पनवेलमधील बससेवेला पोलीस सुरक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2016 02:19 IST2016-04-23T02:19:12+5:302016-04-23T02:19:12+5:30
पनवेल परिसरातील रिक्षावाले मनमानी भाडे आकारतात. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी शहरात बससेवा सुरू करण्यात आली आहे

पनवेलमधील बससेवेला पोलीस सुरक्षा
पनवेल : पनवेल परिसरातील रिक्षावाले मनमानी भाडे आकारतात. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी शहरात बससेवा सुरू करण्यात आली आहे. एनएमएमटीकडून सुरू करण्यात आलेल्या बससेवेला रिक्षावाल्यांकडून सातत्याने विरोध होत आहे.
करंजाडे येथून नव्याने सुरू केलेली बस सेवा बंद पाडण्यासाठी रिक्षाचालकांचा प्रयत्न सुरू आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे रिक्षाचालकांच्या विरोधाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाठिंबा दर्शवला आहे. मात्र वाहतूक पोलिसांनी कोणत्याही परिस्थितीत प्रवासांच्या बाजूने उभे राहणार असल्याची भूमिका घेतली आहे.
पनवेल शहराबरोबरच नवीन पनवेल, खांदा वसाहत, कामोठे, कळंबोली, खारघर, रोडपाली, उलवे, तळोजा हे नोड सिडकोने विकसीत केले आहेत. या ठिकाणची लोकवस्ती दिवसन्दिवस वाढत आहे. मुंबई आणि उपनगरात नोकरी करणारे चाकरमानी या भागात जास्त राहतात. ते दररोज उपनगरीय रेल्वे गाडयांनी ये जा करता. मात्र रेल्वेस्थानकापर्यंत पोहचण्याकरीता अंतर्गत वाहतुक व्यवस्थेवर अवलंबून रहावे लागते. याशिवाय अंतर्गत प्रवासाकरीता पूर्वी रिक्षाशिवाय पर्याय नव्हता. तीनआसनी रिक्षाचालकांनी मक्तेदारीमुळे आजपर्यंत मीटर डाऊन केलेला नाही. त्याचबरोबर प्रत्येक वसाहतीत स्थानिक रिक्षावाल्यांची मक्तेदारी असल्याचा भार प्रवाशांना सहन करावा लागतो. एनएमएमटीने सुरुवातीला मानसरोवर, खांदेश्वर ही कामोठे वसाहतीत अंतर्गत बससेवा सुरू करण्यात आली. त्यानंतर रोडपाली - मानसरोवर ही बस सुरू करण्यात आली. यावेळी स्थानिक रिक्षावाल्यांनी प्रचंड विरोध केला, बस अडवण्याचेही प्रकार झाले. मात्र तरीही बससेवा सुरूच राहिली. त्यानंतर सुरू करण्यात आलेल्या खांदेश्वर ते विचुंबे बससेवेलाही विरोध झाला.
चार दिवसापूर्वी करंजाडे-पनवेल रेल्वेस्थानक या दरम्यान बस सुरू करण्यात आली. या सेवेमुळे स्थानिक रिक्षावाल्यांच्या मक्तेदारीला आळा बसला आहे. रिक्षावाल्यांनी या विरोधात आंदोलन करण्याची भूमिका घेतली. याप्रकरणी रिक्षाचालकांची समजूत काढण्याऐवजी आमदार प्रशांत ठाकूर यांनीही त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. इतकेच नव्हे तर ही बससेवा शहरातील ठरावीक मार्गावरून सुरू ठेवावी, अशा सूचनाही केल्या. ठाकूर यांच्या भूमिकेमुळे बस प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अरविंद साळवे यांनी गुरूवारी बैठक बोलावली होती. त्यावेळी साळवे यांनी कोणत्याही परिस्थितीत बससेवा बंद होणार नसल्याची भूमिका घेतली.