जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी भिवंडीत एसएमएस सेवा
By Admin | Updated: August 16, 2014 00:31 IST2014-08-16T00:31:12+5:302014-08-16T00:31:12+5:30
भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेने नागरिकांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मोबाइल एसएमएस प्रक्रिया सुरू केली असून, राज्यात प्रथमच ही सुविधा पालिकेने सुरू केली

जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी भिवंडीत एसएमएस सेवा
भिवंडी : भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेने नागरिकांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मोबाइल एसएमएस प्रक्रिया सुरू केली असून, राज्यात प्रथमच ही सुविधा पालिकेने सुरू केली आहे. आंध्र प्रदेशातील विजयवाडा महानगरपालिकेनंतर एम-गव्हर्नर ही प्रक्रिया १५ आॅगस्ट २०१४ रोजी आपल्या शहरात सुरू होत असल्याची माहिती पालिका आयुक्त जीवन सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात नागरिकांना अनेक प्रश्न भेडसावत असताना मनपाच्या कार्यप्रणालीमुळे त्यांच्या समस्या सोडवण्यास वेळखाऊपणाबरोबरच विलंब होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या तक्रारी नोंदवण्यासाठी एसएमएस सर्व्हिस सुरू केली असून या उपक्रमांतर्गत नागरिक त्यांच्या तक्रारी ९९७०००१३१२ या क्रमांकावर पाठवू शकतात. तक्रारींची विभागणी १० खात्यांतर्गत केली असून त्यांना कोड क्रमांक दिले आहेत. त्या खात्यांतील कामांतर्गत कामाचे स्वरूप नमूद करण्याकरिता इंग्रजी अद्याक्षरे दिली आहेत. या प्रकारे नमूद तक्रारी पालिकेकडे आल्यास तक्रारदारांस तक्रार क्रमांक दिला जाऊन काम झाल्यानंतर त्याने दिलेल्या क्रमांकावर त्यास एसएमएसने कळवले जाणार आहे. ही सिस्टीम पुण्यातील क्लाऊड सिस्टीमला जोडली आहे. (प्रतिनिधी)