लॉजच्या परवानगीची फाइल नगररचना विभागाकडे
By Admin | Updated: April 20, 2016 02:36 IST2016-04-20T02:36:31+5:302016-04-20T02:36:31+5:30
तुर्भे सेक्टर २० मध्ये निवासी चाळीमध्ये लॉज सुरू करण्यास परवानगी देण्याची फाइल परवाना विभागाकडे गेली आहे. तक्रारीकडे दुर्लक्ष करून त्यांना परवानगी देण्यासाठी राजकीय व प्रशासनामधी

लॉजच्या परवानगीची फाइल नगररचना विभागाकडे
नवी मुंबई : तुर्भे सेक्टर २० मध्ये निवासी चाळीमध्ये लॉज सुरू करण्यास परवानगी देण्याची फाइल परवाना विभागाकडे गेली आहे. तक्रारीकडे दुर्लक्ष करून त्यांना परवानगी देण्यासाठी राजकीय व प्रशासनामधीलही काही अधिकाऱ्यांचा दबाव वाढू लागला आहे. अतिक्रमण व पार्किंगच्या समस्येकडे दुर्लक्ष करून नगररचना परवानगीची शिफारस करणार का, याकडे रहिवाशांचे लक्ष लागून राहिले आहे.
प्रशासनावर दबाव आणून नियमबाह्य कामे करून घेण्याची स्पर्धा शहरात सुरू झाली आहे. एखादे काम करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव वाढू लागला आहे. तुर्भे सेक्टर २० मध्ये निवासी जागेवर लॉजिंग व हॉटेल सुरू करण्यासाठीही सर्व नियम धाब्यावर बसविले जात आहेत. येथे बैठ्या चाळीतील घरे हॉटेलमालकांनी विकत घेऊन त्यावर सिडको व पालिकेची परवानगी घेऊन इमारत बांधली आहे. नगररचना विभागाने तळ अधिक एक मजला एवढीच परवानगी दिली असताना प्रत्यक्षात दोन मजले तयार केले आहेत. दोन्ही गल्ल्यांमधील सार्वजनिक वापराच्या जागेतही अतिक्रमण केले आहे. प्रस्तावित हॉटेल व लॉजला रहिवाशांनी तीव्र विरोध करण्यास सुरवात केली आहे. रहिवाशांचा विरोध मोडून काढण्यासाठी राजकीय व प्रशासनाकडून दबाव येवू लागला आहे. हॉटेल व लॉजच्या परवानगीसाठी संबंधित व्यावसायिकाने परवाना विभागाकडे अर्ज केला आहे. परवाना विभागाने ही फाईल नगररचना विभागाकडे अभिप्रायासाठी पाठविली आहे. सदर ठिकाणी पार्किंगसाठी सुविधा आहे का याची विचारणा केली आहे. याशिवाय अतिक्रमणाबाबतही अभिप्राय विचारला आहे. नगररचना विभागातील काही जणांनी नियम डावलून परवानगी द्या असा सूर लावला असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.
परवाना विभागाने हॉटेल मालकास परवानगी द्यावी यासाठी मोठ्या राजकीय पदाधिकाऱ्यांनीही फोन करण्यास सुरवात केली आहे. प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी पडू नये असे आवाहन तुर्भेमधील नागरिकांनी केले आहे. जर नियमबाह्यपणे परवानगी दिली तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. स्थानिक नगरसेविका शुभांगी पाटील यांनीही या विषयावर सर्वसाधारण सभेत लक्षवेधी मांडण्याचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)