चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांची जागृती

By Admin | Updated: April 21, 2016 02:14 IST2016-04-21T02:14:08+5:302016-04-21T02:14:08+5:30

सुटीच्या दिवसांत वाढणाऱ्या चोऱ्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विष्णूनगर पोलिसांनी जागृतीसाठी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सदस्यांच्या बैठका घेण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.

Police awakening to prevent thieves | चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांची जागृती

चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांची जागृती

आकाश गायकवाड,  डोंबिवली
सुटीच्या दिवसांत वाढणाऱ्या चोऱ्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विष्णूनगर पोलिसांनी जागृतीसाठी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सदस्यांच्या बैठका घेण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार, पोलीस अधिकारी आणि तीन बीटमार्शलचे सहा जण दररोज १५ सोसायट्यांना भेट देत आहेत. चोरांपासून सावध राहण्यासाठी कोणती दक्षता घ्यायची, याबाबत ते रहिवाशांना माहिती देत असल्याचे विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इंद्रजित कार्ले यांनी सांगितले.
घरफोड्या, सोनसाखळी चोऱ्या, रस्त्यांत होणारी फसवणूक व लूटमार, बाजारात खरेदीसाठी गेलेल्यांचे पैसे-दागिने चोरणे, प्रवासात बॅगा चोरणे, वाहनचालकांचे लक्ष चुकवून वाहनांतील सामान, पैसे, मौल्यवान वस्तू, लॅपटॉप लांबवण्याच्या घटना घडल्या आहेत. पाळत ठेवून चोरांच्या टोळ्या दिवसा, दुपारी घरफोड्याही करत आहेत. घरातील मंडळी बाहेर गेली की अर्ध्या तासात, तासाभरात चोर घरे साफ करून नेत आहेत. हे गुन्हे एवढ्या सफाईदारपणे केले जातात की, शेजाऱ्यांनाही त्याची कल्पना येत नाही. नागरिकांचा निष्काळजीपणा आणि आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती त्याला कारणीभूत ठरते. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अगर विक्रेता म्हणून इमारतीत शिरलेल्या व्यक्तींनीही चोऱ्या केल्याच्या घटना आहेत.
सध्या सुटीच्या दिवसांमुळे गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सुटीत अनेकजण गावी, पर्यटनाला जातात. त्यामुळे अशा बंद घरांवर चोरटे पाळत ठेवून तेथे घरफोडी करतात. घरमालक परतल्यानंतरच अशा घटना उघडकीस येतात. त्यामुळे त्यांचा तपास लागणेही कठीण होते. त्यापार्श्वभूमीवर पोलिसांनी ही मोहीम हाती घेतली.
बाजारात तसेच इमारतीत आजूबाजूला घडणाऱ्या हालचालींवर, अनोळखी व्यक्तींवर लक्ष ठेवावे, विनाकारण ओळख वाढवून बोलू पाहणाऱ्या आणि लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपासून सावध राहावे. बाहेरगावी जाताना घरे व्यवस्थित बंद करावीत.
चांगल्या दर्जाची मजबूत कुलुपे वापरावीत. दाराचे कडीकोयंडे बनवताना शोभेपेक्षा मजबुतीवर भर द्यावा. खिडक्या व झरोके, मागील दरवाजे यांना लोखंडी जाळ्या बसवाव्यात, असे विविध सल्ले पोलीस देत आहेत.

Web Title: Police awakening to prevent thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.