पनवेलमधील वीजपुरवठा सुरळीत; वादळामुळे झाले होते नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 01:32 IST2020-06-18T01:31:59+5:302020-06-18T01:32:09+5:30
महावितरणकडून ग्रामीण भागातील १00 टक्के कामे पूर्ण

पनवेलमधील वीजपुरवठा सुरळीत; वादळामुळे झाले होते नुकसान
- मयूर तांबडे
नवीन पनवेल : चक्रीवादळाने पनवेलमध्ये मोठे नुकसान केले होते. विजेच्या तारांवर झाडे पडल्याने शेकडो खांब खाली कोसळले आणि त्यामुळे अनेकांना अंधारात राहावे लागले होते. अखेर खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले आहे. महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून शहरी आणि ग्रामीण भागातील खंडित झालेला १00 टक्के वीजपुरवठा पूर्ववत केला आहे.
चक्रीवादळामुळे पनवेल शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. वादळ येण्यापूर्वीच महावितरणने अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परिसरातील वीजपुरवठा बंद केला होता. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि जोरदार वाºयामुळे अनेक ठिकाणांचे विद्युत खांब कोलमडून पडले होते, तर काही भागांतील विजेच्या तारा तुटल्या होत्या. विद्युत वाहिन्यांवर झाडे कोसळल्याने मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचाऱ्यांना अनेक ठिकाणी विजेचे खांब खांद्यावरून वाहून न्यावे लागले. महापालिका हद्दीतील पनवेल, नवीन पनवेल, खारघर, कामोठे येथील शहरी भागांतील वीजपुरवठा २४ तासांच्या आत सुरू करण्यात आला होता. मात्र, ग्रामीण भागात वीज सुरू करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाºयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. अनेक ठिकाणी दुर्गम, तसेच जंगली भाग असल्याने विजेच्या खांबांची वाहतूक करण्यासाठीही कसरत करावी लागली.
तालुक्यांमध्ये रस्त्याला लागून असणारे आणि गावाच्या ठिकाणी असणारे विजेचे खांब कोसळून खाली पडले होते. त्यामुळे ज्या ठिकाणी खांब पडले, तेथे ते उभारण्याकडे महावितरणच्या अधिकाºयांनी आपले लक्ष केंद्रित केले होते. चक्रीवादळानंतर विजेचे किती खांब पडले, याचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये खांबांची संख्या शेकडोंच्या घरात होती. खांब उभे करण्यासाठी पडलेल्या झाडांचा मोठा अडथळा होता. ही झाडे हटविण्यासाठी स्थानिक गावकºयांनी कर्मचाºयांना मदत केली. या सर्वांच्या प्रयत्नामुळे वीजपुरवठा १00 टक्के पूर्ववत झाल्याचे महावितरणचे कार्यकारी अभियंता माणिक राठोड यांनी सांगितले. टावरवाडी, मालडुंगे, शिवणसई, दुंदरे पाडा, धोदानी, तसेच आदिवासी वाड्यांवर काही ठिकाणी खांद्यावरून पोल, विजेच्या तारा वगैरे साहित्य वाहून न्यावे लागले. महावितरणच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण, अधीक्षक अभियंता आर. बी. माने, कार्यकारी अभियंता माणिक राठोड, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आर. जे. पाटील, मिलिंद सूर्यतळ, जयदीप नानोटे, विवेक स्वामी यांच्यासह अनेक कनिष्ठ अभियंत्यांनी ही मोहीम यशस्वी केली.
कोसळलेले अडीचशे खांब पुन्हा उभारले
‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणांचे डीपी बॉक्स कोलमडून पडले होते. उच्च दाबाच्या वाहिन्या, लघू दाबाच्या वाहिन्या, विजेचे खांब पडल्याने महावितरणचे करोडो रुपयांचे नुकसान झाले.
खंडित झालेला हा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या शंभरपेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचाºयांनी अहोरात्र परिश्रम घेतले. पनवेल परिसरात जवळपास अडीचशेहून अधिक विजेचे खांब पूर्ववत उभे करण्यात आले.
खारघर, कामोठे, पनवेल, नवीन पनवेल येथील वीज चोवीस तासांच्या आत आली, तर गव्हाण, पारगाव, तळोजे, नेरे येथील वीजपुरवठा सुरळीत करण्यास महावितरणला ४८ तास लागले.
शहरी भागांतील वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर, खारघर, कलंबोली आणि शहर येथील अभियंत्यांनी ग्रामीण भागांत (गाव, वाडी, पाडे) जाऊन काम केले.