एनएमआयए ते मुंबई; कोणते मार्ग, कोणती साधने? नवी मुंबई विमानतळावरून घर गाठण्यासाठी रस्ता, रेल्वे, बस असे पर्याय उपलब्ध
By कमलाकर कांबळे | Updated: December 26, 2025 09:11 IST2025-12-26T09:10:49+5:302025-12-26T09:11:20+5:30
नवी मुंबई विमानतळ ते मुंबई ठाण्यातील आपले इच्छीत स्थळ गाठताना वाहतूक कोंडी, प्रवासाचा वेळ, टोल आणि इंधनावरील खर्च यामुळे हा प्रवास जिकिरीचा ठरणार आहे. यात ‘जेएनपीए’तील अवजड वाहतुकीची भर पडणार आहे.

एनएमआयए ते मुंबई; कोणते मार्ग, कोणती साधने? नवी मुंबई विमानतळावरून घर गाठण्यासाठी रस्ता, रेल्वे, बस असे पर्याय उपलब्ध
- कमलाकर कांबळे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (एनएमआयए) गुरुवारपासून व्यावसायिक उड्डाणांसाठी खुले झाले. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवाशांसाठी दळणवळणाच्या विविध सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. विमानतळावरून मुंबई आणि ठाण्याकडे जाण्यासाठी रस्ता, रेल्वे व बस असे विविध पर्याय आहेत. मात्र नवी मुंबई विमानतळ ते मुंबई ठाण्यातील आपले इच्छीत स्थळ गाठताना वाहतूक कोंडी, प्रवासाचा वेळ, टोल आणि इंधनावरील खर्च यामुळे हा प्रवास जिकिरीचा ठरणार आहे. यात ‘जेएनपीए’तील अवजड वाहतुकीची भर पडणार आहे.
स्वतःचे वाहन वापरणाऱ्या प्रवाशांसाठी रस्ते जाळे उपलब्ध
आहे. अटल सेतू, सायन–पनवेल महामार्ग, जुना मुंबई पुणे महामार्ग, पामबीच रोड, तसेच ठाणे–बेलापूर मार्गाने विमानतळ गाठता येते. इंधन व टोलचा खर्च धरल्यास मुंबईसाठी सुमारे ७०० ते १००० रुपये, तर ठाण्यासाठी ५०० ते ७०० रुपये इतका खर्च येतो, अशी माहिती वाहतूकतज्ज्ञांनी दिली.
‘दिबां’चे नाव हवे होते : डॉ. संजीव नाईक
माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांनी सहकुटुंब बंगळूर ते नवी मुंबई विमान प्रवास केला. विमानतळावर उतरल्यानंतर त्यांनी नवी मुंबई विमानतळाच्या उभारणीसाठी संसदेत केलेल्या पाठपुराव्याची आठवण करून दिली.
विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव दिले असते, तर ते अधिक आनंददायी ठरले असते, असेही डॉ. नाईक म्हणाले.
लोकलचाही पर्याय उपलब्ध
रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विमानतळावरून पनवेल, सीबीडी बेलापूर किंवा नेरूळ, तसेच तरघर या जवळच्या रेल्वेस्थानकांपर्यंत बस किंवा टॅक्सीने जाता येते. तेथून हार्बरमार्गे मुंबई व ठाण्याकडे लोकल उपलब्ध आहे. या पर्यायात अंदाजे खर्च १०० ते २५० रुपयांपर्यंत असून वेळ साधारण दीड तास लागतो. पण वेळ महत्त्वाचा असल्यास टॅक्सी आणि खर्च कमी ठेवायचा असल्यास रेल्वे हा पर्याय उपयुक्त आहे.
बसने दोन तास प्रवास, तिकीट २०० ते ३००
एसटी, बेस्ट आणि नवी मुंबई महापालिका परिवहन (एनएमएमटी) उपक्रमाच्या बससेवा विमानतळ ते नवी मुंबईतील विविध नोड्स, ठाणे आणि मुंबईकडे टप्प्याटप्प्याने सुरू केल्या आहेत. बसने ठाण्यापर्यंत जाण्यास ९० ते १२० मिनिटे लागतात आणि तिकीट दर १५० ते २५० रुपयांदरम्यान आहे. मुंबईकडे कुर्ला, दादर किंवा बीकेसीमार्गे जाणाऱ्या बससाठी २०० ते ३०० रुपये खर्च येतो. नवी मुंबईतील पाच रेल्वेस्थानकांवरून ‘एनएमएमटी’ने विमानतळासाठी बससेवा सुरू केली आहे.
टॅक्सीसह ॲपआधारित कॅब सोयीचे; परंतु खर्चिक
थेट आणि आरामदायी प्रवासासाठी टॅक्सी किंवा ॲपआधारित कॅब सेवा हा सर्वाधिक पसंतीचा पर्याय ठरत आहे. विमानतळ परिसरात प्रीपेड टॅक्सीसह ॲपआधारित कॅब सहज उपलब्ध आहेत.
ठाण्यापर्यंत साधारण ३५ ते ४० किलोमीटर अंतर असून यासाठी ६० ते ९० मिनिटांचा वेळ लागतो. यासाठी अंदाजे १,२०० ते १,६०० रुपये खर्च अपेक्षित आहे. मुंबई शहरात, विशेषतः मध्य किंवा दक्षिण मुंबईकडे प्रवास करायचा असल्यास अंतर ४५ ते ५५ किलोमीटर आहे.
त्यासाठी अटल सेतू किंवा सायन–पनवेल महामार्गाचा वापर करता येईल. या प्रवासासाठी ९० ते १२० मिनिटे लागतात आणि खर्च साधारण १३०० ते १,८०० रुपयांपर्यंत जातो.
कळंबोली, किल्ले गावठाणजवळ कोंडीमुळे पडणार अडचणीत भर
विमानतळावरून अटल सेतू वगळता इतर मार्गाने जाण्यासाठी कळंबोली जंक्शन आणि पाम बीच मार्गे जायच्या झाल्यास नवी मुंबई महापालिका मुख्यालयाजवळीत किल्लेगाण जंक्शन येथे अनेक रस्ते एकत्र येत असल्याने नेहमीच बॉटलनेक होऊन कोंडी होते. आता विमानतळ सुरू झाल्याने या कोंडीत आणखी भर पडणार आहे.