अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी भाजपला धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:31 IST2020-02-18T00:31:10+5:302020-02-18T00:31:18+5:30
चार नगरसेवकांचा राजीनामा : शिवसेनेमध्ये करणार प्रवेश

अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी भाजपला धक्का
नवी मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या राज्य अधिवेशनाच्या दुसºयाच दिवशी महापालिकेमधील चार नगरसेवकांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. चारही नगरसेवक शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे भाजपला मोठा धक्का बसला असून तुर्भे स्टोअर्स व एमआयडीसी परिसरावर याचा परिणाम होणार आहे.
भाजपचे नेते आमदार गणेश नाईक यांचे विश्वासू समजले जाणारे सुरेश कुलकर्णी, राधा कुलकर्णी, मुद्रिका गवळी व संगीता वास्के यांनी आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे राजीनामा देत असल्याचे पत्र दिले. या वेळी विरोधी पक्ष नेते विजय चौगुलेही उपस्थित होते. कुलकर्णी यांची तुर्भे स्टोअर्स, इंदिरानगर ते बोनसरीपर्यंत झोपडपट्टी परिसरावर पकड आहे. माजी मंत्री गणेश नाईक शिवसेनेत असल्यापासून ते त्यांचे समर्थक होते. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँगे्रस व भाजपमध्येही त्यांनी प्रवेश केला होता. त्यांनी आतापर्यंत परिवहन समिती सभापती, तीन वेळा स्थायी समिती सभापतीपद भूषविले आहे. त्यांच्या समर्थकांनाही परिवहन व इतर समित्यांवर संधी देण्यात आली होती.
मागील काही महिन्यांपासून कुलकर्णी नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. तुर्भेमधील डम्पिंग ग्राउंड, ठाणे-बेलापूर रोडवर उड्डाणपूल बांधण्यात यावा या मागण्यांसाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर ते शिवसेनेत जाणार हे जवळपास स्पष्ट झाले होते.
निवडणुकीची चाहूल लागल्यामुळे भाजपचे काही नगरसेवक शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये जाणार अशी चर्चा सुरू झाली होती. परंतु प्रत्यक्षात कोणीच पक्ष सोडलेला नव्हता. कुलकर्णी यांच्यासह चार नगरसेवकांनी राजीनामा दिल्यामुळे प्रत्यक्षात गळती सुरू झाली आहे.
तुर्भे परिसरातील नागरिकांचे प्रश्न सोडविणे याला आमचे प्राधान्य असते. परिसरातील नागरिकांच्या इच्छेखातर आम्ही भाजपचा राजीनामा दिला आहे. नगरसेवक पदाचाही राजीनामा आयुक्तांकडे दिला आहे.
- सुरेश कुलकर्णी, माजी स्थायी समिती सभापती