भाजपा करतेय जवानांच्या शौर्याचे राजकारण - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2019 11:36 IST2019-03-17T06:08:28+5:302019-03-17T11:36:21+5:30
भारतीय जवानांच्या शौर्याचे भाजपा सरकार राजकारण करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. शहीद जवानांच्या कुटुंबीयांनीच भाजपाला या संदर्भात फटकारले

भाजपा करतेय जवानांच्या शौर्याचे राजकारण - शरद पवार
नवी मुंबई - भारतीय जवानांच्या शौर्याचे भाजपा सरकार राजकारण करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. शहीद जवानांच्या कुटुंबीयांनीच भाजपाला या संदर्भात फटकारले असून, किमान याबाबतीत तरी राजकारण करू नका, असे आर्जव या कुटुंबीयांकडून केले जात असल्याचे पवार यांनी सांगितले.
ठाणे लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या प्रचारार्थ नवी मुंबईच्या कोपरखैरणे येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी पवार बोलत होते. मागील निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी यांनी जनतेला अनेक स्वप्ने दाखविली. परदेशातील काळा पैसा भारतात आणण्याचे आश्वासन जनतेला दिले, नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम झाले आहेत. बेरोजगारी वाढली, अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, असा आरोप पवार यांनी केला.
संरक्षण कार्यालयातून राफेल कराराची कागदपत्रे चोरीला जातात. ही बाब देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने गंभीर आहे. ज्यांना साधे कागदपत्रे सांभाळता येत नाहीत, ते देशाचे संरक्षण काय करणार, असा टोलाही त्यांनी लगावला.
पवारांनी सिंचन घोटाळा केला नसता, तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसत्या - सुभाष देसाई
पनवेल : अजित पवार यांनी हजारो कोटीचा सिंचन घोटाळा केला
नसता, तर शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागली नसती, अशी टीका उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी
येथे केली. मावळ मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा कल जाणून घेण्यासाठी सेना-भाजपा युतीची संयुक्त बैठक पनवेलमध्ये पार पडली. या वेळी ते बोलत होते.
मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्या अनुषंगाने देसाई यांनी थेट अजित पवार यांच्यावर टीका केली. पवार हे सिंचन घोटाळ्यातील पैसा निवडणुकीत वापरणार आहेत. भ्रष्टाचाराच्या पैशावर निवडणुका लढणाºया पवार कुटुंबीयांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहन देसाई यांनी उपस्थितांना केले.
रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या वेळी मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, मनोहर भोईर, निरंजन डावखरे, देवेंद्र साटम, बाळासाहेब पाटील, शिरीष घरत, बबन पाटील आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.