नगरसेवकांना टॅबचा मोह सुटेना
By Admin | Updated: February 16, 2016 02:59 IST2016-02-16T02:59:08+5:302016-02-16T02:59:08+5:30
महापालिकेचा संपूर्ण कारभार पेपरलेस करण्याचा प्रयत्न पूर्णपणे अपयशी ठरला आहे. तर प्रशासनाचाच प्रयत्न फसल्याची संधी साधत नगरसेवकांनाही टॅबचा मोह अनावर झाल्याचे दिसत आहे

नगरसेवकांना टॅबचा मोह सुटेना
नवी मुंबई : महापालिकेचा संपूर्ण कारभार पेपरलेस करण्याचा प्रयत्न पूर्णपणे अपयशी ठरला आहे. तर प्रशासनाचाच प्रयत्न फसल्याची संधी साधत नगरसेवकांनाही टॅबचा मोह अनावर झाल्याचे दिसत आहे. यामुळे पालिकेला आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या मागील पंचवार्षिक कालाधीत तत्कालीन महापौर सागर नाईक यांच्या संकल्पनेतून नगरसेवक व अधिकाऱ्यांना टॅबचे वाटप करण्यात आले होते. महापालिकेचे संपूर्ण कामकाज पेपरलेस व्हावे, या दृष्टीने त्यांनी हे पाऊल उचलले होते. या संकल्पने अंतर्गत नगरसेवक, अधिकारी यांना टॅबवरच विषयपत्रिका मिळणार होती. ८९ नगरसेवक व अधिकारी अशा १२२ जणांना हे टॅब देण्यात आले होते. टॅबवर विषयपत्रिका पाहता यावी, याकरिता विशेष अॅप्लिकेशन देखील तयार करण्यात आले होते. या संपूर्ण प्रक्रियेसाठी ४५ लाखांहून अधिक रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता. मात्र पेपरलेस कामकाजाची संपूर्ण संकल्पनाच फेल ठरल्याचे दिसून येत आहे. महापालिका निवडणुकीनंतर दुसऱ्या पंचवार्षिक कालावधीस सुरुवात होऊन सुमारे ११ महिन्यांचा कालावधी उलटला आहे. तरीही गत कालखंडातील नगरसेवकांनी हे टॅब परत केलेले नाहीत. लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना देण्यात आलेले टॅब कालखंड संपल्यानंतर परत जमा करायचे असल्याचे गुपित काहीसे उशिरा उघड झाले होते. त्यामुळे वाटप झालेले टॅब कायमस्वरूपी आपलेच असल्याचा गैरसमज काही लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना झालेला असावा. यामुळे त्यांनी सदर टॅब पालिकेला परत केलेले नाहीत. परंतु जे नगरसेवक पुन्हा निवडून आले आहेत त्यांच्याकडूनही टॅबचा वापर होत असल्याचे सभागृहात दिसत नाही. सद्य:स्थितीला गतकालखंडातील ४८ नगरसेवक व त्यांचे नातेवाईक सभागृहात आहेत. त्यापैकी २५ नगरसेवक पुन्हा निवडून आले आहेत. तर १३ नगरसेवकांच्या पत्नी, ९ नगरसेविकांचे पती व दोन जणांची मुले असे ४८ जण निवडून आले आहेत. नगरसेवकांना टॅब दिल्यानंतर परिवहन व शिक्षण मंडळ सदस्यांनाही टॅबचे स्वप्न पडू लागले होते. त्यांनीही स्वत:साठी पालिकेकडे टॅबची मागणी करायला सुरुवात केली होती. मात्र ज्यांना टॅब दिले त्यांनीच परत केले नसल्याने पालिकेला आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. अवघ्या १३ जणांनी अद्यापपर्यंत पालिकेला टॅब परत केले आहेत. त्यामध्ये तत्कालीन आयुक्त आबासाहेब जऱ्हाड व नगररचनाकार प्रकाश ठाकूर यांच्यासह ११ लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. त्यापैकी नामदेव भगत यांनी निवडणूकदरम्यान टॅब परत करून निवडून आल्यानंतर तो पुन्हा घेतला आहे. मात्र सेसचे तत्कालीन अधिकारी सुधीर चेके यांनी महापालिकेतून बदली झाल्यानंतरही टॅब परत केलेला नाही. यावरून लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांनाही टॅबचा मोह सुटत नसल्याचे दिसत आहे. (प्रतिनिधी)