जलकुंभ नियोजनाअभावी कोरडे
By Admin | Updated: August 28, 2014 04:49 IST2014-08-28T04:49:34+5:302014-08-28T04:49:34+5:30
कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात वाढत्या लोकसंख्येच्या मागणीनुसार पाणीटंचाई निवारणार्थ गेल्या काही वर्षांत कोट्यवधींच्या पाणी योजना राबवण्यात आल्या़

जलकुंभ नियोजनाअभावी कोरडे
कोळसेवाडी : कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात वाढत्या लोकसंख्येच्या मागणीनुसार पाणीटंचाई निवारणार्थ गेल्या काही वर्षांत कोट्यवधींच्या पाणी योजना राबवण्यात आल्या़ परंतु प्रशासनातील दिरंगाई व नियोजनाच्या अभावी शेकडो ठिकाणच्या पाणी जोडण्यामधून दैनंदिन हजारो लिटर पाणी वाहून जात आहे. तर बांधलेले जलकुंभ पाणी वितरण व्यवस्थेच्या नियोजनाअभावी गेली काही वर्षे कोरडेच राहिले आहेत.
कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रातील पाणीपुरवठ्याची कार्यकारी अभियंता तरूण जुनेजा यांनी माहिती दिली ती अशी की, मनपाच्या पाणीपुरवठा विभागातर्फे उल्हास नदीवरील मोहोने बंधाऱ्यामधून मोहोने उदंचन केंद्रावर १४७ दश लक्ष लिटर प्रतिदिन अशुद्ध पाणी उचलून बारावे जलशुद्धीकरण केंद्रामध्ये शुद्ध केले जाते व ते कल्याण पूर्व व पश्चिम असे वितरीत केले जाते. तसेच उल्हास नदीवरील मोहिली उदंचन केंद्राद्वारे १०० द.ल.ली. पाणी प्रतिदिन उचलून नेतीवली केंद्रामध्ये शुद्ध केले जाते व ते डोंबिवली पूर्व व पश्चिम असे वितरीत केले जाते. तसेच मोहिली जलशुद्धीकरण केंद्रातून ६० द.ल.लि. प्रतिदिन पाणीशुद्ध करून कल्याण ग्रामीणमधील मांडा, वडवली, जेतवननगर इत्यादी कल्याण पश्चिमेतील भागांना पुरवले जाते. काळू नदीवरील टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रातून प्रतिदिनी ४.०० द.ल.ली. पाणीशुद्ध करून टिटवाळा गाव परिसरात पुरवले जाते. बारावे, नेतीवली, मोहिली व टिटवाळा केंद्रातून एकूण ३१० द.ल.ली. प्रतिदिन पाणीशुद्ध करून विविध जलकुंभातून वाहिन्यांद्वारे वितरीत केले जाते.
यंदा पाऊस लांबला होता, परंतु, अल्पावधीत तो चांगला झाल्याने सध्या पाणीपुरवठा चांगला आहे, मात्र, टंचाईग्रस्त कल्याण पूर्व भागात खडे-गोळवली, कैलासनगर, चिंचपाडा, तिसगाव, या भागात टँकरने पाणीपुरवठा केला जातो.
‘ड’ प्रभागातील जलकुंभ आणि कुपनलिकांची माहिती उपअभियंता दिलीप खरे यांनी दिली ती अशी की, तळटाक्या धरून १२ जलकुंभ आहेत, तर कूपनलिका एकूण २१६ असून सद्यस्थितीत १६८ सुरू आहेत, सहा कूपनलिकांचे दुरुस्ती प्रस्ताव आहेत, तर ४२ कायम स्वरुपी बंद आहेत.
कल्याण-डोंबिवलीत कूपनलिकांची एकूण संख्या ८७२ असून ६२९ कूपनलिका सुरू आहेत, ८० कूपनलिका बंद आहेत, तर १६० कूपनलिका कायमस्वरुपी बंद असल्याची तसेच श्रद्धा बोअरवेल या कंपनीला दुरुस्तीचे कंत्राट देण्यात आले असून प्रत्येकी दुरुस्तीसाठी ४५७ रुपये खर्च होणार असल्याची माहिती जून १४च्या स्थायी समितीमध्ये देण्यात आली आहे.
या कूपनलिकांप्रमाणे कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या विहिरींच्या स्वच्छतेसाठी काही लाखांची तरतूद केली जाते, मात्र, त्यातील किती विहिरींची मनपातर्फे स्वच्छता होते, हा संशोधनाचा विषय आहे. कल्याण-डोंबिवलीत ५० ते ६० पडक्या अवस्थेतील विहिरी आहेत, जगतापवाडी, कोळसेवाडी भागातील विहिरी बंदिस्त करण्यात आल्या असून त्यांची स्वच्छता व निगा राखली जात असल्याचे समजते, काही विहिरींना मोटारलावून ते पाणी पिण्याव्यतिरिक्त कामासाठी वापरले जाते, परंतु, मनपा प्रशासनाकडे विहिरींचे योग्य ते सर्वेक्षण न होत असल्यामुळे आकडेवारी उपलब्ध नाही.
या मनपा क्षेत्रात २० हजार बेकायदा नळ जोडण्यांमुळे दरवर्षी मनपाला ५० ते ६० कोटींचा फटका बसत असून, मनपाचे सर्व संबंधित अधिकाऱ्याच्या सहकार्याने हे होत असल्याचा गंभीर आरोप एका ज्येष्ठ सदस्याने केला.