आघाडी सरकारमध्ये समन्वयाचा अभाव, फडणवीस यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 05:12 AM2020-07-05T05:12:15+5:302020-07-05T06:47:08+5:30

आघाडीतील नेत्यांनी आपल्यातील वाद दूर करून किमान निर्णय प्रकियेत तरी आम्ही एक आहोत, अशा प्रकारची परिस्थिती बाहेर दिसली पाहिजे. विशेषत: आघाडीतील तीनही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे.

Lack of coordination in alliance government, criticizes Fadnavis | आघाडी सरकारमध्ये समन्वयाचा अभाव, फडणवीस यांची टीका

आघाडी सरकारमध्ये समन्वयाचा अभाव, फडणवीस यांची टीका

googlenewsNext

नवी मुंबई - कोरोनासारख्या परिस्थितीत सरकार एक निर्णय घेत आहे, तर सरकारमध्ये असलेल्या राजकीय पक्षांचे मंत्री वेगळा निर्णय घेत आहेत. आघाडी सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने वारंवार निर्णय बदलले जात असल्याची टीका विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी कोविड रुग्णालये आणि सुविधांचा आढावा घेण्यासाठी फडणवीस नवी मुंबई आणि पनवेलमध्ये आले होते. त्या वेळी नवी मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आघाडीतील नेत्यांनी आपल्यातील वाद दूर करून किमान निर्णय प्रकियेत तरी  आम्ही एक आहोत, अशा प्रकारची परिस्थिती बाहेर दिसली पाहिजे. विशेषत: आघाडीतील तीनही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. कोरोनाच्या लढाईत आम्ही सरकारच्या सोबत असल्याचे फडणवीस म्हणाले.
नवी मुंबईतील बाजारपेठेमधून शहरात कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर झाले असून, या ठिकाणी स्क्रीनिंग आणि जलद टेस्टिंग करण्याची गरज आहे. खासगी रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू झाली पाहिजे. रुग्णालयांनी बिलासाठी तगादा लावू नये, यासाठी महापालिकेने व्यवस्था उपलब्ध केली पाहिजे, अशा सूचना महापालिका आयुक्तांना केल्या असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार गणेश नाईक, मंदाताई म्हात्रे, रवींद्र चव्हाण, निरंजन डावखरे, प्रसाद लाड, नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी खासदार संजीव नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते.

नवीन वाहने घेणे प्राथमिकता नाही
कोरोनाचे संकट असताना मंत्र्यांनी नवीन वाहने घेण्यासाठी प्राथमिकता देण्याची गरज नसल्याचे फडणवीस यांनी सांगत, वाहनामध्ये काही समस्या असल्यास स्वत:ची वाहने वापरली जाऊ शकतात. अनेक कर्मचाऱ्यांचे पगार कपात करण्यात आले आहेत. दिवसरात्र कर्तव्य निभावणाºया पोलिसांना आवश्यक बाबी देण्यासाठी मागे-पुढे पाहिले जाते. अनावश्यक कामे केली जात असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. कोरोनाची परिस्थिती स्थिर झाल्यावर नवीन वाहने खरेदी करता येतील, असे ते म्हणाले.
कार्यकारिणीत कोणालाही डावलले नाही
भारतीय जनता पक्षाची नुकतीच कार्यकारिणी जाहीर झाली. त्याविषयी फडणवीस म्हणाले, भाजपची कार्यकारिणी जम्बो आहे. राज्यात १२ उपाध्यक्ष, १२ मंत्री, ५ महामंत्री असतात. कार्यकारिणीमध्ये काही सदस्य, काही निमंत्रित आणि काही विशेष निमंत्रित असतात. त्याप्रमाणे, सर्वसमावेशक कार्यकारिणी झालेली आहे. त्यामुळे यामध्ये कोणाची काही फारशी नाराजी नसेल, असे वाटत असल्याचे फडणवीस म्हणाले.

Web Title: Lack of coordination in alliance government, criticizes Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.