एकीकडे कोरोना लसीच्या साठ्यावरून ( Corona Vaccine Shortage) राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये जुंपली असताना नवी मुंबई आणि पनवेलमधील कोरोना लसीकरण केंद्रे बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. लस संपल्याने आणि नवी लस मिळण्यास विलंब होत असल्याने लसीकरण थांबले आहे. राज्यातही अनेक जिल्ह्यांत ही परिस्थिती उद्भवली आहे. (Corona Vaccination Centers closed in Navi mumbai, Panvel due to Corona Vaccine Shortage in maharashtra. )
महाराष्ट्रात आज 23 लाख कोरोना लसी उपलब्ध असल्याचा खुलासा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नुकताच केला आहे. तसेच पुढच्या तीन दिवसांची लस ही वाटेवर आहे. असे असताना राज्यात कोरोना लसीकरण केंद्रे बंद पडत आहेत. ही परिस्थिती महाराष्ट्र राज्यातच नसून ओडिया, आंध्र प्रदेश सारख्या राज्यांतही उद्भवली आहे.
नवी मुंबईमध्ये कोरोना लसीचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. महापालिकेची 26 आणि 16 खासगी लसीकरण केंद्रांपैकी केवळ 4 लसीकरण केंद्रे सुरु आहेत. उर्वरित 38 लसीकरण केंद्रे आज दुपारनंतर बंद ठेवण्यात आली आहेत. पालिका हद्दीत एकूण 141079 लसीकरण झाले असून सध्या 3510 डोस शिल्लक आहेत. तर पनवेलमध्ये सर्वच्या सर्व लसीकरण केंद्रे बंद ठेवण्यात आली आहेत.
मुंबईतील माहीम भागात कोरोनावरील लस संपल्याचे बोर्ड लसीकरण केंद्राबाहेर लावण्यात आले आहेत. मुंबईमध्ये सध्या कोरोनाची १२० लसीकरण केंद्रे आहेत त्यापैकी ७३ केंद्रे खासगी आहेत. त्यापैकी २६ केंद्रे आताच बंद झाली आहेत. तर उद्या २२ केंद्रे बंद होण्याची शक्यता आहे. मुंबईबरोबरच सांगली सातारा, गोंदिया, पनवेल, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्येही कोरोना लसींचा साठा संपुष्टात आला आहे. तर यवतमाळ, कोल्हापूर आणि वाशिम जिल्ह्यात कोरोना लसींचा साठा उद्यापर्यंत संपुष्टात येऊ शकतो.