गाढी नदीला स्थानच देण्यात आलेले नाही. गाढी नदी हाच पनवेलकरांचा मुख्य जलस्रोत असल्याचा उल्लेख ४४६ वर्षांपूर्वीच्या दस्तऐवजामध्ये सापडला. शासनाला नदीचा विसर पडल्याने नकाशावरून गाढी गायब केल्यामुळे यापाठीमागे षडयंत्र असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
१० नद्यांचाच उल्लेख
रायगड जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर व राज्य शासनाच्या जिल्ह्याच्या सविस्तर नकाशावर फक्त १० नद्यांचाच उल्लेख आहे. यामध्ये उल्हास, काळू, पाताळगंगा, भोगावती, अंबा, कुंडलिका, सावित्री, घोड व गंधार यांचा समावेश आहे. पनवेलमधील गाढी, मोरबे धरण ज्या नदीवर बांधले त्या मुर्बी नदीचा उल्लेखच नाही.
पनवेल हे भविष्यात महाराष्ट्रातील सर्वात प्रमुख केंद्र असणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे अनेक प्रकल्प येथे उभे राहात आहेत. गाडी नदी ही या शहराचा श्वास आहे. तिचे अस्तित्व नष्ट झाल्यास भविष्यात मिठीप्रमाणे या परिसरात पूर येऊन प्रचंड जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्व पनवेलकरांसह पर्यावरणप्रेमींनी गाडी बचाव अभियान राबविण्याची गरज आहे.
- सुकुमार किल्लेदार, अध्यक्ष,
सेव्ह मँग्रोज अँड नवी मुंबई एक्झिस्टन्स