कलावंतीण गडाचे शिखर सर करणे सोपे होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 01:11 IST2020-03-02T01:11:29+5:302020-03-02T01:11:38+5:30
पनवेलजवळील कलावंतीण गडाचे शिखर चढणे, यापुढे सोपे होणार आहे.

कलावंतीण गडाचे शिखर सर करणे सोपे होणार
नवी मुंबई : पनवेलजवळील कलावंतीण गडाचे शिखर चढणे, यापुढे सोपे होणार आहे. वनविभागाने शेवटच्या टप्प्यात शिडी बसविणे प्रस्तावित केले आहे. शिडीमुळे प्रत्येक पर्यटकाला शिखरावर जाता येणार असून, अपघाताचा धोकाही कमी होणार आहे.
गिर्यारोहकांसाठी आव्हानात्मक समजल्या जाणाऱ्या शिखरांमध्ये पनवेलजवळील कलावंतीण गडाचा समावेश होतो. प्रबळगडला लागून असलेल्या कलावंतीणची उंची जवळपास २,२५० फूट आहे. गडावर जाण्यासाठी खडक फोडून पायºया तयार करण्यात आल्या आहेत. शेवटच्या टप्प्यातील जवळपास १५ फुटांचे अंतर चढण्यासाठी काहीही सुविधा नव्हती. यामुळे संयुक्त वनसमितीने दोर लावला आहे. दोरखंडाच्या साहाय्याने पर्यटक शिखरावर जात असतात; परंतु लहान मुले व ज्यांना दोरचा वापर करता येत नाही, अशा पर्यटकांना शिखरावर जाता येत नाही. कलावंतीण गडावर यापूर्वी अपघातही झाले आहेत. यामुळे गडावर शिडी बसविण्याची मागणी पर्यटकांकडून करण्यात येत होती. या मागणीची दखल घेऊन वनविभागाने शिडी बसविणे प्रस्तावित केले आहे. प्रत्यक्षात शिडी बसविल्यानंतर पर्यटकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. पायºया चढून वरती जाणाºया प्रत्येकाला शिखरावर जाणे सोपे होणार आहे. लवकरात लवकर शिडी उभारावी, अशी मागणी पर्यटकांनीही केली आहे.
कलावंतीण व प्रबळगडला भेट देणाºया पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. डिसेंबर २०१८ पासून जानेवारी २०२० पर्यंत १८ हजारांपेक्षा जास्त पर्यटकांनी गडाला भेट दिली आहे.
>प्रबळगड परिसरामध्ये पर्यटकांची संख्या वाढावी व त्यांना आवश्यक सुविधा मिळावी, यासाठी वनविभाग व संयुक्त वनसमिती कार्यरत आहे. कलावंतीण गडाच्या शिखरावर जाण्यासाठी शिडी बसविणेही प्रस्तावित केले असून, लवकरच याची अंमलबजावणी करण्यात येईल.
- एन. एन. कुप्ते,
सहायक वनसंरक्षक, पनवेल
>यापूर्वी झाले
आहेत अपघात
कलावंतीण गडावर यापूर्वी अनेक अपघात झाले आहेत. डिसेंबर २०१६ मध्ये हैदराबादमधून आलेल्या रचिता गुप्ता कनोडीया या कड्यावरून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. फेब्रुवारी, २०१८ मध्ये चेतन धांडे या तरुणाचाही गडावरून पडल्याने अपघात झाला होता. अशाप्रकारचे अपघात होऊ नये, यासाठी स्थानिक ग्रामस्थ व वनविभाग विविध उपाययोजना राबवत आहे.