१०८५ पदांना सरकारची मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2016 02:21 IST2016-04-23T02:21:27+5:302016-04-23T02:21:27+5:30
पालिकेच्या आरोग्य विभागामध्ये नोकरभरती करण्याचा प्रस्ताव शासनस्तरावर अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. आमदार मंदा म्हात्रे यांच्यासह महापौर व प्रशासनाने मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू केला होता

१०८५ पदांना सरकारची मंजुरी
नवी मुंबई : पालिकेच्या आरोग्य विभागामध्ये नोकरभरती करण्याचा प्रस्ताव शासनस्तरावर अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. आमदार मंदा म्हात्रे यांच्यासह महापौर व प्रशासनाने मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू केला होता. रखडलेल्या या आकृतीबंदास सरकारने शुक्रवारी मंजुरी दिली आहे. या विभागात १०८५ नवीन पदे भरण्यात येणार असून त्यामुळे पालिकेची आरोग्य यंत्रणा सक्षम होणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा गत एक वर्षापासून पूर्णपणे कोलमडली होती. बांधकाम पूर्ण झालेली तीन रूग्णालये प्रत्यक्षात सुरू झाली नाहीत. कोपरखैरणे व तुर्भे माताबाल रूग्णालयाची इमारत धोकादायक झाल्याने बंद आहे. प्रथम संदर्भ रूग्णालय व नागरी आरोग्य केंद्रामधूनच शहरवासीयांना वैद्यकीय सुविधा दिल्या जात होत्या. जवळपास दहा वर्षांपासून या विभागातील डॉक्टर ते शिपाई संवर्गातील अनेक पदे रिक्त होती. पालिका प्रशासनाने आरोग्य विभागातील नोकरभरतीसाठी आकृतीबंद तयार करून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला होता. शहरवासीयांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी नवीन १०८५ पदांना मंजुरी मिळणे आवश्यक असल्याचे पत्र सरकारकडे पाठविले होते. १७ जुलै २०१५ मध्ये सविस्तर आकृतीबंद शासनाकडे सादर केला होता. आरोग्य विभागात पुरेसे कर्मचारी नसल्याने कोट्यवधींचा खर्च करून बांधलेली तीन नवीन रूग्णालये सुरू करता आली नाहीत. अत्याधुनिक फॅक रूग्णवाहिकाही धूळ खात आहेत.
शहरातील कोलमडलेली आरोग्य यंत्रणा सुरळीत व्हावी यासाठी महापौर सुधाकर सोनावणे, सत्ताधारी पक्षाचे नेते व प्रशासनानेही पाठपुरावा केला होता. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनीही आरोग्य यंत्रणा सक्षम व्हावी व शहरवासीयांना चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्या यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून कर्मचारी भरतीच्या आकृतीबंदास मंजुरी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार १०८५ पदांच्या आकृतीबंदास मंजुरी देण्यात आलीअसून अध्यादेशही काढण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
> आरोग्य विभागात कर्मचारी भरतीचा प्रश्न दहा वर्षे प्रलंबित होता. महापालिकेने सविस्तर आकृतीबंद जुलैमध्ये शासनाकडे पाठविला होता. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून त्यांना शहरातील आरोग्य यंत्रणेविषयी माहिती दिली. नागरिकांना चांगल्या सुविधा मिळविण्यासाठी सरकारने तत्काळ आकृतीबंदास मान्यता दिली असून यामुळे पालिकेची आरोग्ययंत्रणा सक्षम होणार आहे.
- मंदा म्हात्रे, आमदार,
बेलापूर मतदार संघ
> आरोग्य विभागामध्ये रिक्त असणारी पदे भरण्यासाठी सविस्तर आकृतीबंद शासनाकडे पाठविला होता. गतवर्षभर सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर त्यास मंजुरी मिळाली आहे. यामुळे आरोग्ययंत्रणा सक्षम होवून शहरवासीयांना चांगल्या सुविधा देता येणार आहेत.
- दिनेश वाघमारे,
आयुक्त, महापालिका