देखभाल शाखेचे अधिकारी सुटीवर
By Admin | Updated: June 21, 2016 01:44 IST2016-06-21T01:44:32+5:302016-06-21T01:44:32+5:30
नवी मुंबई महानगरपालिकेने मसाला मार्केटमधील अतिक्रमणांवर कारवाई करताच एपीएमसीमध्ये खळबळ उडाली आहे. देखभाल शाखेच्या निष्काळजीपणाविषयी नाराजी व्यक्त होत

देखभाल शाखेचे अधिकारी सुटीवर
नामदेव मोरे, नवी मुंबई
नवी मुंबई महानगरपालिकेने मसाला मार्केटमधील अतिक्रमणांवर कारवाई करताच एपीएमसीमध्ये खळबळ उडाली आहे. देखभाल शाखेच्या निष्काळजीपणाविषयी नाराजी व्यक्त होत असताना अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता सुटीवर गेले आहेत. आणीबाणीच्या प्रसंगी पुरवठा अधिकारी सुटीवर गेल्याने तर्क -वितर्कांना उधाण आले असून अतिक्रमणाचे खापर विकास शाखेवर फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.
आशिया खंडातील प्रमुख सहकारी संस्था असणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अतिक्रमण घोटाळा समोर येवू लागला आहे. महानगरपालिकेची परवानगी न घेताच पाचही मार्केटमध्ये व्यापाऱ्यांनी पोटमाळे व धान्य मार्केट वगळता इतर चार मार्केटमध्ये वाढीव मजल्यांचे काम करण्यात आले आहे.
महानगरपालिकेने २०१० मध्ये एमआरटीपीअंतर्गत नोटीस देवूनही अतिक्रमणे थांबविली नाहीत. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एपीएमसीमधील अतिक्रमणावर धडक कारवाई सुरू केली आहे. मसाला मार्केटमधील ३१ गाळे सील करून संबंधित व्यापाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. यामुळे मार्केट आवारामध्ये खळबळ माजली आहे. वास्तविक बाजार समितीच्या पाचही मार्केटला संरक्षण भिंत आहे. आवक व जावक गेटवर चोवीस तास सुरक्षा रक्षक तैनात असतात. यानंतर अनधिकृत बांधकाम झालेच कसे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अतिक्रमणाचे खापर देखभाल शाखेवर फुटू लागले आहे.
महानगरपालिकेने मसाला मार्केटमध्ये कारवाई करण्याची स्पष्ट भूमिका घेताच व्यापाऱ्यांनी सचिवांसोबत बैठक घेतली होती. बैठकीमध्येही अभियंत्यांना जबाबदार धरले होते. मार्केटमध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण होताच कार्यकारी अभियंता आर. आर. खिस्ते सुटीवर गेले आहेत. एक महिन्याच्या दीर्घ सुटीवर गेल्यानंतर काही दिवसांमध्ये अधीक्षक अभियंता व्ही. बी. बिराजदारही जवळपास दोन आठवड्यांच्या सुटीवर गेले आहेत. बाजार समितीमधील सर्व अभियंत्यांच्या बदल्या केल्या आहेत. मसाला मार्केटमध्ये बदली केलेल्या अभियंत्यांनीही अचानक सुटी घेतली आहे. अधीक्षक अभियंत्यांसह जवळपास चार अधिकारी सुटीवर गेले असल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे. देखभाल शाखा भूमिगत झाली असल्याचे बोलले जात आहे. बाजार समितीमध्ये महानगरपालिकेच्या कारवाईमुळे अतिक्रमणास अभय देणारांचे धाबे दणाणले आहे. देखभाल शाखेतील अभियंते प्रत्येक मार्केटमध्ये आहेत. यानंतरही विनापरवाना बांधकाम झाले असल्याने सचिवांनी अधीक्षक अभियंता व्ही. बी. बिराजदार यांना कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे. सर्व खापर देखभाल शाखेवर फुटण्याची शक्यता निर्माण झाल्याने आता अतिक्रमणाशी आमचा काही संबंध नाही. तो विकास शाखेचा विषय असल्याचा युक्तिवाद केला जात आहे. यामुळे भविष्यात अतिक्रमण हा विषय मंत्रालयामार्फत गाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
देखभाल शाखेचे
स्वतंत्र संस्थान
बाजार समितीमध्ये देखभाल शाखेचे स्वतंत्र संस्थान तयार झाले आहे. अभियंत्यांच्या कामावर कोणाचेच नियंत्रण राहिले नाही. एपीएमसीमधील संगणकीकरणाचे काम पूर्ण झाले नाही. संस्थेचे तीन कोटी रुपये पाण्यात गेले. धान्य व मसाला मार्केटमधील काँक्रीटीकरणाचे कामही ठेकेदाराने पूर्ण केले नाही. प्रवेशद्वार फळ मार्केटमधील नवीन इमारत सर्व कामे अर्धवट स्थितीमध्ये आहेत. एपीएमसीमधील १३ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गत आठ वर्षामध्ये निलंबनाची कारवाई झाली आहे. परंतु एपीएमसीचे करोडो रुपयांचे नुकसान झाल्यानंतरही या कालावधीमध्ये एकाही अभियंत्यावर कारवाई झालेली नाही. यामुळे देखभाल शाखेव्यतिरिक्त इतर अधिकारी व कर्मचारीही नाराजी व्यक्त करू लागले आहेत.