पाणीटंचाईवर जलदानाचा पर्याय
By Admin | Updated: April 22, 2016 02:08 IST2016-04-22T02:08:31+5:302016-04-22T02:08:31+5:30
तालुक्यात १४ गावे आणि ३४ आदिवासी वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. हा शासनाने तयार केलेला पाणीटंचाई आराखडा आहे. मात्र त्यापेक्षाही जास्त गावे आणि वाड्यांमध्ये पाणीटंचाई आहे.

पाणीटंचाईवर जलदानाचा पर्याय
कर्जत : तालुक्यात १४ गावे आणि ३४ आदिवासी वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. हा शासनाने तयार केलेला पाणीटंचाई आराखडा आहे. मात्र त्यापेक्षाही जास्त गावे आणि वाड्यांमध्ये पाणीटंचाई आहे. या वाड्यांमधील अनेक महिलांना डोक्यावर चार-चार हंडे घेऊन एक किलोमीटरपेक्षा जास्त पायपीट पाण्यासाठी करावी लागत आहे. हे चित्र लक्षात घेऊन कर्जतमधील जलदूतांनी जशी लातूरकरांची तहान भागविली तसेच या आदिवासींना पाणी द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
महिला वयोमानाप्रमाणे जमेल तशी भांडी घेवून पाणी भरण्यासाठी निघतात. काही ठिकाणी तर कोरड्या पडलेल्या नदीच्या पात्रात डवरे खोदून मिळेल तेवढे पाणी भरण्याचा प्रयत्न करत आहेत. टंचाईग्रस्त गावांचा व वाड्यांचा आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयात गेला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यावर या गावासाठी पाण्याचे टँकर मिळतील. मात्र तोपर्यंत या भगिनींना पाण्यासाठी दाहीदिशा फिरावे लागेल. माणुसकीच्या नात्यातून लातूरमधील तहानलेल्यांना पाणी पुरविण्याचे पुण्याचे काम करत आहेत. जलदान करणाऱ्या त्या संस्था, वैयक्तिक जलदान करणाऱ्या व्यक्ती यांनी पुढे येऊन कर्जत तालुक्यातील एक-एक वाडी दत्तक घेतली आणि त्यांना एक दिवसाआड पाण्याचा टँकर पुरविला. कर्जत तालुक्यातील गावांची आणि वाड्यांची पाणीटंचाई दूर होईल, असे येथील नागरिकांचे मत आहे. (वार्ताहर)
> माजी विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी
१नेरळ : कर्जत तालुक्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील जनतेला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन, आपली समाजाप्रती असलेली सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न नेरळ विद्या मंदिर शाळेच्या माजी विद्यार्थी यांच्या एका वर्गातील सहकाऱ्यांनी के ला आहे. त्यानुसार खांडस भागातील काही आदिवासी वाड्यांमध्ये ते माजी विद्यार्थी टँकरने पाणीपुरवठा करीत आहेत. अगदी पावसाळा सुरु वात होईपर्यंत तेथे पाणीपुरवठा करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.२प्रवीण रामचंद्र ब्रम्हांडे याने आपल्या वडिलांकडून समाजसेवेचा वसा घेतला आहे. पाणीटंचाईग्रस्त गाव पाड्यांना भेट देवून नेरळ विद्या मंदिरच्या माजी विद्यार्थ्यांनी दोन महिने टँकरने पाणीपुरवठा करण्याचे कार्य हाती घेतले आणि माणुसकीचे दर्शन घडवले. ९६-९७ च्या बॅचचे सदस्य सोशल मीडियावर एकत्र आले. तेव्हा प्रवीण ब्रह्मांडे यांनी वर्गमित्रांंच्या मदतीने केवळ सामाजिक बांधिलकीचे संदेश देणाऱ्या पोस्ट न टाकता प्रत्यक्ष कृतीतून सामाजिक बांधिलकी जोपासली.३तालुक्यातील काटेवाडी, बेलाचीवाडी, अंबरपाडा, बांगरवाडी, ढाब्याचीवाडी, पेटरवाडी, खांडस या गावना स्व:ता वर्गणी काढून दररोज पाणी पुरविण्याचा निर्णय घेतला असून त्याची सुरु वात देखील के ली. हा उपक्र म ३१ मेपर्यंत सुरु राहणार आहे. प्रवीण ब्रह्मांडे, नरेश पवार, प्रभाकर जाधव, अमित ठाकूर, प्रवीण मोरगे, संदीप उतेकर, समीर शेख, विनायक बिडकर, केदार खडे, पराग तावडे, जगदीश डबरे, अरविंद ठोंबरे, रितेश भालेराव, प्रीतम पाटील आदींनी या कामी स्वत:ला झोकून दिले आहे.
> जैन बांधव भागवणार ओलमणची तहान
नेरळ : तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या ओलमण येथील ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी नेरळ जैन संघाने पुढाकार घेतला आहे. तेथील विहिरीमध्ये एकावेळी दोन टँकर ओतून या उपक्र माचा शुभारंभ करण्यात आला.
सुमारे १०० घरांची लोकवस्ती असलेल्या ओलमण गावाला पाणीपुरवठा करणारी नळ पाणी योजना अनेक वर्षे बंद आहे. बोरगाव ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या ओलमण गावासाठी दोन विहिरी खोदल्या आहेत, परंतु या विहिरींनी जानेवारी महिन्यातच तळ गाठल्याने पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. ओलमण गाव उंचावर असल्याने आदिवासी महिलांना दुसऱ्या गावातील विहिरीवरून पाणी आणण्यासाठी डोंगर उतरून जावे लागते. प्रत्येक उन्हाळ्यात चार महिने आदिवासींना पाण्यासाठी भटकावे लागते. याठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यातही लोकप्रतिनिधी तसेच स्थानिकांचे दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
आदिवासी वाडीतील पाणीसमस्या सोडविण्यासाठी नेरळमधील जैन सकल संघ आणि श्री जैन संघ यांनी पुढाकार घेत टंचाईग्रस्त गावाला पाणीपुरवठा सुरु केला आहे. गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र हे पाणी गावातील विहिरीत टाकण्यात येऊन त्यानंतर वितरीत करण्यात येते. (वार्ताहर)